नव्या युगाच्या 'डिजिटल फॅक्टरीज' आणि 'इंटेलिजंट ब्रेन'! डेटा सेंटर्सचे वरदान की पर्यावरणाचा शाप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:14 IST2025-12-19T09:13:06+5:302025-12-19T09:14:03+5:30
डेटा सेंटर्स ही आधुनिक जगाची मेंदू प्रणाली मानली जाते. सामान्यांच्या जीवनात यामुळे क्रांती घडेल. पण, त्याचे पर्यावरणीय धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत.

नव्या युगाच्या 'डिजिटल फॅक्टरीज' आणि 'इंटेलिजंट ब्रेन'! डेटा सेंटर्सचे वरदान की पर्यावरणाचा शाप?
डॉ. दीपक शिकारपूर
अभियंता व माहिती तंत्रज्ञान अभ्यासक
२१व्या शतकात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' ही मानवजातीच्या विकासाची एक नवी दिशा ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. या तंत्रज्ञानाचा पाया म्हणजे डिजिटल डेटा आणि तो साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणकीय यंत्रणा डेटा सेंटर्स म्हणून ओळखली जाते. विशेषतः एआय डेटा सेंटर्स ही आधुनिक जगाची मेंदू प्रणाली मानली जाते. ही केंद्रे केवळ माहिती साठवत नाहीत, तर ती विश्लेषित करून भविष्याचे निर्णय घेण्यास मदत करतात.
ही डेटा सेंटर्स येत्या काळात मानवी जीवनात अक्षरशः आमूलाग्र बदल घडवणार आहेत. पण, त्याचे पर्यावरणीय धोकेही मोठ्या प्रमाणात आहेत, त्याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. यामुळे इंटरनेटवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. 'डिजिटल फॅक्टरी' आणि 'इंटेलिजंट ब्रेन' म्हणून ती काम करतील, व्यवसायाच्या अगणित संधी निर्माण होतील, 'सेल्फ-रिपेअरिंग' सिस्टीम्स जागोजागी दिसतील. एआय डेटा सेंटर्स म्हणजे अशी अत्याधुनिक केंद्रे जिथे हजारो शक्तिशाली सर्व्हर्स, सुपरकॉम्प्युटर्स, नेटवर्क डिव्हाइसेस आणि स्टोरेज सिस्टीम्स एकत्र काम करतात.
एआय डेटा सेंटर्सची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ती कधीही बंद होत नाहीत. दिवसरात्र सतत सुरू राहतात. उच्च दर्जाची सुरक्षा प्रणाली यात वापरलेली असते. अनेक ठिकाणी रोबोटिक सिस्टीम्स वापरून देखभाल केली जाते. असे असले तरी याचे पर्यावरणीय धोकेही मोठ्या प्रमाणावर आहेत. डेटा सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणात वीज वापरतात. ही वीज प्रामुख्याने कोळशावर आधारित असते. त्यामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते. ग्लोबल वॉर्मिंगला
चालना मिळते. कूलिंग सिस्टीमसाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. दुष्काळग्रस्त भागांवर गंभीर परिणाम होतो. डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतात, जी वातावरणाचे तापमान वाढवते. डेटा सेंटर्समुळे ई-कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. जुने सर्व्हर्स, केबल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे फेकली जातात, ज्यामुळे विषारी घटक जमिनीत मिसळतात.
भविष्यात एआय डेटा सेंटर्स ही केवळ सर्व्हर ठेवण्याची ठिकाणे न राहता, ती 'डिजिटल फॅक्टरीज' आणि 'इंटेलिजंट ब्रेन्स' म्हणून काम करतील. येत्या १०-२० वर्षात बहुतेक डेटा सेंटर्स सौर, पवन व जलविद्युत ऊर्जेवर चालतील. 'कार्बन-न्यूट्रल' आणि 'नेट-झिरो' डेटा सेंटर्स ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. भारतासारखा सूर्यप्रकाश विपुल असलेला देश या क्षेत्रात आघाडी घेऊ शकतो. मोठ्या, केंद्रिकृत डेटा सेंटर्ससोबतच लहान, स्थानिक 'मायक्रो डेटा सेंटर्स' वाढतील. त्यामुळे डेटा प्रोसेसिंगचा वेग वाढेल आणि इंटरनेटवरील भार कमी होईल.
भविष्यात एआयसाठी क्वांटम कॉम्प्युटर्स आणि मानवी मेंदूसारखे काम करणारे 'न्यूरोमॉर्फिक चिप्स' वापरात येतील. यामुळे एआयच्या क्षमतांमध्ये अभूतपूर्व वाढ होईल. एआय स्वतःच आपल्या डेटा सेंटर्सची देखभाल आणि दुरुस्ती करेल. 'सेल्फ-रिपेअरिंग' सिस्टीम्स सामान्य होतील. भविष्यात केवळ शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण व अर्ध-ग्रामीण भागातही डेटा सेंटर्स उभारले जातील, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डिजिटल होईल. भारतासाठी एआय डेटा सेंटर्स हे केवळ तंत्रज्ञानाचे क्षेत्र नसून राष्ट्रीय विकासाचे सामरिक साधन बनत आहेत.
भविष्यात एआय डेटा सेंटर्स हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार आहेत. या क्षेत्रामुळे केवळ मोठ्या कंपन्यांनाच नव्हे तर सामान्य तरुण, स्टार्टअप्स आणि लघुउद्योजकांनाही अमाप संधी मिळणार आहेत. योग्य धोरणे, नवकल्पना आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारल्यास भारत जागतिक एआय आणि डेटा सेंटर्सचे हब बनू शकतो. एआय डेटा सेंटर्स हे आधुनिक जगाचे आधारस्तंभबनले आहेत. ते विकासाचे प्रभावी माध्यम आहेत; पण पर्यावरणीय धोके आणि सामाजिक आव्हानेही निर्माण करतात. योग्य नियोजन, पर्यावरणपूरक धोरणे आणि मानवी मूल्यांची जपणूक केल्यास एआय डेटा सेंटर्स मानवजातीसाठी वरदान ठरू शकतात.