शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य मिळाले, त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली !

By राजू इनामदार | Updated: August 31, 2022 06:17 IST

Baba Adhav: १४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो.

- डॉ. बाबा आढावज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते१४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो. राष्ट्र सेवा दलाचे काम करायचो. तिथेच समजले की १४ ऑगस्टला पुण्यातून भव्य मिरवणूक निघणार. मध्यरात्री १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरील इंग्रजांचा युनियन जॅक खाली खेचणार व तिथे भारताचा तिरंगा फडकवणार. मंडईतून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा मिरवणुकीचा मार्गही ठरला होता.

आम्हा मुलांना उत्सुकता होती ती युनियन जॅक खाली कसा येतो व तिरंगा वर कसा जातो, ते पाहण्याची. सुदैवाने मिरवणुकीची सर्व व्यवस्था पाहण्याची, म्हणजे त्यात शिस्त ठेवणे वगैरे जबाबदारी नेते मंडळींनी राष्ट्र सेवा दलावर सोपवली. सेवा दलातील कार्यक्रम, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे व यासारख्या नेत्यांची व्याख्याने, चर्चा, सेवा दल सैनिकांना ते देत असलेले धडे यातून मला स्वातंत्र्य चळवळ, देशातील तिचे परिणाम याची बरीच माहिती झाली होती. त्यामुळे १४ ऑगस्टचा प्रसंग ऐतिहासिक असणार हे मला लक्षात आले. आपण त्याचे साक्षीदार व्हायचे, हे मी मनोमन ठरवले.

सायंकाळी टिळक पुतळ्यापासून मिरवणूक सुरू झाली. पुण्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक जात होती. खादीचे कपडे घातलेले लोक शिस्तबद्धतेने मिरवणुकीत चालत होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा सगळीकडे दुमदुमत होत्या. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ असे पुण्यातील देशस्तरावरचे अनेक नेते मिरवणुकीत असल्याचे मला आठवते. रात्री १२ वाजता मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे पाहिले तर युनियन जॅक आधीच काढून घेतला होता. त्यामुळे आम्हाला फक्त तिरंगा वर जाताना व नंतर फडकताना दिसला; पण त्यात आनंद होता. दुसऱ्या दिवशीही म्हणजे १५ ऑगस्टलाही पुण्यात सगळीकडे दिवसभर जल्लोष होता. लोक एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत होते. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात जल्लोष होता. गोडधोड वाटले जात होते. स्वातंत्र्याचा जयघोष होत होता. लोक घोळक्याने फिरून स्वातंत्र्य चळवळीची चर्चा करताना दिसत होते.

त्याकाळात राष्ट्र सेवा दलाने दिलेली शिकवण, पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मला आजपर्यंत प्रेरणा देत राहिला आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर माझे शिक्षण वगैरे झाले. डॉक्टर झालो. काही वर्षे राजकारणातही काढली. नगरसेवक झालो. गरिबांसाठी, समाजातील दीनदलित दुबळ्यांसाठी काम करायचे हे मी ठरवूनच टाकले होते. राजकारण त्याच्या आड येते म्हणून मी नंतर ते सोडूनच दिले. राजकारणातून बाहेर पडलो.स्वातंत्र्य मिळाले, आता त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे मी समजतो. माझे नंतरचे सगळे सार्वजनिक जीवन मी त्यासाठीच व्यतीत केले. तेच आपले ध्येय ठरवले. ‘एक गाव एक पाणवठा’सारखी चळवळ असेल किंवा ‘हमाल पंचायत’, कचरा वेचकांसाठीचे काम असेल हे सगळे त्या प्रेरणेतूनच आले आहे. हमालांसाठी अनेक कायदे करून घेणे त्या चळवळीमुळेच शक्य झाले.

या सर्व चळवळींमध्ये अनेकांची साथ मिळाली. त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही. माणसाला माणसाप्रती सहानुभूती हवी. प्रेम हवे. तेच नसेल तर मग माणूस म्हणवून घेण्यात काय अर्थ, असे मला वाटते. आज वयाच्या ९२ व्या वर्षीही मी गाव तिथे घटनामंदिर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. हे मंदिर असे असेल की तिथे प्रवेश करण्यासाठी कोणालाही मज्जाव नसेल. गावातील कोणीही तिथे जाऊन घटनेचा अभ्यास करू शकेल. त्यात काय म्हटले आहे ते पाहू शकेल. प्रत्येक गावात असे एकतरी मंदिर असावेच, असा माझा प्रयत्न आहे. आमच्या कष्टकऱ्यांच्या शाळेपासून मी याची सुरुवात केली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी काय वाटते, याबद्दल काय सांगू? इंग्रजांबरोबर नाही तितके स्वकियांबरोबरच लढावे लागते आहे. किमान नीट राहता येईल, हा इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सरकारांनी त्यासाठी काम करण्याची गरज आहे. इथे दुसरेच दिसते आहे. कोट्यवधीची संपत्ती साठवून राजकारणी, सरकारी अधिकारी करणार तरी काय? भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. न्याय लवकर मिळत नाही. खटले प्रलंबित राहतात. सरकारी यंत्रणा निगरगट्ट झाल्या आहेत. सरकारकडून अपेक्षा बाळगावी तर आता सरकारच अशा मार्गाने तयार होत आहे की त्याची चीड यावी; पण हरकत नाही. कारण आपण स्वतंत्र आहोत, हेच भाग्याचे आहे. आम्ही लढायला घाबरत नाही. गरिबांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहणार आहे.शब्दांकन : राजू इनामदार, उपमुख्य बातमीदार, लोकमत, पुणे    (लेखमाला समाप्त)

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावIndiaभारत