शेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 02:39 IST2018-11-22T02:38:32+5:302018-11-22T02:39:15+5:30

अमेरिकेसारख्या बहुसंख्य ख्रिश्चन असलेल्या धर्मनिरपेक्ष देशांनी इस्लामिक राष्ट्रातील नागरिकांना त्या प्रदेशात वावरण्यास प्रतिबंध केला आहे.

 Hundreds of burning questions and Buddha's preaching | शेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश

शेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश

- प्रा. डॉ. जी. के. डोंगरगांवकर (शिक्षण अभ्यासक)

तंत्रयुगातील मानव प्राणी सुखाच्या शोधात दु:खमुक्तीचे मार्ग तपासण्यात हैराण झाला आहे. जगातील विकसित आणि अविकसित राष्ट्र गुंतागुंतीच्या आणि तंत्रज्ञानाने जटिल केलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक समस्यांचे हाल वैज्ञानिक कसोटीतील परिमाणाप्रमाणे निरसन झाल्या पाहिजेत, असे त्याला वाटते. त्यासाठी देश धर्मांधतेच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अमेरिकेसारख्या बहुसंख्य ख्रिश्चन असलेल्या धर्मनिरपेक्ष देशांनी इस्लामिक राष्ट्रातील नागरिकांना त्या प्रदेशात वावरण्यास प्रतिबंध केला आहे.
सांस्कृतिक दहशतवाद, अण्वस्त्रे आणि परमाणू ऊर्जेच्या साठ्यामुळे जगातील मानवप्राणी चिंतातुर झाले आहेत. एवढेच नव्हे, दुसऱ्या महायुद्धापासून धडा घेऊन जगातील देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र महासंघाची स्थापना केली. त्यांनी २0१८ मध्ये संपूर्ण जगाला आणि मानव जातीला भेडसावणाºया वर्तमान डझनभर ज्वलंत प्रश्नांची ‘हिटलिस्ट’ जाहीर केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या हिटलिस्टमधील प्रश्नांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष, प्रदूषण, भूकबळी, वंशिकभेद, लिंगभेद, जातीयता, अस्पृश्यता, स्त्रियांचा घटता जन्मदर, वाढती अशांतता, मानवी हक्काचे उल्लंघन, वाढती लोकसंख्या, अण्वस्त्रे आणि परमाणू ऊर्जेकडे वाढता कल, स्थलांतरित आणि निर्वासितांशी केला जाणारा भेदभाव, एड्स अशा आव्हानाचा समावेश आहे. त्यांच्या अंजेड्यावरील ज्वलंत प्रश्नाला तथागत बुद्धाचा उपदेश तथा संदेश, शिकवणूक हाच निर्णायक उतारा आहे. या आव्हानाचा मुकाबला जगाला बुद्धाचा उपदेश पालन केले, तरच शक्य होईल.
सध्या हवेतील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण भारतात ३0 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत दिवसाचे २४ तास आॅक्सिजन या प्राणवायूचा पुरवठा करणारे पिंपळाचे झाडच मानवाला तारू शकणार आहे. म्हणून जगातील सर्व नागरिकांनी ‘पिंपळाचे पान, मानवाचा प्राण!’ ‘बोधीवृक्ष वाढवा, मानवजात जगवा!’ ही मोहीमच राबविण्याची आवश्यकता आहे.
कुपोषणग्रस्तांची संख्या ७९५ दक्षलक्षपर्यंत एकीकडे जगात पोहोचली आहे, तर दुसरीकडे जगातील ४0 टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. त्यावर बुद्धाने सांगितलेला सम्यक आहार आणि सम्यक व्यायाम हाच उपाय यावर आहे.
संयुक्त राष्ट्राने आपल्या अंजेड्यावर संपत्ती आणि धनाची मक्तेदारी आणि त्यातील असमानता याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. भांडवली अर्थव्यवस्था ही विकासाला चालना देत असली, तरी या विकासात मानवतावादाचे प्रतिबिंब दिसत नाही. आर्थिक संपत्ती आणि धनाचे केंद्रीकरण होत असतानाच धनिकाकडून शोषण होत आहे. त्यामुळेच भ्रष्टाचार आणि हिंसा वाढली आहे. त्यासाठी बुद्धाचे पंचशील आणि दानपारीमीता या सिद्धांताचा स्वीकार करून यावर मात करता येईल.
स्वतंत्र भारताच्या ७0 वर्षांच्या काळात सरकारने अनेक कायदे, विकासाचे कार्यक्रम आणि धोरणे राबविली. मात्र, भारत जगातील विकसित राष्ट्राच्या रांगेत बसू शकला नाही.
धर्म ही खासगी बाब आहे. प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य आहे. जगातील विकसित राष्ट्राच्या रांगेत विराजमान होण्याचे भारत स्वप्ने बाळगत असताना, भारतीयांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक जीवन पद्धतीमध्ये भारतीय संविधानाशी सुसंगत फेरबदल स्वत:मध्ये करून घेण्याची प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे.

Web Title:  Hundreds of burning questions and Buddha's preaching