शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

Maharashtra Election 2019 : जिंकण्यासाठी नाहीच अनेकांची बंडखोरी!

By किरण अग्रवाल | Published: October 10, 2019 12:28 PM

निवडणुकीच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणारे सारेच जण विजयाच्या आत्मविश्वासानेच लढतात असे नाही...

ठळक मुद्देनिवडणुकीच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणारे सारेच जण विजयाच्या आत्मविश्वासानेच लढतात असे नाहीस्वत:च्या विजयापेक्षा आपले तिकीट ज्याच्यामुळे कापले गेले त्याच्या पराभवास कारणीभूत ठरण्याच्या ईर्षेपोटीही अनेकजण रिंगणात टिकून राहतातनिवडणुकीपूर्वी घाऊक स्वरूपात भरती केलेल्या व त्यातूनच मोठ्या प्रमाणात बंडखोरीस सामोरे जात असलेल्या भाजप-शिवसेनेच्या पातळीवर काही ठिकाणी धाकधूक वाढून जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे

- किरण अग्रवाल निवडणुकीच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणारे सारेच जण विजयाच्या आत्मविश्वासानेच लढतात असे नाही, स्वत:च्या विजयापेक्षा आपले तिकीट ज्याच्यामुळे कापले गेले त्याच्या पराभवास कारणीभूत ठरण्याच्या ईर्षेपोटीही अनेकजण रिंगणात टिकून राहतात; त्यामुळे अशा बंडखोरांना लाभू शकणाऱ्या मतदारांच्या पाठबळाकडे व त्यातून संबंधितांच्या डळमळणाऱ्या विजयाच्या गणिताकडे दुर्लक्ष करता येत नाही. निवडणुकीपूर्वी घाऊक स्वरूपात भरती केलेल्या व त्यातूनच मोठ्या प्रमाणात बंडखोरीस सामोरे जात असलेल्या भाजप-शिवसेनेच्या पातळीवर काही ठिकाणी धाकधूक वाढून जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे.राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंंदा मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली असून, ठिकठिकाणी विरोधकांपेक्षा स्वकीयांशी सामना करण्याचेच आव्हान उभे ठाकलेले दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडे सर्वाधिक इन्कमिंग झाले. त्यातही या दोन्ही पक्षातील ‘युती’ लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही कायम राहिल्याने अनेकांना घरीच बसावे लागले. भाजपने जागावाटपात मोठ्या भावाची भूमिका घेतल्याने शिवसेनेला अधिक जागा सोडाव्या लागल्या, परिणामी सेनेत बंडाळी अधिक झाली. कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांना या बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतही असे झाले आहे; परंतु ‘युती’त प्रमाण अधिक आहे. शिवाय पक्ष जसा अपवाद ठरू शकला नाही, तसे व्यक्तीही यात अपवाद ठरू शकलेल्या नाहीत. अगदी मदन येरावार, दीपक केसरकर व संजय राठोड या राज्यमंत्र्यांसमोरही बंडखोर उभे ठाकले आहेत, आणि खान्देशातील मातब्बर नेते एकनाथ खडसे, कोकणातील नारायण राणे यांच्या पुत्री-पुत्रांविरोधातही सहयोगी पक्षातील बंडखोरांनी दंड थोपटले आहेत.विशेष म्हणजे, ‘युती’ झाल्याने व जागा न सुटल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात भाजप वा भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या इच्छुकांनीच बंडखोरी केली आहे असे नाही, तर आपापल्या पक्षीयांना स्वकीयांनीच आडवे जाण्याची भूमिका घेतल्याचेही अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मुंबईत ‘मातोश्री’च्या अंगणात म्हणजे वांद्रे मतदारसंघात शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली असताना शिवसेनेच्याच आमदार तृप्ती सावंत, तर मीरा-भायंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहता यांच्यासमोर भाजपच्याच माजी महापौर गीता जैन पदर खोचून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. विदर्भातील गोंदिया मतदारसंघात भाजपचे आयात उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात भाजपच्याच विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली आहे. यासह दक्षिण नागपूर, आर्णी, सोलापूर, मोहोळ, करमाळा, चंदगड आदी ठिकाणची उदाहरणे बोलकी आहेत. शिवसेना-भाजपतील इच्छुकांनी परस्परांविरोधात केलेल्या बंडखोरीची संख्या अर्थातच अधिक असून, पुण्यात कसबा पेठ, पिंपरी चिंचवड, सांगोला, विदर्भात दिग्रस, उमरखेड, यवतमाळ, वणी, कोल्हापूरकडे कागल, राधानगरी, इस्लामपूर, शिरोळ, कोल्हापूर उत्तर, मुंबईत अंधेरी, वर्सोवा, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक पश्चिम, मुक्ताईनगर, साक्री, अक्कलकुवा आदी मतदारसंघातील बंडखोरीकडे त्यासंदर्भाने पाहता येणारे आहे.का व्हावे असे, हा यातील खरा प्रश्न असला तरी संधी हिरावली जाण्याचे शल्य, हेच यावरील उत्तर ठरते. पक्षकार्य करून लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळवू पाहणाऱ्यांना त्यात डावलले जाते तेव्हा बंडखोरी घडून येणे अटळ ठरते. स्वबळावर निवडून येऊ शकण्याचा आत्मविश्वास तर त्यामागे असतोच; परंतु अधिकतर बंडखो-या या केवळ स्पर्धकाच्या विजय मार्गात अडसर बनण्यासाठीही असतात. स्वत:च्या विजयाचे गणित जुळवता आले नाही तरी चालेल; परंतु दुस-याचे बिघडवण्याचा मानस त्यामागे असतो. अशाने मतविभागणी होणे अपरिहार्य ठरते व ती मातब्बर प्रतिस्पर्ध्यांसाठी जोखमीचीच ठरून जाते. एकहाती मैदान मारण्याच्या आविर्भावात असलेल्या ‘युती’च्या काही जागा या अशा बंडखो-यांमुळेच अडचणीत आल्याचे दिसत आहे. परस्परांवर कडी करीत, आपला आकडा वाढविण्याचा प्रयत्न करणा-या भाजप व शिवसेना या उभय पक्षांना या बंडखोरांची दखल घेणे त्यामुळेच भाग पडले आहे. कारण यातील अनेकजण जिंकण्यासाठी नव्हे तर समोरच्याच्या पराभवासाठी ते निवडणूक रिंगणात उतरलेले दिसत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा