शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकपालांची लटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:05 IST

एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही.

एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची सशक्त यंत्रणा, असा लोकपाल कायद्याचा गाजावाजा केला गेला. मोदी सरकार तर भ्रष्टाचार निर्मूलनाचा वसा घेऊन सत्तेवर आले आणि याच मंत्राचा जप मोदी प्रत्येक भाषणात करत असतात. परंतु कृतीची जोड नसल्याने मोदी सरकारची ही उक्ती दांभिक वाटू लागली आहे. स्वत: मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना तब्बल २० वर्षे लोकायुक्त नेमला नव्हता. आता केंद्रात सत्तेवर आल्यानंतरही त्यांची तीच मानसिकता लोकपालांच्या बाबतीत दिसून येत आहे. वरकरणी सांगितल्या जाणाºया अडचणी या अप्रामाणिक हेतू झाकण्यासाठी पुढे केल्या जाणाºया लंगड्या सबबी आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी भाजपाने त्याचा उपयोग पाहुण्याच्या काठीने विंचू मारण्यासाठी करून घेतला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जर्जर झालेल्या संपुआ-२ सरकारने सर्वांच्या दाढीला हात लावून १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल कायदा संसदेत मंजूर करून घेतला. त्यानंतर ते सरकार प्रत्यक्ष लोकपाल नेमण्याच्या दृष्टीने कामालाही लागले. सरकारच्या या घाईने भाजपाची नियत फिरली. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सरकार आपल्या मर्जीतील लोकांची लोकपाल म्हणून वर्णी लावू पाहात आहे, असा आरोप त्यावेळी भाजपाने केला व हे काम नव्या सरकारवर सोपवावे, असा पवित्रा घेतला. यानंतर अवघ्या तीन महिन्यांत देशातील जनतेने न भूतो अशा बहुमताने भाजपाला सत्तेवर बसविले. खरे तर मोदी सरकारला ही एक नामी संधी होती. आयता मंजूर झालेला लोकपाल कायदा या सरकारच्या हाताशी होता. पण मोदी सरकारने हा कायदा बडगा म्हणून हाती घेण्याऐवजी तो अडगळीत टाकला. लोकपाल निवड समितीमध्ये सदस्याची एक जागा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे नियमांनुसार अधिकृत विरोधी पक्षनेत्याचे पद काँग्रेसला मिळाले नाही. मनातून लोकपाल नेमायचा नसलेल्या मोदी सरकारला ही नामी सबब मिळाली. यावर उपाय म्हणून लोकसभेत मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला लोकपाल निवड समितीवर सदस्य म्हणून नेमण्याची दुरुस्ती मूळ कायद्यात करण्याचे एक पिल्लू सोडले गेले. प्रत्यक्षात ही दुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. दरम्यानच्या काळात आधीच्या सरकारने नेमलेल्या पी. पी. राव यांचे गेल्या सप्टेंबरमध्ये निधन झाले व निवड समितीवरील ‘ख्यातनाम विधिज्ञ’ सदस्याची जागा रिकामी झाली. या रिकाम्या जागेवर नेमणुकीसाठी कायदा दुरुस्ती करण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामी ठेवून उर्वरित सदस्यही या जागेसाठी सदस्याची निवड करू शकतात व तसे करणे कायद्याला धरून आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी स्पष्ट केले. तरी मोदी सरकारने काही केले नाही. सर्वोच्च न्यायालयाने पराण्या मारणे सुरूच ठेवल्यावर सरकारने १ मार्च रोजी विधिज्ञ सदस्य निवडण्यासाठी लोकपाल निवड समितीची बैठक बोलावली व त्यासाठी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना ‘विशेष निमंत्रित’ म्हणून पाचारण केले. साहजिकच हे तोंडदेखले आवतण खरगे यांनी अव्हेरले. खरे तर मोदी सरकारची प्रामाणिक इच्छा असती तर खरगेंनी नकार दिल्यावर बाकीच्या सदस्यांची बैठक घेऊन निवड करता आली असती. पण खरगेंनी नकार दिल्यावर बैठकच घेतली गेली नाही. लवकरच बैठक घेऊन नेमणूक करू, हे पालुपद सरकारने सुरू ठेवले आहे. आधीच्या समितीने ‘शोध समिती’वर अध्यक्ष म्हणून नेमलेले निवृत्त न्यायाधीश के. टी. थॉमस यांनी राजीनामा दिल्याने व ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांनी पद न स्वीकारल्याने त्या दोन जागाही रिकाम्या आहेत. त्या भरण्याच्या दृष्टीनेही सरकारच्या काही हालचाली दिसत नाहीत. नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने, असे म्हटले जाते. पण मोदी सरकारला या नकटीला बोहल्यावरच चढवायचे नाही, असे दिसते!

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत