अभिव्यक्ती अन् अभिरुची
By Admin | Updated: February 1, 2015 02:25 IST2015-02-01T02:25:27+5:302015-02-01T02:25:27+5:30
मानवी संवेदनांची भूक भागवणारी अनेक माध्यमे आज उपलब्ध असतानाही कुठे आणि कसे अभिव्यक्त व्हावे याचे भान अजूनही अनेकांना नाही,

अभिव्यक्ती अन् अभिरुची
मानवी संवेदनांची भूक भागवणारी अनेक माध्यमे आज उपलब्ध असतानाही कुठे आणि कसे अभिव्यक्त व्हावे याचे भान अजूनही अनेकांना नाही, हे अधोरेखित करणाऱ्या काही घटना या आठवड्यात घडून गेल्या. पुण्यात बार कौन्सिलच्या कार्यक्रमात नाटकाचा शो सुरू असताना प्रेक्षकांमधील वकिलांनीच अश्लील शेरेबाजी केल्यामुळे शो बंद करण्याची वेळ आल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आवारात आयोजित केलेल्या माघी गणेशोत्सवानिमित्ताच्या कार्यक्रमात नर्तकीवर पैसे उधळण्याचा प्रकार घडला, तर मीरा रोड येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हिंदी व भोजपुरी गाण्यांवर अश्लील हावभाव असलेल्या नृत्यांचे सादरीकरण केले. या तिन्ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का पोचवणाऱ्याच आहेत. आपली अभिरुची किती हीन पातळी गाठतेय आणि कलेचा निखळ आस्वाद घेण्याइतकी आपली मानसिकता परिपक्वनाही, हेच यावरून दिसून आले आहे.
पुण्यातला प्रकार तर खरोखरच लाजिरवाणा आहे. कायद्याची बूज राखणाऱ्या मंडळींनाच किमान भान राखता आले नाही, हे अस्वस्थ करणारे आहे. त्याहून चीड आणणारे म्हणजे असा प्रकार घडलाच नाही म्हणत ही मंडळी आता चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांच्यावर खटला दाखल करणार आहेत. काही घडलेच नसते तर शो बंद करण्याची कलाकारांवर वेळ आलीच नसती. कारण आग लागल्याशिवाय धूर निघत नाही! कायदेशीर लढाईच्या बाबतीत वकील चाणाक्ष असतात़ त्यामुळे या कसोटीवर यातून पुढे काही निष्पन्न होईल असे वाटत नाही़ मात्र सगळ्याच गोष्टींची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर येईल, या भ्रमातही राहण्याचे काही कारण नाही़ मात्र बुरसटलेल्या मानसिकतेतून कलाविष्काराची झालेली ही चेष्टा आहे. सांस्कृतिक परंपरा आणि अभिरुचीसंपन्न रसिकमनाला या घटनेमुळे निश्चितच धक्का बसला आहे.
या तिन्ही घटना म्हणजे काही अजब घडते आहे, म्हणून त्यांचा कांगावा करण्याचा हा प्रयत्न अजिबात नाहीय. असे प्रकार काही पहिल्यांदाच घडलेले नाहीत. फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात या घटनांकडे पाहिले जावे, एवढाच हेतू आहे. यातून आपणच आपली सांस्कृतिक परंपरा आणि कला यांचे नुकसान करतोय, हे लक्षात येईल. कलेची अभिव्यक्ती आणि रसिकांची अभिरुची याबाबत आपल्या समाजव्यवस्थेचा दृष्टिकोन अतिशय परिपक्व असा आहे. कलेकडे रसिकतेने पाहिले तर त्याचा आस्वाद निखळ आणि निकोपपणे घेता येतो़ मात्र या रसिकतेने मर्यादा ओलांडली की त्या कलेतीलही नकारात्मक बाजू समोर येतात. कोणती कला कुठे सादर केली जावी याचे भान राखले, तर मग कशाकडेच बोट दाखवण्याची वेळ येत नाही. कलेची अभिव्यक्ती आणि रसिकाची अभिरुची या परस्पर पूरक गोष्टी आहेत. त्या योग्यपद्धतीने जुळून आल्या, की तो माहोल आनंद देतो आणि संस्कृतीला, कलानिर्मितीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. म्हणूनच कुठल्या गोष्टीला दोष देत बसण्यात अर्थ नाही, मात्र कोणत्याही पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना आणि अशा कार्यक्रमांसाठी प्रेक्षक म्हणून जाताना सामाजिक भान सर्वांनीच ठेवायला हवे़ तसे झाले तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा लौकिक वाढणारच आहे.
कलेची अभिव्यक्ती आणि रसिकांची अभिरुची या परस्परपूरक गोष्टी आहेत़ त्या योग्य पद्धतीने जुळून आल्या, की तो माहोल आनंद देतो आणि आपल्या संस्कृतीला, कलानिर्मितीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
सांस्कृतिक
परंपरेला
कुठे नेतोय?
काही दिवसांच्या फरकाने महाराष्ट्रात घडलेल्या या तीन घटना, त्या घटनांवरती झालेली चर्चा आणि त्यावरील खुलासे- प्रतिखुलासे हे सगळे ऐकले, पाहिले की नक्की याची जाणीव होते की काहीतरी चुकतेय़
१हे चुकणारे अभावितपणे झाले असे काही म्हणता येणार नाही, कारण या तिन्ही घटना सदसद्विवेकबुद्धी जागी असणाऱ्या माणसांकडून घडल्या.
२कुणी सरकारी कर्मचारी, कुणी एका जबाबदार राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, तर कुणी न्यायमंदिरात न्यायदानाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक, हे समजून घेतल्यानंतर या तिन्ही अप्रिय घटनांमधील गांभीर्य नक्कीच वाढते.
३कुणा दारुड्याने किंवा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीने या घटना केल्या असत्या तर एकवेळ आपण समजू शकलो असतो, पण अशा गोष्टींना येथे काही जागा नाही.
४त्यामुळे या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांनी स्वत:ला एक प्रश्न जरूर विचारायला पाहिजे, की आपण स्वत:ला आणि आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ सांस्कृतिक परंपरेला नेमके कुठे घेऊन जात आहोत?
कल्याण-डोंबिवलीतील प्रकार तर कहरच म्हणावा लागेल. माघी गणेशोत्सवामध्ये लावणी सादर करणाऱ्या तरुणीवर पालिकेच्याच काही कर्मचाऱ्यांनी चक्क पैसे उधळले. मुळात गणपती हीच कलेची देवता आहे. तो नर्तकही होता़ गणेशाचे नृत्य पाहण्यासाठी अनेक देवगण येत असत़ मात्र त्याच गणेशाच्या उत्सवात या कलेची अशी थट्टा व्हावी, यासारखी शोकांतिका नाही. पैशाचा माज, दारूची नशा या धुंदीत या कर्मचाऱ्यांना आपण कोणता उत्सव साजरा करतोय याचे भानच राहिले नाही आणि त्यांच्यातला रंगेलपणा बाहेर पडला.
मीरा रोडचा प्रकार तर आपल्या हीन अभिरुचीचे प्रतिबिंब म्हणावे लागले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अश्लील हावभाव करणारी नृत्ये सादर करण्यात आली. समयसूचकता नावाचा काही प्रकार असतो, कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी करायला हव्यात याची किमान जाण असायला हवी. मीरा रोडच्या या प्रकारात आयोजकांच्या बुद्धिमत्तेची कीवच करावीशी वाटते. तुम्हाला कार्यक्रम आयोजित करायचे आहेत तर जरूर करा, पण त्याला कुठलेही निमित्त जोडून त्या दिवसाचे महत्त्व तरी कमी करू नका, असे आवर्जून या महाभागांना सांगावेसे वाटते. ही नुसती बौद्धिक दिवाळखोरी म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर हा प्रकार संतापजनक आहे.