शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

नागपूरला दृष्ट का लागली? धर्म आणि जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी 'हा' धोका वेळीच ओळखलेला बरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:34 IST

आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

चकचकीत सिमेंटचे रस्ते, हिरव्यागार वृक्षराजीतून वाट काढत डाैलात धावणारी मेट्रो हे नवे आकर्षण बनलेल्या सुंदर नागपूर शहरावर सोमवारी रात्री धार्मिक हिंसाचाराचा डाग पडला. मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर सुरू असलेल्या वादात स्थानिक आंदोलनानंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या आणि शेकडोंच्या जमावाने जाळपोळ, तोडफोड केली. पोलिसांना लक्ष्य बनविले गेले. चार उपायुक्तांसह पस्तीसच्या आसपास कर्मचारी जखमी झाले. जमाव इतका हिंसक होता की पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव पडला. लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या वापरून जमाव नियंत्रित करावा लागला. आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

खरेतर असे एकमेकांवर आरोप करण्याऐवजी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस जखमी होण्याइतके काय चुकले याचा शोध घ्यायला हवा. त्याचप्रमाणे अशी घटना यापुढे घडू नये यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. कारण, महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान असलेल्या नागपूर शहराला असा धार्मिक दंगलींचा ना इतिहास आहे ना वारसा. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर संपूर्ण देश हिंसाचारात होरपळत असतानाही नागपूर तुलनेने शांत होते. गेल्या शंभर वर्षांत १९२७ किंवा १९६७ असे एक-दोन अपवाद वगळता या शहरात असे कधी दंगेधोपे झाले नाहीत. त्याचे कारण या शहराची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बहुविविधता. नागपूरचे भाैगोलिक स्थान, नागपूरकर भोसल्यांचा अवध, बंगालपर्यंतचा राज्यविस्तार आणि नंतर ब्रिटिशांची कामठीच्या लष्करी छावणीवर मदार आदी कारणांनी या शहरात देशाच्या मल्याळम, तमिळ, ओडिया, बंगाली, उत्तर भारतीय असे सगळेच समाजघटक पिढ्यान् पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. त्या साैहार्दाचे प्रतिबिंब इथल्या आगळ्यावेगळ्या सण-उत्सवात, प्रथा-परंपरांमध्ये उमटलेले दिसते. हे शहर बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने ओळखले जाते. बहुतांश हिंदू भक्त हे त्या श्रद्धेचे खास वैशिष्ट्य आहे. 

लगतच्या वर्धा-सेवाग्राम किंवा पवनारच्या रूपाने या भागाला महात्मा गांधींच्या अहिंसेचे अधिष्ठान आहे. इथल्या उत्सवांना इतिहासाचे कोंदण आहे. पोळ्याच्या निमित्ताने निघणारी मारबत मिरवणूक हे त्याचे सुंदर उदाहरण. हे शहर वैचारिक विविधताही जपते. यंदा शताब्दी साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जन्मभूमी आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या ऐतिहासिक घटनेमुळे ही दीक्षाभूमी. नागपूरकरांनी या वरवर स्पर्धक वाटणाऱ्या आस्था इतक्या श्रद्धेने जपल्या की कालांतराने त्या एकमेकींना पूरकही ठरल्या आणि त्यातून भारतीय विविधतेचे एक मूर्तिमंत उदाहरणही देशासमोर, जगासमोर ठेवले गेले. नागपूरची माणसे मोकळीढाकळी आहेत. नागपुरी किंवा वैदर्भीय पाहुणचार हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. जे पोटात तेच ओठात अशा मोकळ्या व तितक्याच भिडस्त स्वभावाचे हे शहर आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये नागपूरने कात टाकली आहे. आता हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर बनले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या वेगाचे धुरीण आहेत. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. उड्डाणपुलांचा नक्षीदार गोफ नागपूरच्या अंगाखांद्यावर खेळतो आहे. इथल्या विमानतळाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होत आहे. हा विकासाचा प्रवाह अवतीभोवतीच्या जिल्ह्यांकडूनही गतिमान होत आहे. नेमक्या याच टप्प्यावर धार्मिक हिंसाचार व्हावा, शांततेला नख लागावे हे काही चांगले चिन्ह नाही. नागपूरच्या चाैफेर विकासाला अशी हिंसेची दृष्ट लागायला नको. कारण, अशा घटनांचे परिणाम दूरगामी असतात. शांतता, कायदा-सुव्यवस्था ही कोणत्याही शहराच्या, प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाची, गुंतवणूक व रोजगार निर्मितीची, विकासाची महत्त्वाची गरज असते. अशावेळी हे असे वळण नागपूरला किंवा विदर्भाला, मध्य भारताला कदापि परवडणारे नाही. धर्म व जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी हा धोका वेळीच ओळखलेला बरा.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारणPoliceपोलिस