शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:08 IST

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ...

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला आहे. मद्य व्यवसायावर या निर्णयाचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे असून, त्यांनी सरकारच्या निषेधार्थ १४ जुलैला राज्यभर आंदोलन केले. याशिवाय राज्यात नव्या दारू दुकानांना परवाने देण्याच्या हालचालीही सुरू आहेत. मद्यावरील करातील वाढीचा संबंध थेट राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेशी जोडला जात आहे. सरकार बहिणींचे लाड पुरवण्यासाठी, करवाढीच्या माध्यमातून त्यांचे भाऊ, वडील, पतींच्याच खिशावर डल्ला मारत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यात तथ्य आहेच! ‘लाडकी बहीण’ योजनेवरील मोठ्या खर्चामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याचे संकेत मिळत आहेत. विकास योजनांवरील खर्चात, तसेच इतर कल्याणकारी योजनांच्या अनुदानात एक तर कपात तरी झाली आहे किंवा त्यांची अदायगी तरी लांबणीवर पडली आहे. कंत्राटदारांची देणी थकल्यामुळे त्यांनी कामे बंद केली आहेत. आमदार निधीही अद्याप वितरित झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. अशावेळी सरकार मद्यावरील करात वाढ करत असेल आणि नव्याने दारू दुकाने परवाने देण्याचा विचार करत असेल, तर आरोप तर होणारच; परंतु याला आणखी एक बाजू आहे आणि तीदेखील विचारात घ्यायला हवी.

राज्यात १९७३ नंतर नव्या दारू दुकानांना परवाने दिले गेलेले नाहीत. त्यानंतरच्या तब्बल ५० वर्षांहून अधिक काळात लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली, जीवनशैलीत बदल झाले, शहरीकरण आणि उपभोगवादी संस्कृती रुजली; पण मद्यविक्रीचे कायदेशीर मार्ग काही वाढले नाहीत. त्यामुळे दारू दुकानांसमोरील रस्ते सायंकाळनंतर गर्दीने ओसंडलेले असतात. मद्य विक्रीवर नियंत्रण असायलाच हवे; पण ते योग्य नियोजनातूनच शक्य आहे. नैतिकतेच्या आधारावर नव्या दारू दुकानांना विरोध करायचा असल्यास, मग जुनी दुकाने तरी का सुरू ठेवायची, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि जुनी दुकानेही बंद करणे म्हणजे संपूर्ण दारूबंदी! ते प्रयोग राज्यात, देशात यापूर्वी झाले आहेत आणि दरवेळी त्यांच्या सुपरिणामांऐवजी दुष्परिणामच प्रकर्षाने समोर आले आहेत. आजही गुजरात व बिहार या दोन राज्यांत आणि महाराष्ट्रातील वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यांत दारूबंदी लागू आहे. प्रत्यक्षात उपरोल्लिखित राज्ये व जिल्ह्यांत हवी तेवढी दारू, हवी तेव्हा उपलब्ध होते, फक्त पैसे तेवढे जास्त मोजावे लागतात! ज्या गरिबांची तेवढी ऐपत नसते ते मग हातभट्टीकडे वळतात आणि मग त्यातूनच विषारी दारूने डझनावारी लोक मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटना घडतात! यामध्ये सरकारचा महसूल बुडतो आणि दुसरीकडे काही राजकीय पुढारी, काही सरकारी अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे मात्र चांगलेच उखळ पांढरे होते! शिवाय गुन्हेगारीत लक्षणीय वाढ होते.

थोडक्यात, संपूर्ण दारूबंदी ही कितीही आदर्श स्थिती असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे अत्यंत कठीण आहे. महाराष्ट्र सरकारला २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मद्यावरील करांमधून मिळतो आणि करवाढीनंतर तो ४० हजार कोटींच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे. विविध कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षणासारख्या सुविधा, तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा महसूल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मद्यावरील कराची वसुलीही इतर करांच्या तुलनेत सोपी असते. त्यामुळेच पैशाची कमतरता भासताच, सरकारची वक्रदृष्टी सर्वप्रथम मद्य व्यवसायाकडे वळते; पण महसूल मिळतो म्हणून मद्यसेवनाला प्रोत्साहन देणेही योग्य नाही. उलट सरकारने मद्यसेवनाच्या दुष्परिणामांविषयी  सातत्याने जनजागृती केली पाहिजे आणि अंतिम निर्णय मात्र नागरिकांच्या सद्स‌द‌्‌‌विवेकबुद्धीवर सोडला पाहिजे.

नागरिकांच्या निवडीचा सन्मान राखून नियंत्रित व्यवस्था ठेवणे हीच वास्तववादी भूमिका ठरते. उद्या नव्या दारू दुकानांना परवाने देण्याचा निर्णय झालाच, तर त्याकडे मद्यसेवनाला प्रोत्साहन म्हणून नव्हे, तर अनधिकृत विक्रीला आळा घालण्याचे साधन म्हणून बघायला हवे. कोणत्याही गोष्टीवर संपूर्ण बंदी लादल्याने इप्सित साध्य होत नाही, तर जबाबदार नियमनानेच सर्व घटकांचे भले होऊ शकते, याचे भान सगळ्यांनीच बाळगणे आवश्यक आहे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना