किलोभर बटाटे १,९६५ रुपये! गाझा बेहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:33 IST2025-06-09T09:32:00+5:302025-06-09T09:33:51+5:30
Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.

किलोभर बटाटे १,९६५ रुपये! गाझा बेहाल!
बिस्किट म्हटलं की आजही लहान-मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळी चहा-कॉफीबरोबर अनेकांना बिस्किटंच हवी असतात. त्याशिवाय त्यांची सकाळ पूर्ण होत नाही. त्यातही भारतात तर ‘पार्ले-जी’ बिस्किटांचा फारच बोलबाला आहे. इतक्या वर्षांत ना त्यांचा स्वाद बदलला, ना किमतीत फारसा बदल झाला! लहान मुलांपासून ते कष्टकऱ्यांपर्यंत आजही चवीसाठी आणि भुकेसाठी अनेकांची या बिस्किटांना पसंती असते. या बिस्किटांच्या एका पुड्याची किंमतही आहे फक्त पाच रुपये!
पाच रुपयांचा बिस्किटाचा हा पुडा गाझा पट्टीत किती रुपयांना मिळावा? इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.
गाझातील एका पालकानं सोशल मीडियावर नुकतीच टाकलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होते आहे. त्यात म्हटलं आहे, महत्प्रयासांनी का होईना, माझ्या लाडक्या मुलीला; रऊफला अखेर पार्ले-जी बिस्किटांचा पुडा मिळाला! ती आणि मी, आम्ही दोघंही त्यामुळे प्रचंड खूश आहोत! फक्त या पुड्यांचा बॉक्स आम्हाला दीड युरोऐवजी २४ युरोला विकत घ्यावा लागला! म्हणजे त्यासाठी या पालकाला किती रुपये मोजावे लागले? जो बिस्किटचा पुडा आपल्याकडे पाच रुपयांना मिळतो, त्यासाठी त्याला चक्क जवळपास २४०० रुपये मोजावे लागले!
एका बिस्किटाच्या पुड्यासाठी गाझामध्ये तब्बल पाचशे पट जास्त रक्कम मोजावी लागल्याच्या या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच गाझातील लोकांच्या हलाखीची परिस्थितीही त्यामुळे अधिकच अधोरेखित झाली आहे. युद्धामुळे गाझा पट्टीतील लोक अक्षरश: दाण्या-दाण्याला मौताद झाले आहेत. रोजच्या रोज तिथे भूकबळी जाताहेत. विविध देशांतून तिथे मानवीय मदतही पाठवली जातेय; पण ती लोकांपर्यंत पोहोचते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. २०२३पासूनच गाझा पट्टीत महागाई आकाशाला पाेहोचली आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जी वस्तू असेल, ती तो मनमानी किमतीला विकतो आहे. आत्ताही २ मार्च ते १९ मे पर्यंत पॅलेस्टिनी लोकांना संपूर्ण नाकाबंदीचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय मदत तर येत होती; पण, ती गाझा पट्टीतील लोकांपर्यंत पोहोचतच नव्हती. आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्यातले काही ट्रक गाझात सोडण्यात आले. त्यांचीही मोठ्या प्रमाणात लुटालूट झाली.
गाझामध्ये राहणारे सर्जन डॉ. खालिद अलशवा यांचं म्हणणं आहे, हा प्रश्न जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीचा किंवा त्यांच्यावरील टॅक्सचा नाही. कारण या वस्तू तर मुख्यत: येथे फुकटच येतात; पण, लगेच त्यांची लूटमार होते. गरजवंतांची संख्या लाखोंच्या घरात आणि वस्तू येतात हजारांच्या घरात, अशावेळी ‘बळी तोच कानपिळी’! ज्याच्या हातात या वस्तू पडतात, तो काळ्या बाजारात त्या विकतो!
काय असाव्यात या किमती?.. एक किलो साखर ४,९१४ रुपये, एक किलो गोडेतेल ४,१७७ रुपये, एक किलो बटाटे १,९६५ रुपये, एक किलो कांदे ४,४२३ रुपये आणि एक कप कॉफी १,८०० रुपये!