मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!

By विजय दर्डा | Published: May 20, 2024 09:16 AM2024-05-20T09:16:00+5:302024-05-20T09:17:57+5:30

अख्ख्या देशभरात होर्डिंग माफियांचे जाळे आहे. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे हात ओले करणाऱ्या या धंद्याला कोर्टानेच वेसण घालावी!

lokmat article about Hoarding issue | मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!

मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -

आपण नेते आहात हुजूर! आपण अधिकारी आहात. संपूर्ण व्यवस्थेला आपल्या बोटांवर नाचवण्यासाठी आपण प्रसिद्ध आहात. हुजूर, माझ्या या ओळी तुम्हाला कदाचित खटकतील; तुम्हाला कमी लेखतो आहे असेही कदाचित वाटेल...

चला, हेच मी आता अधिक थेट म्हणतो... अख्खी व्यवस्था आपल्या मुठीत आहे हुजूर, आणि आपण म्हणजे खरे तर अख्खे सरकार आहे, हुजूर. सामान्य माणूस नावाच्या प्राण्याची काळजी करावी इतकी फुरसत आपल्यापाशी कुठून असणार? मुंबईमध्ये कोसळलेल्या अवैध होर्डिंगखाली दबून अकस्मात बळी पडलेले १६ लोक आपले नातेवाईक थोडीच होते, ज्यांच्यासाठी आपण दु:ख करावे! सामान्य माणूस तर मरायलाच जन्माला येतो; आपण सामान्य माणूस थोडेच आहात?

तरी एक प्रश्न आहे, हुजूर! खरे म्हणजे ती दुर्घटना नव्हतीच, इथे १६ लोकांची सरळ सरळ हत्या झाली असे आपल्याला वाटत नाही का? अरे हो, बरे झाले आठवले, हे अवैध होर्डिंग लावणारी कंपनी ‘इगो मीडिया’चे मालक भावेश भिंडे यांच्याविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण प्रश्न असा आहे की ‘सदोष’ हा शब्द कशासाठी? ज्या दिवशी १०० फूट उंचीवर १२० गुणिले १२० फुटाचे हे विशालकाय होर्डिंग बेकायदेशीरपणे लावले जात होते तेव्हा मुंबईच्या त्या भागात ४० गुणिले ४० फुटापेक्षा जास्त मोठे होर्डिंग लावता येत नसते हे महापालिका किंवा रेल्वेला ठाऊक नव्हते काय?

- सगळ्यांना सगळे काही ठाऊक होते, हुजूर. जेव्हा सगळीकडे सगळेच विकले जायला लागते, तेव्हा ईमानही विकले जाते. आपले ईमान विकले गेले नसेल समजा, आणि भावेशच्या गुंडगिरीखाली आपण दबला असाल हे मान्य करून टाकू. भावेशविरुद्ध पोलिसांत २६ गुन्हे नोंदले गेलेले असून २००९ मध्ये त्याने मुलुंड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती.

हुजूर, अधिकारी आणि नेत्यांची ही अभद्र युती व्यवस्थेच्या जिवावर उठली आहे. प्रश्न फक्त मुंबईचा नाही, हुजूर.  देशाच्या इतर भागातही अशा घटना घडल्या आहेत. मुंबईत १६ लोक मरण पावले. ७० पेक्षा जास्त जखमी झाले म्हणून गदारोळ झाला. लोक मेल्याशिवाय आपल्याला जाग कशी येणार? दर दोन वर्षांनी होर्डिंग्जचे ऑडिट होते असे आपण म्हणू शकता. पण मग या या ऑडिटमध्ये बेकायदा होर्डिंग्ज दिसत कशी नाहीत, असा माझा प्रश्न आहे. मुंबईत एकूण १०२५ होर्डिंग्ज असून, त्यातील १७९ रेल्वेच्या हद्दीत येतात असे आता सांगितले जाते. खरोखर इतकीच होर्डिंग्ज आहेत काय? 

महापालिका आणि रेल्वेचे हे काय प्रकरण आहे? ही आपली वाटणी आहे, हुजूर. ज्या कुटुंबांतली माणसे मरण पावली त्यांच्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून ज्यांनी ते होर्डिंग उभे राहू दिले, ते सगळेच अधिकारी आणि नेते मारेकरी आहेत.

सध्या मी अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्यावर आहे. इथल्या शानदार रस्त्यांच्या बाजूला मला कुठेही होर्डिंग्ज दिसत नाहीत. लोक फुटपाथवरून चालतात. त्यांच्या वाटेत दुकाने येत नाहीत. येथे कोणत्याही नेत्याचे कुठलेही बॅनर दिसत नाही. आपल्या देशात काय परिस्थिती आहे? रस्ता दुभाजक आणि चौकाचौकांत होर्डिंग्ज उभारणे राजकीय पक्षांनी आपला जन्मसिद्ध अधिकार मानलेला आहे. विजेच्या खांबांनाही ते सोडत नाहीत. कधी माणसांच्या नावे, तर कधी देवाच्या नावाने होर्डिंग्ज लावले जातील. अगदी ऐतिहासिक वास्तूसुद्धा झाकून टाकल्या जातात. 

आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी हेच सांगेन की होर्डिंगपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण नियम कडक का करत नाही? जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था व्हायला आपण चाललो आहोत, त्याला अनुरूप आपला व्यवहारही असला पाहिजे. 

पी. एन. भगवती सरन्यायाधीश होते तेव्हा न्यायालयांनी पुढाकार घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतल्या. त्यावर सुनावणी केली. विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी सूचना दिल्या, आदेश काढले. डिसेंबर २०२३ मध्येच मुंबई उच्च न्यायालयाने अवैध होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरुद्ध कारवाई करण्यात असफल झालेल्या महाराष्ट्र सरकारला फटकारले होते. २०१७ पासून मुंबई उच्च न्यायालय राज्य सरकार आणि विविध महापालिकांना होर्डिंग्ज आणि बॅनरविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना करत आले आहे. कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा व्यापारी संस्थेला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी रस्ता किंवा फुटपाथवर होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देता येणार नाही. परंतु, नगरपालिका, महानगरपालिका, एमएमआरडीए, मेट्रो यासारख्या संस्था आपल्या गतीने चालतात. कारण युती फार पक्की आहे.

हुजूर, या देशात पाणी चोरणाऱ्यांपासून पूल चोरणाऱ्यापर्यंत डझनावारी माफिया आहेत. व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. भंडाऱ्यातील मुलांच्या मृत्यूचा विसर आपल्याला पडला नसेल. हुजूर. काय झाले त्याचे? किती जणांना शिक्षा मिळाली?

मी  न्यायालयांना हात जोडून प्रार्थना करतो.. आपणच आता आशेचे किरण आहात. एरवी हे माफिया कोणाचे ऐकतात कुठे? ज्या पक्षाचे किंवा संस्थेचे बेकायदा, धोकादायक होर्डिंग्ज लागले आहेत त्यांचे नेते किंवा संचालकांना जोवर फरफटत आणले जात नाही, तोवर हे लोक चूक मान्य करणार नाहीत. पाणी डोक्यावरून गेले आहे, हुजूर! हे सगळे कधीतरी बुडेल! काही तरी करा, एरवी लोकांजवळ मतदानाचे शस्त्र आहे. त्याची ताकत कमी लेखू नका.

Web Title: lokmat article about Hoarding issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.