शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

हरूनही ‘अकलूजकर’  जिंकले.. तरीही ‘बारामतीकर’ हसले !

By सचिन जवळकोटे | Updated: August 8, 2021 06:11 IST

‘फोटोची लॉटरी’ फुटल्यानं ‘बाण’वाले तीन जिल्हाप्रमुखही हरखले..

- सचिन जवळकोटे

ज्या गावात कैक दशकं सत्तेची लक्ष्मी   हसत-खेळत पाणी भरत होती, त्या अकलूजमध्ये बिचाऱ्या जनतेला तब्बल त्रेचाळीस दिवस ‘उपोषित’ राहावं लागलेलं. हे केवळ घडलं, ‘अकलूज’च्या कमळावर ‘बारामतीकर’ नाराज झाल्यानं. मात्र, तरीही अनेकांच्या नाकावर टिच्चून अखेर ‘अकलूजकरां’नी भगव्या कपड्यात गुंडाळून आणलेले पेढे वाटलेच. हेही केवळ घडलं, ‘धनुष्य’वाले ‘अकलूजकरां’ना भुलल्यानं. लगाव बत्ती..

दोन्ही 'दादां'नी घेतली 'अजितदादां'ची भेट..

महाराष्ट्राच्या राजकारणात आजपावेतो ‘बारामती’ हीच खरी राजधानी ठरलेली. याच ‘थोरल्या काकां’च्या साथीनं ‘अकलूज’ही कैक वर्षे उपराजधानी बनलेली. मात्र, ‘पुतण्या’ हा शब्दच ‘दादा’ घराण्याला बहुदा ‘धार्जिणा’ नसावा. बारामतीतही अन्‌ अकलूजमध्येही. लगाव बत्ती.‘अजितदादां’च्या आक्रमकतेला कंटाळून दोन वर्षांपूर्वी ‘अकलूजकरां’नी पार्टीची चूल बदलली. खासदारकीचा तवा उलथवला. आमदारकीचीही भाकरी फिरवली; परंतु सत्तेचं  ‘भरलं ताट’ अलगदपणे ‘बारामतीकरां’च्याच पंगतीला गेलं. याचा पहिला फटका बसला अकलूज गावाला. वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीच्या वाड्यात रमणारा इथला गावगाडा आता नगरपंचायतीच्या इमारतीत जायला उत्सुक बनलेला; मात्र तरीही वेळोवेळी याचा मुहूर्त पद्धतशीरपणे पुढं ढकलला गेलेला. अनेक महिने फाइल ‘नगर विकास’ खात्यात भकास बनून कोपऱ्यात पडलेली. कोणत्याही फाइलीवर लवकर सही न करणाऱ्या ‘पृथ्वीबाबा कराडकरां’च्या हाताला लकवा मारलाय का? असा कधीकाळी खोचक सवाल करणारे ‘अजितदादा’ या प्रकरणात मात्र पूर्णपणे वेगळ्याच भूमिकेत रमलेले. ‘एकनाथभाईं’चा हात सहीसाठी कुणी धरून ठेवलाय, हे फक्त वरच्या वर्तुळालाच समजलेलं.वाट पाहून थकलेले ‘रणजितदादा’ काही महिन्यांपूर्वी थेट मुंबईच्या ‘नगर विकास’ खात्यात गेले. त्यांनी ‘एकनाथभाऊं’ची भेटही घेतली. मात्र, इच्छा असूनही सही का करू शकत नाही, याची असमर्थता ‘भाईं’नी अँटी चेंबरमध्ये हळूच स्पष्ट केलेली. ‘अजितदादां’ना भेटलात तरच तुमचं काम होऊ शकतं’, असा स्पष्ट निरोप मिळताच ‘रणजितदादा’ थेट गेले ‘डीसीएम’ केबिनमध्ये.

दोन्ही ‘दादा’ बऱ्याच महिन्यांनी एकमेकांना भेटले. एक ‘दादा’ सत्तेच्या ‘खुर्ची’वर होते. दुसरे ‘दादा’ सत्तेच्या टेबलाबाहेर होते. सुरुवातीला ‘त्या फाइलीशी आपला काय संबंध?’ असा तटस्थ पवित्रा घेणाऱ्या ‘अजितदादां’नी नंतर मात्र मनातली खदखद बाहेर काढली. ‘तुम्हाला आम्ही यांवऽऽ दिलं. त्यांवऽऽ दिलं, तरीही तुम्ही तिकडंच गेलात. आता तिकडूनच करून घ्या की तुमची कामं’, या स्पष्ट भाषेत सांगितलं जाताच ‘रणजितदादा’ अकलूजला परतले रिकाम्या हातानं.त्यानंतर ‘विजयदादां’नीही एकदा स्वतःहून पुढाकार घेतला. साखर संघाच्या बैठकीत त्यांनी ‘अजितदादां’सोबत या विषयावर चर्चा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ऐकून न ऐकल्यासारखं करत या विषयावर बोलण्याचं पद्धतशीरपणे टाळलं गेलं. मग मात्र सहनशीलता संपली. अवहेलना काळजाला भिडली. उपोषणाची घोषणा दाही दिशांत घुमली. लगाव बत्ती.

एकीकडं अकलूजच्या शिवारात सरकारविरुद्ध रान पेटविलं जात असतानाच दुसरीकडं मुंबईत कोर्टाची पायरीही अकलूजकरांनी चढलेली. अपंगांपासून तृतीयपंथींपर्यंत अनेकांना मंडपात आणून ‘आंदोलनाच्या इव्हेंट’चा टीआरपी अधिकाधिक वाढविला गेला. असल्या आंदोलनाला आपण गिनत नाही, असं भासविण्याचा कितीही प्रयत्न ‘बारामतीकरां’नी केला असला तरी सरकारमधील इतर घटक मात्र अस्वस्थ बनत चाललेले. दोन ‘दादां’च्या वादात सरकारसोबत आपला पक्षही विनाकारण बदनाम होतोय, हे जाणवल्यानं काही शिवसैनिक थेट ‘एकनाथभाईं’ना भेटण्याचा विचार करू लागले. यासाठी पुढाकार घेतला अकलूजच्या ‘कुलकर्णी अण्णां’नी.

अकलूजमध्ये ‘अण्णां’नी पूर्वी मेंबर म्हणून काम केलेलं. उगाच ‘सर्वांत मोठी ग्रामपंचायत’ म्हणून बडेजाव मिरवण्याचे तोटेही त्यांनी स्वतः अनुभवलेले. त्यामुळं फोनाफोनी सुरू झाली. अशातच ‘पालकमामां’च्या ‘डॉमीनेटेड’ कारभारामुळं आतून नाराज असलेली ही मंडळी स्वतःहून एकत्र आली. ‘उजनी’ प्रकरणात ‘जलसंपदा’ खातं ‘घड्याळ’वाल्यांकडं होतं म्हणून थेट ‘संजयमामां’ना ‘पाणी वाटप रद्द’चं पत्र मिळालं. मग ‘नगरविकास’ खातं आपल्याकडे आहे, तेव्हा ‘अकलूज’चं पत्र आपणच आणलं तर ‘लय भारी हुईल’ अशीही चर्चा केली गेली. मग काय.. या मंडळींनी मुंबई गाठली.दोन दिवस थांबून ‘नंदनवन’ बंगल्यावर ‘एकनाथभाईं’ची भेट घेतली. ‘काहीही करून फाइल मंजूर व्हायलाच हवी’, असा आग्रह वाघमारे-पवार जोडीनं केला. तेव्हा गालातल्या गालात हसत ‘भाईं’नीएवढंच विचारलं, ‘करायलाच हवं का?’ यावर ‘डिकोळे-शिंदे-वानकर’ या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी ठामपणे होकारार्थी मान हलवली. मग काय.. ‘भाईं’नी कटाक्ष टाकला. ‘पीए’नं कॉल केला. मंत्रालयातून सहीचं पत्र घेऊन तत्काळ एक माणूसही निघाला.‘म्हणजे पत्र पूर्वीच तयार होतं’, हे लक्षात येताच जिल्ह्यातली मंडळी चमकली. मात्र, आंदोलनामुळं पत्र टाइप झालं की ‘विजयदादा’ अधून-मधून ‘उद्धव’ना भेटत गेल्यानं त्यावर सही केली गेली की, कोर्टाच्या आदेशामुळं मंत्रालयातली माणसं हलली, या शोधाच्या भानगडीत ही मंडळी पडली नाही.. कारण, त्यांना याक्षणी फक्त ‘आम’ खायचे होते. ‘पेड’ गिनत बसायला वेळही नव्हता. म्हणूनच मंत्रालयातल्या माणसाची वाट न पाहता हे पत्र मेलवर घाईघाईनं मागवून घेतलं गेलं. कारण, ‘भाईं’च्या हस्ते हे पत्र मिळाल्याचा फोटो लगेच ‘व्हायरल’ करता आला असता. ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार गावागावात घुमला असता. मात्र, बंगल्यातला प्रिंटर याच वेळी बिघडलेला. दरम्यान, ‘सीएम’नी बोलावलं म्हणून ‘भाई’ही घाईघाईनं ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. अंधार पडला. अरेरे.. ‘फोटोफ्लॅश’ची खूप चांगली संधी हातून गेली म्हणून सारेच हिरमुसले. त्यातही ‘डिकोळे मेंबर’नी चलाखी केलीच. हे पत्र आपल्या कलेक्टरना व्हाॅट्सॲपवर पाठवून दिलं. ‘सरकार आपलं आहे’, हे प्रशासनाला दाखविण्याची खेळी आजपावेतो केवळ ‘घड्याळ’वालेच करायचे. मात्र, कुर्डूवाडीत ‘संजयमामां’च्या संगतीत राहून-राहून ‘मेंबर’ही बहुधा तयार झालेले. दरम्यान, महसूल अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरही मंत्रालयातून पत्र पडलं. सत्ता बदलली तरीही ‘हितचिंतक’ असलेल्या काही जणांनी लगेच अकलूजलाही पाठवलं. मग काय.. ‘धैर्यशीलभैय्यां’चा कॉल ‘डिकोळें’ना. ‘विजयदादां’चा कॉल ‘अण्णां’ना. ते तिकडून अभिनंदन करू लागले, इकडं मात्र यांची चुळबुळ वाढू लागली. फोटोसाठीही होऽऽ तो मेन कार्यक्रम राहिलाच होता ना अजून. लगाव बत्ती.याचवेळी सुदैवानं प्रिंटर पावला. पत्राची कॉपीही निघाली. एवढ्यात ‘भाईं’चा निरोप आला, ‘सोलापूरच्या मंडळींना वर्षा बंगल्यावर पाठवा.’ सारेच हरखले. मिळेल त्या गाडीनं तिथं पोहोचले. काही जणांना उगाच वाटलं, ‘सीएमच्या हातून हे पत्र मिळणार की काय?’ परंतु, ध्यानीमनी नसताना ताट मिळालं म्हणून जास्तही मांडे खायचे नसतात, हेही यांना समजलं. आतली बैठक संपताच ‘एकनाथभाई’ बाहेर आले. शेजारच्याच एका रूममध्ये पत्र देण्याचा सोहळा रंगला. ‘फ्लॅशाफ्लॅशी’ झाली. सत्ता आल्यानंतर नशिबानं या मंडळींकडं चांगल्या क्वालिटीचे मोबाइलही आलेले, त्यामुळं अंधारातही फोटो व्यवस्थित टिपले गेले. खूप मोठा गड जिंकल्याच्या आवेशात सारेच तोंड भरून हसले. खरंच.. खूप मोठी मोहीम ‘धनुष्य’वाल्यांनी फत्ते केली. लगाव बत्ती.

आधी आमदार..              .. मगच मेंबर !

इकडं अकलूजमध्ये ‘दादां’नीही ‘आपणच बाणवाल्यांना मुंबईला पाठवलं होतं’, असं सांगत मिठाई वाटली. त्यांना या क्षणी क्रेडिट घेण्यात इंटरेस्ट नव्हता.. कारण, ‘कस्संऽऽ नाकावर टिच्चून आदेश काढायला लावला’, असं पुटपुटत एकमेकांना वाटलेल्या गोड पेढ्याचा गंध ‘बारामती’पर्यंत पोहोचणार होता. हीच भावना ‘अकलूजकरां’साठी सुखावणारी होती. लगाव बत्ती... पण ‘अंदर की बात’ म्हणे वेगळीच होती. तिकडं ‘बारामती’तही ‘धाकटे दादा’ गालातल्या गालात हसत होते. कारण, खूप उशिरा मंजूर झालेल्या या नगरपंचायतीची पूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत आगामी विधान परिषद निवडणूकही होणार होती. माळशिरस तालुक्यातील सत्तर-पंचाहत्तर भावी मेंबर या नवीन आमदाराचा चेहरा पाहूनच स्वतःचा वॉर्ड शोधू शकणार होते. विशेष म्हणजे यातली ऐंशी टक्के मंडळी ‘अकलूजकरां’च्याच हक्काची होती.यामुळेच या प्रकरणात ‘कमळ-घड्याळ-धनुष्यबाण’ हे तिघेही आपापल्या दृष्टीनं जिंकले होते. मात्र, या तिघांच्या ‘गेमागेमी’त ‘हात’वाल्यांचा रोल काय, हे काही शेवटपर्यंत ‘पानीव’च्या ‘प्रकाश’ना समजलंच नव्हतं.. कारण, हे ‘पाटील’ आपल्या खुर्चीवर आता ‘म्हेत्रे’ बसणार की ‘हसापुरे’ याच पर्सनल चिंतेत होते. कुणाला काय तर कुणाला काय.. लगाव बत्ती.

( लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा