शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?

By विजय दर्डा | Updated: September 29, 2025 06:51 IST

चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्‌यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते.

डाॅ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा फुन्सुक वांगडू यांची भूमिका आमीर खानने केली होती. ती व्यक्तिरेखा लेह-लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित होती, असे मानले जाते. लोक त्यांना आधीही ओळखत असत; परंतु सिनेमामुळे ते भारतभर पोहोचले. दैवदुर्विलास पाहा, आता लेहमध्ये हिंसाचार भडकावण्यासह इतर काही आरोप त्यांच्यावर होत आहेत. पोलिसांनी  त्यांना अटक केली आहे. हिंसेला वांगचुक हेच जबाबदार आहेत की इतर काही गुप्तशक्ती सीमेवर भारताला कमजोर करण्याचे कारस्थान रचत आहेत? लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार लोक मरण पावले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण काय आहे ते समजून घेतले पाहिजे.

लडाख हे प्रदेशाचे नाव असून, लेह त्याचे मुख्य शहर. लडाख हे यापूर्वी जम्मू-काश्मीर राज्याचा भाग होते. परंतु, तेथील लोकांना आपली सतत उपेक्षा होत होत आहे असे वाटायचे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच लडाख बौद्ध असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष छेवांग रिग्जिन यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले. ‘लडाख जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले पाहिजे; कारण इथला धर्म, वंश, भाषा आणि संस्कृती काश्मीरपेक्षा एकदमच वेगळी आहे,’ असे त्यांनी पत्रात म्हटले होते. लडाखचे एक प्रभावशाली नेते लामा कुशक बाकुला यांनी तर शेख अब्दुल्ला यांच्यावर नाराज होऊन ‘लडाखच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिबेटबरोबर जाण्याचाही विचार करू शकतो,’ अशी धमकीही दिली होती. 

१९७९ मध्ये लडाखचे विभाजन दोन जिल्ह्यांमध्ये केले गेले. मुस्लीमबहुल भाग कारगिल जिल्हा, तर बौद्धबहुल भाग लेह जिल्हा. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य आपल्याशी भेदभाव करून कारगिलमधील मुस्लिमांचा अनुनय करते, अशी तक्रार लेह जिल्ह्यातील लोकांनी सुरू केली. १९८९ साली यावरून पेटलेल्या आंदोलनात तीन लोकांचा बळी गेला. अंतिमत: २०१९  मध्ये जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना झाली. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यावर या संपूर्ण प्रदेशात  जल्लोष साजरा केला गेला. स्वतः वांगचुक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुल्या दिलाने प्रशंसा केली होती. 

जो प्रदेश केंद्रशासित झाल्यावर आनंदाने जल्लोष साजरा करत होता, तेथे काही वर्षांतच राज्याचा दर्जा प्राप्त करणे आणि सहाव्या अनुसूचित सामील होण्यासाठी आंदोलन का सुरू झाले? सहाव्या अनुसूचीबद्दल पुरेशी माहिती नसते. सहावी अनुसूची ही आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या चार पूर्वोत्तर राज्यांच्या जनजातीय प्रदेशासाठी केलेली एक प्रशासनिक तरतूद आहे. तेथील संस्कृती, जमीन आणि साधनसामग्रीचे रक्षण करणे हा त्यामागचा हेतू. लेहच्या संस्कृतीचेही रक्षण झाले पाहिजे यात शंका नाही. तिथल्या नैसर्गिक साधनसामग्रीवरही तिथल्या लोकांचा अधिकार असला पाहिजे. परंतु त्यासाठी हिंसा मात्र अनुचित आहे. 

लडाखचे लोक खूपच साधे आहेत. मी अनेकदा तेथे गेलो आहे. कारगिलमध्ये सैन्याच्या जवानांसाठी ‘लोकमत’तर्फे निर्मित उबदार घरांचा शुभारंभ करण्यासाठी मी आणि माझे बंधू राजेंद्र तेथे गेलो, तेव्हा लेहला थांबलो होतो. तिथल्या लोकांशी बोलणे झाले. डिसेंबर, जानेवारीमध्ये इथले तापमान शून्य ते दहा अंशांच्याही खाली जात असते. थंड वाळवंट असे संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशातील जीवन अत्यंत खडतर असून, लोक शांतताप्रिय आहेत. आपली संस्कृती जपण्याच्या बाबतीत विशेष जागरूक आहेत. लडाखमध्ये गेल्या ५० वर्षांपासून प्लास्टिकवर सामाजिक बंदी आहे. अशा प्रदेशातील लोक हिंसक का झाले असतील?

पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक १०  सप्टेंबरला ३५ दिवसांच्या उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ लेह अपेक्स बॉडी या संस्थेतील तरुणांच्या शाखेने लेह बंदचे आवाहन केले. सगळे काही ठीकठाक होते. लेहचा पूर्ण बाजार बंद होता. परंतु त्याचवेळी काही लोकांनी भाजप कार्यालयावर दगड फेकले. परिसरातील एका इमारतीला आग लावली आणि काही वाहनेही जाळली. त्यानंतर पोलिस आणि अर्धसैनिक दलांनी दंगलखोरांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला. गोळीबार झाला. अश्रुधुराची नळकांडी फोडली गेली. अनेक लोक जखमी झाले. अशा स्थितीत सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले. त्यांनी फक्त एवढेच म्हटले की, ‘तरुण हताश झाले आहेत; परंतु हिंसाचार होता कामा नये.’

पोलिसांनी हिंसाचाराच्या आरोपावरून लेहचे काँग्रेस नगरसेवक यां फुंटसोग स्टेनजिग त्सेपाग यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सोनम वांगचुक यांच्या संस्थेवरही लगाम कसला जात आहे. त्यांच्या संस्थेला परदेशातून देणग्या मिळू शकणार नाहीत. परंतु प्रश्न असा पडतो की, लडाखच्या प्रतिनिधींबरोबर केंद्र सरकारची बोलणी सतत चालू असताना सोनम वांगचुक किंवा तशीच कोणी व्यक्ती हिंसाचाराला प्रोत्साहन का देईल? ६ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बोलणी होणार आहेत. त्यात एलएबी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्ससुद्धा सामील होणार आहे. या सगळ्याचा साधा सरळ अर्थ असा की, कोणीतरी तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. ते कोण आहेत? आपल्या आतले आहेत, की बाहेरच्या शक्ती त्यात सामील आहेत? याचे उत्तर मात्र नक्कीच शोधले पाहिजे. 

लडाख चीनच्या सीमेलगत आहे आणि तिथे कुठलीही आंतरिक कमजोरी आपल्यासाठी घातक ठरू शकते. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत हेच दिसून आले आहे. आपल्याला लडाखमधील लोकांच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि हेही समजून घ्यावे लागेल की सोनम वांगचुक कोणी राष्ट्रविरोधी व्यक्ती नाहीत; ते लडाखला त्याच्या मूळ स्वरूपातले जीवन देऊ इच्छितात. भारताची वाढती आर्थिक ताकद सहन होत नसल्याने जगातल्या पुष्कळ शक्ती भारताविरुद्ध उभ्या राहत आहेत. त्या शक्तींच्या हातात आपली शस्त्रे जातील अशी कोणतीही चूक आपण करता कामा नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Who ignited unrest in Ladakh? Violence amid talks raises questions.

Web Summary : Ladakh faces turmoil with violence erupting despite ongoing talks. Sonam Wangchuk's arrest and unrest raise concerns about internal and external forces destabilizing the region bordering China. The need to respect local sentiments and prevent exploitation by anti-India elements is emphasized.
टॅग्स :ladakhलडाखIndiaभारत