शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 07:41 IST

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे.

भारतीय न्याय व्यवस्थेला न्यायाप्रतीच्या कटिबद्धतेची प्रदीर्घ परंपरा आहे; परंतु दुर्दैवाने न्याय व्यवस्थाच प्रलंबित खटल्यांच्या चक्रव्यूहात अडकून पडली आहे. तो तोडण्यासाठी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयांची संकल्पना पुढे आली; पण त्यांचाच अभिमन्यू झाला आहे. विधि आणि न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात कार्यरत ८६० जलदगती न्यायालयांमध्ये तब्बल १४ लाख ७५ हजार ६८५ खटले तुंबले आहेत. त्यापैकी १०.८२ लाख एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत, तर त्या खालोखाल सुमारे १.७५ लाख महाराष्ट्रातील आहेत. 

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. गंभीर गुन्हे, महिला व बालकांविरुद्धचे अत्याचार आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या नागरी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना झाली होती. प्रत्यक्षात मात्र जलदगती न्यायालयांमध्येच खटले तुंबणे सुरू झाले आणि बघता बघता या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले. 

जलदगती न्यायालय संकल्पनेच्या या दुर्दशेसाठी कारणीभूत आहे नियमित निधी आणि आवश्यक यंत्रणांचा अभाव! केंद्र सरकारने विशेष जलदगती न्यायालयांसाठी ‘निर्भया फंड’ अंतर्गत निधी दिला असला, तरी जलदगती न्यायालयांसाठी मात्र केंद्राकडून थेट आर्थिक मदत दिली जात नाही. न्याय हा राज्यांचा विषय असल्याचे सांगत, केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलते आणि राज्यांच्या प्राथमिकता वेगळ्या असल्याने ‘न्याय’ हा विषय मागे पडतो. 

चौदाव्या वित्त आयोगाने १,८०० जलदगती न्यायालयांची निर्मिती करण्याची शिफारस केली होती; परंतु सद्य:स्थितीत केवळ ८६० न्यायालयेच कार्यरत असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट दाखवते, की दृष्टी असूनही इच्छाशक्ती कमी पडली! ही केवळ जलदगती न्यायालय संकल्पनेची दुर्दशा नाही, तर हजारो पीडितांची वेदना आहे. 

लैंगिक अत्याचारग्रस्त महिला, बाल पीडित, संपत्तीच्या वादात अडकलेले कुटुंबीय यांना न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. यामुळे केवळ न्यायालयांवरील विश्वासच कमी होत नाही, तर कायद्याचा वचक कमी होण्याचीही भीती असते. त्याशिवाय, पीडित व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण, निर्दोष व्यक्तींची बदनामी व कोठडीतील शारीरिक-मानसिक छळ, व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याने गुंड, दलालांसारख्या घटकांना मिळणारे अनावश्यक महत्त्व, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ, असे बरेच अदृश्य, पण गंभीर दुष्परिणाम आहेत. खटले तुंबू नयेत, न्याय लवकर मिळावा, या हेतूने अस्तित्वात आलेल्या जलदगती न्यायालयांची जर ही अवस्था असेल, तर नियमित न्यायालयांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! 

न्यायालयांपेक्षाही गंभीर अवस्था अर्ध-न्यायिक संस्थांची आहे. एकट्या महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण म्हणजेच ‘मॅट’मध्ये हजारो प्रकरणे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्ती वेतनाशी संबंधित प्रकरणे असतात. त्यामुळे आयुष्यभराची घामाची कमाई उतरत्या वयात गरज असताना हाती येत नाही, अशी अनेक वयोवृद्धांची अवस्था झाली आहे. 

अशा अर्ध न्यायिक संस्थांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीशांची वर्णी लावली जाते. त्यांना सेवानिवृत्तीनंतरही घसघशीत आर्थिक प्राप्ती होत असते; पण गरजू सेवानिवृत्त मंडळींसाठी मात्र आवश्यक ती संवेदनशीलता दाखवली जात नाही. सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवायचा असल्यास, ही परिस्थिती बदलण्याची आत्यंतिक निकड आहे. 

न्याय ही राष्ट्रीय प्राथमिकता असल्याचे लक्षात घेऊन केंद्राने स्वतंत्र निधी तयार करून त्यातून राज्यांना मदत दिली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय व्यवस्थेला गती देण्याचा विचार व्हायला हवा. न्याय व्यवस्थेत पदे रिक्त राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. सोबतच न्यायालयांची संख्या वाढवली पाहिजे. न्यायालये दोन पाळीत चालविण्याच्या काही राज्यांच्या प्रयोगाची आवश्यक त्या सुधारणांसह देशभर अंमलबजावणी करण्याचा विचार व्हायला हवा. 

जलदगती न्यायालयांची बिकट अवस्था हा भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. वेळेत न्याय ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. योग्य धोरणे, निधी आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज जलद न्याय ही संकल्पना फक्त नावापुरती उरली आहे. आता तरी राज्यकर्ते आणि न्याय व्यवस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे; कारण ‘तारीख पे तारीख’च्या वाटेने हाती पडणारा उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार