देवेंद्र - एक स्वागतार्ह सुरुवात

By Admin | Updated: November 3, 2014 02:04 IST2014-11-03T02:04:19+5:302014-11-03T02:04:19+5:30

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी वयाच्या ४४ व्या वर्षीच महाराष्ट्राचे २७ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणे ही कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी स्वागतार्ह सुरुवात म्हणावी लागेल.

Devendra - a welcome start | देवेंद्र - एक स्वागतार्ह सुरुवात

देवेंद्र - एक स्वागतार्ह सुरुवात

विजय दर्डा - (लोकमत पत्र समूहाचे एडिटर इन चीफ )

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी वयाच्या ४४ व्या वर्षीच महाराष्ट्राचे २७ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणे ही कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी स्वागतार्ह सुरुवात म्हणावी लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असे काही गुण आहेत, ज्यामुळे ते गेली १५ वर्षे विशिष्ट तऱ्हेच्या राजकारणात अडकलेल्या या राज्याला बाहेर काढून नवी सुरुवात करू शकतील, असा विश्वास वाटतो. त्यांच्यावर राजकारणी लोकांपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत आणि सेलिब्रिटिजपासून सामान्य लोकांपर्यंत अनेकांनी जो स्तुतिसुमनांचा वर्षाव केला तो हीच भावना व्यक्त करणारा आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेला त्यांचा शपथविधी सोहळा एवढा भव्य होता की, तो सोहळा टाळू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सारख्यांनादेखील समारंभाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण टाळता आले नाही. ही गोष्ट बरीच बोलकी आहे.
आजच्या आयफोन आणि आयपॅडच्या आधुनिक जगताशी ते जुळलेले आहेत. जवळजवळ १५ वर्षे ते लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणात आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना यथार्थ जाणीव आहे. मग ते लोडशेडिंग असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, त्यांना प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आपल्या लोकशाही व्यवस्थेला कायमची चिकटलेली बाबूमंडळी त्यांना प्रश्न सोडविण्याचे उपाय सांगतील; पण त्या प्रश्नांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन मात्र त्यांना बदलता येणार नाही. अर्थात ही चांगली गोष्ट म्हटली पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रश्नांची मूळ समज असणे मुख्यमंत्र्यांसाठी गरजेचे असते आणि देवेंद्र यांच्याजवळ ती समज आहे.
त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि कौटुंबिक वारसा यांचीही त्यांना मदत होणार आहे. त्यातच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची निवड केली आहे. त्यामुळे नि:संदिग्धपणे सध्या ते राज्यातील सर्वशक्तिमान राजकीय नेते आहेत. याउपर त्यांना भाजपाच्या विचारधारेचे सूत्रधार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशीर्वाद लाभले आहेत. याहून आणखी काय हवे? त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल वादच नाही. कारण, ते गंगाधरराव फडणवीसांसारख्या निरलसपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे पुत्र आहेत. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणाचे ते कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यामुळेच उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते सतत लढा देत आले आहेत.
सध्या एकच समस्या त्यांच्यासमोर आहे. ती म्हणजे २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत त्यांच्या पक्षाला बहुमत नाही; पण ही व्यवस्थापन समस्या आहे. अनेक मुख्यमंत्र्यांपुढे ती होती. (काहींनी या समस्येचा लाभही घेतला आहे.) पण, त्यामुळे राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यात अडचण येणार नाही. उलट त्यातूनच या आकड्यांच्या खेळाचे योग्य उत्तर सापडणार आहे. त्यांनी घेतलेले निर्णय असे असायला हवेत की, ज्याना विरोध करणे कुणालाही अवघड जावे. देशावर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी राज्य करतात, असे आपल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मानले जाते. देवेंद्र यांच्यात प्रशासकीय गुण असल्याचा कोणताही पुरावा आपल्याजवळ नाही. त्यामुळे देवेंद्र यांना महाराष्ट्राच्या जनतेला ही क्षमता दाखवावी लागणार आहे.
आता सर्वांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाकडे वळू या. या प्रश्नाकडे अलीकडच्या काळात त्यांचे लक्ष वेधले गेले होते आणि हा प्रश्न त्यांच्या भावनांशी निगडित आहे. तो आहे विदर्भ राज्याचा प्रश्न! देवेंद्र हे विदर्भातून (त्यांचे कुटुंब चंद्रपुरातून आलेले आहे.) पुढे आले असून, ते ख-या अर्थाने नागपूरकर आहेत. आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असल्यामुुळे, त्यांनी विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागणे अपेक्षित नाही... पण तरीही त्यांच्याकडून काही न्याय्य अपेक्षा मात्र आहेत. प्रशासनातील विदर्भविरोधी मनोवृत्ती कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न करून, या प्रदेशाला झुकते माप द्यावे, अशी अपेक्षा आहे. हा विदर्भाच्या बाजूने पक्षपात ठरणार नाही, उलट त्यामुळे हे राज्य निर्माण होत असताना विदर्भाला देण्यात आलेल्या; पण नंतर अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांची पूर्तता होऊ शकेल. विदर्भातील जनतेने या निवडणुकीत भाजपाला भरपूर पाठिंबा दिला आहे. (६२ पैकी ४२ जागा या पक्षाला मिळाल्या आहेत.) हा पक्ष लहान राज्यांचा समर्थक आहे व त्याचा फायदा विदर्भाला होईल, या अपेक्षेनेच हा पाठिंबा दिला आहे. स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी अन्य राजकीय कारणे असावी लागतात आणि ती निर्मिती घाईघाईत करता येणार नाही हे खरे आहे; पण आजवर ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून विकासाचा समतोल साधला जाईल, अशी अपेक्षा आहे. विदर्भाचा एक पुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळे विदर्भाने सध्या जल्लोष केलाच पाहिजे; पण काही अपवाद सोडले, तर विदर्भातील राजकीय नेते निवडणुकीत दिलेली आश्वासने नंतर विसरून जातात, असा अनुभव आहे. फक्त सत्तेबाहेर असतानाच त्यांना विदर्भ आठवतो. तेव्हा देवेंद्र यांनी या श्रेणीत बसू नये, अशी अपेक्षा आहे. ते याबाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारण्यांसारखे वागून ते विदर्भाचे देणे चुकते करतील अशी आशा करू या.
त्यांच्याविषयी या तऱ्हेची अपेक्षा बाळगायला आणखी एक कारण आहे. त्यांची पत्नी अमृता यांनी त्यांचा शपथविधी झाल्यानंतर ‘फेसबुक’वर म्हटले आहे, ‘‘राज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री असल्याबद्दल देवेंद्र तुमचे अभिनंदन! आता खऱ्या कसोटीचा काळ आहे. राज्याची खरी सेवा तुम्ही आजपासून करणार आहात. तुम्हास शुभेच्छा.’’ पाठीमागे कटकारस्थाने करणाऱ्या आणि केवळ नेटवर्किंगवर अवलंबून असलेल्या आजच्या राजकीय नेत्यांपेक्षा वेगळ्या असलेल्या नेत्याच्या त्या पत्नी असून, त्या बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे ह्लआता खरा कसोटीचा काळ आहेह्व या शब्दांना वेगळेच महत्त्व आहे. आपल्याला पत्नीच्या या शब्दांना सार्थ करायचे आहे, हे देवेंद्रना ठाऊक आहे. मुख्यमंत्र्याची पत्नी या नात्याने मिळणाऱ्या सन्मानाने त्यांना भुरळ पाडलेली नाही, त्यांनी बँकेतच काम करण्याचे ठरवले आहे ही चांगली गोष्ट आहे.

Web Title: Devendra - a welcome start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.