कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 08:22 IST2025-07-06T08:18:26+5:302025-07-06T08:22:53+5:30
कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत, पायात घातली की काय तो रूबाब... तिचा बाजंच न्यारा, तिची भुरळ पडली नाही असा एकही भारतीय माणूस सापडणार नाही. ती पायात घातली तरी रूबाब अन् हातात घेतली तरी दुसऱ्यांचा रूबाब उतरवणारी...

कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत
डॉ. राहुल माने औद्योगिक रसायन शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत, पायात घातली की काय तो रूबाब... तिचा बाजंच न्यारा, तिची भुरळ पडली नाही असा एकही भारतीय माणूस सापडणार नाही. ती पायात घातली तरी रूबाब अन् हातात घेतली तरी दुसऱ्यांचा रूबाब उतरवणारी...गेल्या आठवड्यात एका इटालियन ‘प्राडा’ कंपनीने त्यांच्या फॅशन शोमध्ये हीच कोल्हापुरी चप्पल त्यांच्या नावाने प्रदर्शित केली अन् गदारोळ उठला. कोल्हापूरकरांचा स्वाभिमान जागा झाला. ‘आरं कोल्हापुरी आमची हाय, तुमचा काय संबंध’ म्हणत ‘प्राडा’ला कोल्हापूरकरांनी धुतलं.
एका चपलेसाठी कोल्हापूरकरांनी पार इटालियन सरकारला खडे बोल सुनावले. या चपलेसाठी कोल्हापूरकरांचा जीव का तुटतो याचे कारण ही चप्पल कधी काळी कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक परंपरेची एक ठेव होती. १२ व्या शतकात साधारणत: कोल्हापुरी चप्पल तयार करण्यास सुरुवात झाली. परंतु विसाव्या शतकात कोल्हापुरी ब्रँड विकसित झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरी चप्पलच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या राजवटीत सर्वसाधारण २९ ट्रेनिंग सेंटर उघडली गेली. चामड्यापासून चप्पल बनवण्याची ही हस्तकला कोल्हापूर आणि ग्रामीण भागातील कारागिरांचं खास वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरीने केवळ तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर तिच्या आरामदायी, आरोग्यदायी आणि टिकाऊपणामुळेही तिने लोकप्रियता मिळवली आहे.
कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शतकानुशतके रूजलेला इतिहास आहे. स्थानिक कारागीर बहुतेकदा पिढ्यान् पिढ्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या कुटुंबातून युगानुयुगे चालत आलेल्या या तंत्राचा वापर करून विविध पद्धतीच्या डिझाईनच्या कोल्हापुरी चप्पल अत्यंत काटेकोरपणे बनवत आहेत. या हस्तकलेत स्थानिक पातळीवर मिळवलेल्या चामड्याचा वापर केला जातो. प्रत्येक जोडी अचूकपणे आणि काळजीपूर्वक हाताने बनवली जाते. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. या चपलांना महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हे, बहुसंख्य राज्ये आणि भारताबाहेरही प्रामुख्याने स्पेन, इंग्लंड, इस्रायल, अमेरिका आदी देशांमध्ये प्रचंड मागणी आहे.
जीआय टॅगमुळे
प्रतिष्ठा वाढली
कोल्हापूरला आलेले पाहुणे, पर्यटक मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत. कोल्हापुरीला भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय टॅग मिळाल्यामुळे तिची ओळख आणि प्रतिष्ठा वाढली आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील चार आणि कर्नाटकातील लगतच्या चार जिल्ह्यांत या चप्पल बनविल्या जातात. मात्र, कोल्हापूरच्या चपलांना अधिक मागणी आहे.
राज्य सरकारने बळ द्यायला हवे
राज्य सरकारने कोल्हापुरी चप्पल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चप्पल उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे (रस्ते, वीज, पाणी, कच्चा माल) गरजेचे आहे. तसेच कोल्हापुरी चप्पलला जगभरात पोहोचवण्यासाठी तिचे उत्तम पद्धतीने ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, ऑनलाइन विक्री आणि कारागिरांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
आरामदायी, आरोग्यदायी
सुबक आकार, नक्षीकाम, आरामदायीपणा, आरोग्यदायीपणा आणि टिकाऊपणा ही या चपलेची वैशिष्ट्ये. कोल्हापुरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळ्यातसुद्धा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णतः हाताने बनवलेल्या असतात. त्या बनविण्याचे बहुतांश काम महिला कारागीर करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करून उपजीविका करणारी साधारणत: सात हजारांहून अधिक कुटुंबं आहेत. या चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जानुसार ठरते.