शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणाकरिता ५९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शिवसेना साठीत प्रवेश करताना इतकी जराजर्जर झालेली असेल व तिला तिच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल, असे बाळासाहेबांना स्वप्नातही वाटले नसेल. बाळासाहेब हे धर्म, कर्मकांड वगैरे न मानणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव. बाळासाहेबांनी राजकारणात वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या त्या त्यांच्यावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी स्वीकारल्या.
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेत भाजपचे प्रमोद महाजन व अन्य नेत्यांना भविष्यातील उत्कर्षाची शिडी दिसली. भाजपने शिवसेनेसोबत युती केली. ठाकरे यांचे बुक्के व कधीकधी लाथा सुद्धा हसत सहन केल्या. नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर आणि बाळासाहेब निवर्तल्यावर मात्र परिस्थिती बदलली. भाजप मोठा भाऊ झाला आणि शिवसेनेकडे धाकलेपण आले. हे धाकलेपण स्वीकारायला उद्धव ठाकरे तयार झाले नाहीत. अडवाणी-महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन जसे हात जोडले तसे ते आता उद्धव-आदित्य यांनी दिल्लीला जाऊन जोडावे ही भाजपची अपेक्षा होती. मात्र ‘झुकेगा नही’ हा बाणा उद्धव यांनी ठेवला.
गुरुवारच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणातही आपण भाजपवर ‘प्रहार’ करण्यास सिद्ध आहोत याच पवित्र्यात ते होते व त्यामुळे त्यांनी भाजप व त्यांच्या मित्रांना ‘कम ऑन किल मी’ असे आव्हान दिले. मात्र ‘मला संपवायला येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या’ अशी डायलॉगबाजीही त्यांनी केली. उद्धव हे बाळासाहेब यांचे पुत्र व त्यांनी त्यांच्या हयातीत निश्चित केलेले वारस. मात्र बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे या शिवसैनिकाकडे सोपवली. छगन भुजबळ, नारायण राणे या ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनाही जे जमले नाही ते शिंदे यांनी करून दाखवले. त्यामुळेच ते मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनीही वर्धापन दिनाचा जंगी कार्यक्रम केला.
शिंदेसेना आता महायुतीच्या सत्तेत ‘लहान भाऊ’ असली, तरी तिचाही सुप्त संघर्ष भाजपच्या नेत्यांसोबत सुरू आहे. मात्र शिंदे यांच्या भाषणात त्यांनी लक्ष्य केले ते उद्धव यांनाच. काट्याने काटा काढण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला, हे खरे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव यांची बहुमताची सत्ता आली नाही तर भाजप वाट्टेल ते करून आपल्या मनमर्जीची सत्ता बसवेल. अशा परिस्थितीत शिंदेसेना किंवा मनसेलाही महापौरपदाची लॉटरी लागू शकते. मात्र ठाकरेंचा काटा काढल्यावर मग शिंदेसेना, मनसे यांची उपयुक्तता भाजपकरता हळूहळू लोप पावायला लागेल. भाजपचा हा खेळ उद्धव, राज व शिंदे यांच्या लक्षात आला आहे.
मात्र राजकीय सारीपटावरील सोंगट्या भाजप आपल्या इच्छेनुसार हलवू शकतो, ही सध्याची स्थिती आहे. येथेच उद्धव यांच्या भाषणातील मनसेसोबत युती करण्याचा मुद्दा चर्चेत येतो. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे’, असे जाहीर करून उद्धव यांनी मनसेसोबत महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत दिले. मात्र २०१४ व २०१७ च्या निवडणुकीत युतीचे गाजर दाखवून उद्धव यांनी ऐनवेळी दगा दिल्याने मनसे नेत्यांच्या मनात शंका आहे. युतीकरिता झुलवत ठेवून ऐनवेळी दगा द्यायचा व मनसेला बदनाम करायचे, असा उद्धव यांचा कावा तर नाही ना? - अशी शंका मनसे घेत आहे. उद्धव-राज यांची युती ही यावेळी उद्धव यांची अधिक गरज आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, माहीम, परळ, वरळी वगैरे मराठी लोकवस्तीमधील १०० ते १२५ जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरिता मनसे यावेळी आग्रही भूमिका घेऊ शकते. तशी भूमिका मनसे घेईल असे मानले जात आहे. याचा अर्थ उद्धव यांना आपल्या ताटातला वाटा काढून भावाला द्यायचा आहे. याला उद्धव तयार होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजराती व हिंदी भाषिकबहुल मतदारसंघात स्वत: लढून भाजप मराठी मतदारांचा वरचष्मा असलेले प्रभाग मनसेला हसत देऊ शकते. याचा अर्थ, उद्धव यांना भाजपला शह द्यायचा असेल तर राज यांच्याशी तडजोड करावीच लागेल.