शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

संपादकीय: संसदेत मराठी ‘कल्ला’; देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 08:22 IST

मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली!

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने मंगळवारी काही मराठी खासदारांनी लोकसभेत त्यांच्या वक्तृत्व कलेचे जे प्रदर्शन केले, त्यामुळे उभ्या महाराष्ट्राची मान खाली गेली. चर्चेचा विषय, मुद्दे आणि भाषेची मर्यादा यापैकी एकाही बाबीचे भान न बाळगता, केवळ एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचा एककलमी कार्यक्रम त्या खासदारांनी राबविला. उच्च संसदीय परंपरा लाभलेला, देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न त्यामुळे उर्वरित देशाला नक्कीच पडला असावा. काही सन्माननीय अपवाद वगळता, मराठी खासदार हिंदी आणि इंग्रजी भाषेतून संवाद साधताना नेहमीच कमी पडतात. तरीदेखील मराठी खासदार संसदेत मोडकीतोडकी हिंदी बोलण्याचा प्रयत्न का करतात, हे अनाकलनीय आहे.

इतरही अनेक राज्यांतील खासदारांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसते; परंतु ते कधीही त्याचा न्यूनगंड न बाळगता, थेट मातृभाषेतून त्यांचे विचार व्यक्त करतात. आपले बोलणे सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी किती जणांना कळत आहे, याची ते अजिबात तमा बाळगत नाहीत. मी काय बोलतोय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही संसदेत उपलब्ध अनुवाद सेवेचा वापर करा, मी माझ्या मातृभाषेतच बोलेन, असा त्यांचा अभिनिवेश असतो. मराठी खासदार त्यांचा कित्ता का गिरवू शकत नाहीत, हा प्रश्न तमाम मराठी बांधवांना आपल्या खासदारांची संसदेतील भाषणे ऐकताना नेहमीच पडत असावा. आपले म्हणणे सभागृहात उपस्थित बहुसंख्य सदस्यांपर्यंत थेट पोहोचावे, हाच हिंदीतून मतप्रदर्शन करण्यामागील मराठी खासदारांचा हेतू असतो, हे स्पष्ट आहे; पण ते जे मराठीमिश्रित मोडके तोडके हिंदी बोलतात, तेच त्यांच्या हेतूला नख लावते! बरे, स्वत:चे भाषण निवांतपणे पुन्हा ऐकण्याची, बघण्याची सोय उपलब्ध असूनही, आपले खासदार ते करत नाहीत का, असाही प्रश्न पडतो; कारण त्यांनी तसे केले असते, तर एकतर हिंदी भाषेवर मेहनत घेऊन सुधारणा केली असती किंवा मग इतर गैर हिंदी भाषिक राज्यांमधील खासदारांप्रमाणे थेट मातृभाषेत व्यक्त होणे सुरू केले असते. दुर्दैवाने त्यापैकी काहीही होत नाही. त्याचाच अर्थ आत्मपरीक्षण करून स्वत:मधील वैगुण्य दूर करण्याची त्यांना गरज वाटत नाही किंवा मुळात आपण कुठे तरी कमी पडतो, हेच त्यांना मान्य नाही!

संसदेच्या प्रत्येकच अधिवेशनात, काही सन्माननीय अपवाद वगळता, मराठी खासदारांचे हे वैगुण्य उघडे पडत असते. बऱ्याच मराठी खासदारांच्या गाठीशी संसदेचा अनेक वर्षांचा अनुभव आहे तरीदेखील ते या वैगुण्यावर मात करू शकले नाहीत, हे महाराष्ट्राचेच दुर्दैव म्हटले पाहिजे. मराठी खासदारांचा हिंदी अथवा इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचा अभाव आणि मातृभाषेतून बोलण्याचा न्यूनगंड हे नित्याचेच झाले असल्यामुळे त्याकडे एकदाचे दुर्लक्षही करता येईल; पण मंगळवारी संपूर्ण देशाचे लोकसभेतील कामकाजाकडे लक्ष लागलेले असताना, मराठी खासदारांनी मोडक्या तोडक्या हिंदीतून ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते लज्जास्पद आणि अक्षम्य आहे. गावगुंड नाक्यावरील भांडणात जसे शब्दप्रयोग करतात, तसे संसदेत करण्यात आले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर नाथ पै, रामभाऊ म्हाळगी, नानासाहेब गोरे, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मधु लिमये, वसंत साठे, प्रमोद महाजन असे आपल्या वाकपटुत्वाच्या बळावर संसद गाजविणारे एकाहून एक सरस संसदपटू देशाला देणारा हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न इतर राज्यांमधील खासदारांना नक्कीच पडला असावा!

मराठी माणूस संकुचित असतो, तो आपल्या चौकटीच्या बाहेरचा विचार करत नाही, असा आक्षेप नेहमीच घेतला जातो. मंगळवारी चर्चेत सहभागी होताना, मराठी खासदारांनी त्या आक्षेपाला बळ देण्याचेही काम केले. आपण देशाच्या पंतप्रधानांवर अविश्वास व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होतोय, मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली! इतर राज्यांमधील खासदार अत्यंत गंभीर मुद्यांवर चर्चा करत असताना, आपले खासदार मात्र असंसदीय भाषेत कधी काळी सहकारी असलेल्यांची उणीदुणी काढत होते! गत काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर सातत्याने खालावत आहे. मंगळवारी आणखी खालची पातळी गाठली!

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarayan Raneनारायण राणे Arvind Sawantअरविंद सावंत