शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सहकारी बँकांना दिलासा देणारा सर्वोच्च न्यायालयाचा स्वागतार्ह निकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:04 IST

आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यात बँकिंग प्रणालीला मोठी भूमिका अदा करायची आहे. त्यामुळे ही प्रणाली पारदर्शक असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे त्या दिशेने एक पाऊल पडले आहे.

अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या सहकारी बँकांना दिलासा देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. आता सहकारी बँकांनाही ‘सरफेसी’ कायद्यातील तरतुदींचा लाभ घेऊन थकीत कर्जांची वसुली करता येईल. संसदेने २००२ मध्ये आर्थिक मालमत्तांचे प्रतिभूतीकरण तथा पुनर्निर्माण आणि प्रतिभूती हित प्रवर्तन कायदा असे लांबलचक व क्लिष्ट नाव असलेला कायदा पारित केला होता. त्या कायद्याच्या इंग्रजी नावातील आद्याक्षरांचा वापर करून, त्याचे ‘सरफेसी’ असे सुटसुटीत नामकरण करण्यात आले आहे. या कायद्यान्वये संरक्षित धनकोंना ॠणकोंची मालमत्ता ताब्यात घेऊन कर्जाची वसुली करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. प्रारंभी या कायद्याच्या कक्षेत सहकारी बँकांना अंतर्भूत केले नव्हते; मात्र २८ जानेवारी २००३ रोजी परिपत्रक जारी करून सहकारी बँकांनाही १९४९ मध्ये पारित बँकिंग नियमन कायद्याच्या कक्षेत आणले. त्यामुळे आपोआपच सहकारी बँकांना सरफेसी कायदा लागू झाला. दुर्दैवाने त्याला उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या याचिकांवर संबंधित खंडपीठांनी दिलेले निकाल विरोधाभासी असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होऊन, सहकारी बँकाही सरफेसी कायद्याच्या कक्षेत येत असल्याचा निर्वाळा दिला.

या निर्णयामुळे सहकारी बँकांना कर्जांच्या वसुलीसाठी दिवाणी न्यायालये अथवा लवादांचे दरवाजे ठोठावण्याची गरज उरणार नाही. दिवाणी न्यायालये अथवा लवादांपुढे धाव घेण्यात वा सहकारी संस्था कायद्यातील प्रक्रियेचा अवलंब करण्यात होणारा कालापव्यय टाळणे, हाच आमच्या निकालामागील उद्देश आहे, असे घटनापीठाने स्पष्ट नमूद केले आहे. वस्तुत: सहकारी बँकांच्या नक्त अनुत्पादक कर्जांचे प्रमाण रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आतच आहे आणि सरकारी बँकांच्या नक्त अनुत्पादक कर्जांच्या तुलनेत तर खूपच कमी आहे; परंतु सरकारी बँकांना प्राप्त असलेले सरकारचे पाठबळ सहकारी बँकांना मिळत नाही. अनुत्पादक कर्जांमुळे सरकारी बँक बुडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार लगेच मदतीसाठी धाव घेते व त्या बँकेला तारते. सहकारी बँकांसाठी कुणी असा तारणहार नाही. त्यामुळे अनुत्पादक कर्जांमुळे काही सहकारी बँकांवर बुडण्याचीच पाळी येते. यासंदर्भात पंजाब महाराष्ट्र बँकेचे उदाहरण ताजे आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्हा सहकारी बँकांवर अशीच पाळी आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सहकारी बँकांच्या कर्जवसुलीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊन त्यांच्यावर गर्तेत जाण्याची पाळी येणार नाही, अशी आशा आहे.

अर्थात यासंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पूर्वेतिहासावरून असे दिसते की, ज्या अनुत्पादक कर्जांमुळे एखाद्या सहकारी बँकेवर बुडण्याची वेळ आली, ती कर्जे बहुतांश वेळा संचालकांच्या मर्जीनुसार वा संचालकांच्या निकटच्या लोकांना नियम, कायदे धाब्यावर बसवून वाटली होती. अशा प्रकरणांमध्ये सरफेसी कायद्याची अंमलबजावणी करून कर्जांची वसुली करण्यास सहकारी बँका कितपत उत्सुक असतील, हा प्रश्नच आहे. सरकारी बँकांसंदर्भातील पूर्वानुभव असा आहे की, त्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडील कर्जांची वसुली करण्यासाठी सरफेसी कायद्याचा अवलंब करण्यास फार उत्सुक असतात. त्यासाठी प्रसंगी रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वेही धाब्यावर बसविण्यात येतात. उद्या सहकारी बँकाही सरकारी बँकांचा कित्ता गिरवित, मर्जीतील ॠणकोंना संरक्षण देत इतर छोट्या कर्जदारांकडील वसुलीसाठी या कायद्याचा लाभ घेण्याचा धडाका लावू शकतात, जेणेकरून त्यांच्या अनुत्पादक कर्जांचे प्रमाण मर्यादेच्या आत राहावे. इथे रिझर्व्ह बँकेची जबाबदारी वाढते. केवळ सहकारी बँकाच नव्हे, तर सरकारी बँकांनीही मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, याकडे रिझर्व्ह बँकेने काटेकोर लक्ष पुरवायला हवे. शिवाय सहकारी बँकांद्वारे वाटल्या जाणाºया कर्जांवरही बारीक नजर ठेवायला हवी.

आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यात बँकिंग प्रणालीला मोठी भूमिका अदा करायची आहे. त्यामुळे ही प्रणाली पारदर्शक असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्या दिशेने एक पाऊल पडले आहे. आता रिझर्व्ह बँकेला पुढील भूमिका पार पाडायची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना रिझर्व्ह बँकेकडून खºया अर्थाने नियामकाची भूमिका बजाविण्याची अपेक्षा व्यक्त करणे वावगे होणार नाही!

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयbankबँक