साथीच्या रोगांविषयी भारताचे धोरण
By Admin | Updated: March 14, 2015 00:48 IST2015-03-14T00:48:32+5:302015-03-14T00:48:32+5:30
मानवी इन्फ्लुएन्झा हा सामान्य प्रकारची सर्दी निर्माण करतो. त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हा साथीचा रोग म्हणून ओळखला जातो.

साथीच्या रोगांविषयी भारताचे धोरण
वरुण गांधी,(संसद सदस्य, भाजपा ) -
मानवी इन्फ्लुएन्झा हा सामान्य प्रकारची सर्दी निर्माण करतो. त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हा साथीचा रोग म्हणून ओळखला जातो. १९१८ साली जो साथीचा फ्लू उद्भवला तोच एच-१, एन-१ फ्लू व्हायरस होता व त्याने जगातील पाच कोटी लोकांना प्रभावित केले होते. त्यात अगदी दूरवरच्या पॅसिफिक व आर्टिक प्रदेशांचाही समावेश होता. त्या रोगाने जगभरातील एक कोटी लोकांचा बळी घेतला. हा रोग जगातील महान मानवी विध्वंस घडवून आणणारा ठरला. या रोगाने मरण पावलेल्यांची संख्या एड्सने मरण पावलेल्या लोकांपेक्षाही जास्त आहे. भारतात या रोगाने १ कोटी ७० लाख लोकांचा बळी घेतला. या रोगाने मरणाऱ्या लोकांमुळे जगाचा मध्यवर्ती सत्ता समतोलही ढासळला. या रोगाने जर्मनी आणि आॅस्ट्रियात मरण पावलेल्यांची संख्या फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये मरण पावलेल्यांपेक्षा जास्त होती.
अलीकडे ए/एच-५ एन-१ या ऐव्हीयन व्हायरसने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या कुक्कुटपालन व्यवसायाला २००६, २००८ व २००९ साली प्रभावित केले होते. या व्हायरसने पश्चिम बंगाल, आसाम व सिक्कीममधील घरगुती कोंबड्याही मरण पावल्या. या मृत कोंबड्या उचलून पुरून टाकण्यात आल्याने रोगाचा प्रसार थांबविण्यात आला असला तरी जगभरात ४४२ लोक त्या व्हायरसने बाधित होऊन त्यापैकी २६२ लोक मरण पावले. २००९ साली ए/एच-१ एन-१ या नावाने ओळखला जाणारा व्हायरस उत्तर अमेरिकेत झपाट्याने पसरला. अलीकडे या व्हायरसने प्रभावित झालेल्या १४००० लोकांपैकी ८३३ मरण पावल्यामुळे या व्हायरसचा प्रतिकार करण्याच्या क्षमतेविषयी लोक प्रश्न विचारू लागले.
साथीचे रोग मग तो इबोला असो की फ्लू असो तो अत्यंत क्रूर असून, आर्थिक परिणाम करणारा असतो. त्याने घेतलेल्या बळींपेक्षा त्यामुळे होणारा सामाजिक आणि आर्थिक परिणाम अधिक घातक असतो. त्या रोगाचा सार्वजनिक आरोग्यविषयक प्रभाव हा खर्चिक असतो. औषधांचा पुरवठा, डॉक्टरांच्या भेटी आणि रोग्यांना इस्पितळात दाखल करणे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते. हा रोग होऊ नये यासाठी लोकांची वागणूकही प्रभावित होते. बाजारात वस्तूंच्या विक्रीतही घट होते. कारण लोक बाहेर जाणेही टाळतात. २००३मध्ये चीनचे साथीच्या रोगाच्या संदर्भातील नुकसान १५ बिलियन डॉलर्स इतके होते, तर जगाच्या जीडीपीचे नुकसान ३३ बिलियन इतके होते. मात्र साथीच्या रोगाने मृत्यू पावलेल्यांची संख्या अवघी ९१६ होती. तरीही जागतिक मंदीचे प्रमाण अधिक होते!
अशा घटनांनी आर्थिक व राजकीय अस्थैर्य निर्माण होते. साथीच्या रोगाविषयीच्या भीतीने आरोग्यविषयक साधनांची टंचाई निर्माण होते. सार्वजनिक आरोग्यासंबंधी मजबूत कायदे असल्यास साथीच्या रोगांच्या संदर्भात सरकारची कर्तव्ये काय आहेत हे निश्चित ठरविले जाते. अशा कायद्यांमुळे सरकारने अशा साथीच्या बाबतीत काय करायला हवे हे निर्धारित होते. शाळा बंद ठेवल्याने साथीच्या रोगाचा प्रसार थांबविता येतो का? अमेरिकेतील लहान मुलांसाठी असलेल्या शाळा जर दोन आठवडे बंद ठेवल्या तर त्यामुळे ५ ते २३ बिलियन डॉलर्स एवढा खर्च येतो, असे ब्रुकिंग इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे.
साथीच्या रोगाच्या बाबतीत कायदे बरेच आहेत - एपिडेमिक डिसिजेस कायदा (१८९७), लाईव्हस्टाक इम्पोर्टेशन अॅक्ट १८९८, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक अॅक्ट १९४० इत्यादी. नॅशनल हेल्थ बिल २००९ हे विधेयक केंद्र सरकारवर संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सची पंचवार्षिक पाहणी करण्याचे निर्धारण करते. या पाहणीत व्हॅक्सीन्सची आणि औषधांच्या साठ्याची पाहणी करणेही समाविष्ट आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजनांची पाहणी पारदर्शक कशी राहील याविषयीचे मापदंड निश्चित केले आहेत. त्यात रोगाने प्रभावित झालेल्या रोग्यांना वेगळे ठेवणे, लोकांच्या प्रवासावर नियंत्रण ठेवणे, शालेय संस्था बंद करणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लसींचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवणे, तसेच खाजगी इमारतींचा हॉस्पिटल म्हणून वापर करणे, या गोष्टींचा समावेश आहे.
आपले सर्व कायदे हे पोलिसी थाटाचे आहेत. त्यात सार्वजनिक आरोग्य सुधारणेचा हेतू अजिबात नाही. साथीचा रोग उद्भवला तर त्याला तोंड देण्याची भूमिका त्या कायद्यात नाही. साथ उद्भवल्यास स्थानिक जिल्हाधिकाऱ्यावर सर्व जबाबदारी टाकण्यात येते आणि त्याच्या तुलनेत मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला दुय्यम भूमिका बजावावी लागते. साथीच्या रोगासंबंधीचे कायदे ११८ वर्षांइतके जुनाट आहेत. या कायद्यात लहान साथींचा सामना कसा करावा एवढेच निश्चित केले आहे.
आरोग्यविषयक जे निरनिराळे कायदे आहेत त्यांना एकाच कायद्यात सामील करणे गरजेचे झाले आहे. ते परिणामकारक तर असावेच पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी नियामक यंत्रणाही असावी. ती इंग्लंडच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ अँड क्लिनिकल एक्सलन्स’ या संस्थेप्रमाणे असावी. अशी संस्था साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनात समानता आणू शकेल. त्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिलचा उपयोग आंतर-राज्य संवादासाठी करण्यात यावा.
साथीच्या रोगाची स्थिती हाताळण्यासाठी पाच प्रकारची योजना अमलात आणावी लागेल. (१) व्हायरस निर्माण होण्याची अवस्था नियंत्रित करणे. (२) साथीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा मजबूत करणे. (३) साथीला ताबडतोब नियंत्रित आणण्याची योजना कार्यान्वित करणे (४) स्थानिक क्षमतेला जागतिक संस्थेशी जोडणे (५) व्हॅक्सीनची निर्मिती करून ती परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करणे.
त्यासाठी सामाजिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. इंग्लंडची राष्ट्रीय साथ यंत्रणा ही आपले धोरण ठरविण्यासाठी सामाजिक संस्थांचा उपयोग करते. साथ उद्भवल्यास त्याविषयीची माहिती तात्काळ उपलब्ध केल्याने गोंधळ निर्माण होणार नाही. तसेच कायद्यांना अशा संस्थेशी संलग्न केल्यास आरोग्यविषयक संकटांचा सामना संकटापूर्वी आणि संकटानंतर करणे त्यामुळे शक्य होऊ शकेल.