Afghanistan: फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा

By विजय दर्डा | Published: August 23, 2021 07:48 AM2021-08-23T07:48:24+5:302021-08-23T07:51:45+5:30

Afghanistan Fashion Story: ५० वर्षांपूर्वीचा आधुनिक, फॅशनवेडा अफगाणिस्तान अंधाऱ्या खोलीत बंद आहे.  दिलदार देशाला वाऱ्यावर सोडून अख्खे जग गुळणी धरल्यासारखे गप्प आहे !

The dark journey from fashion to the bullet of Afghanistan because of Taliban in last 50 years | Afghanistan: फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा

Afghanistan: फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा

Next

-  विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अफगाणिस्तानातीलतालिबानांच्या कब्जातील प्रदेशात महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल याच स्तंभात लिहिले होते. ‘या अत्याचाराविरुद्ध जग गप्प कसे राहू शकते?’- असा प्रश्न मी विचारला होता. त्यावेळी अशी पुसट शंकासुध्दा मनाला शिवली नव्हती,  की महिनाभरात तालिबान काबूलच्या राजवाड्यावर कब्जा करतील, देशाचे राष्ट्रपती देश सोडून पळून जातील... पण हे सगळे घडले आहे. पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान  तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. आता किती लोक  क्रौर्याची शिकार होतील, किती मुली तालिबान्यांच्या वासनेला बळी पडतील हे सांगता येत नाही. अफगाणिस्तान पुन्हा एकवार अंधाऱ्या कोठडीत ढकलला गेला आहे. (Afghanistan Fashion Before Soviet and Taliban Was Extremely Modern And Free)

हालअपेष्टा अफगाणिस्तानच्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत. आधी इंग्रजांनी लुटले, नंतर रशिया घुसला. रशियाचे वर्चस्व येथे राहू नये म्हणून अमेरिकेने तालिबानला केवळ प्रशिक्षण नव्हे तर पैसे, शस्त्रास्त्रे पुरवून पोसले. गाव अन् गाव हत्यारबंद झाले. आजही तेथे भाजीबाजारासारखी शस्त्रांची मंडई भरते. सगळी अत्याधुनिक हत्यारे या मंडईत मिळतात.
एके काळी हिंदुकुश पर्वतराजीत प्रेमाचे स्वर, सलोख्याची बासरी ऐकू येत असे. आज ती धून बदलली आहे. १२-१५ वर्षांची मुले एके ४७ घेऊन फिरतात. टोळ्या हुकुमत गाजवतात. रक्ताची होळी खेळली जाते.

रशिया तर इथून निघून गेला खरा, पण अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा झाला. अल कायदाचा सेनापती ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला तेव्हा संतापलेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानवर चाल केली. लादेनला त्यांनी पाकिस्तानातील एबटाबादमध्ये मारले, पण मोठे युद्ध खेळूनही अफगाणिस्तानातील तालिबान्यांचा खातमा काही अमेरिकेला करता आला नाही. कारण पाकिस्तान आणि चीन तालिबान्यांचे साहाय्यक झाले होते. दहशतवाद्यांचा उपयोग ते भारताविरुद्धही करत होते. पण अमेरिका काही करू शकली नाही, कारण आपल्याच देशातल्या प्रश्नांनी ती त्रस्त होती. आपण काय जगाचा ठेका घेतलाय का?- असा प्रश्न तिथली जनता उघडपणे विचारू लागली होती. अफगाणिस्तानची लढाई व्हिएतनामसारखी होईल अशी भीती व्यक्त होत होती.

शेवटी, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तालिबानबरोबर दोह्यात शांततेची बोलणी सुरू झाली. पण तालिबान्यांचे अनेक गट आहेत. बोलणी करायची तर कोणाशी? कोंडी फुटलीच नाही आणि ज्यो बायडेन सत्तेवर आल्यावर त्यांनी घाई केली. आश्चर्य म्हणजे अफगाणिस्तानच्या सरकारला चर्चेत घेतलेच गेले नाही. अमेरिकेला तालिबान्यांसमोर अनेक अटी ठेवता आल्या असत्या, पण ‌ अमेरिकेलला तेथून पळण्याची घाई झाली होती. तालिबान्यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी अमेरिका तेथून जाण्याच्या आतच देशावर कब्जा 
केला. 

अमेरिकेने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे शंका येते की हे संगनमताने तर नाही झाले? तालिबान्यांना संपवायला अमेरिका आली होती; तर  मग त्यांच्या जबड्यात अफगाणिस्तानला ढकलून ती गेली कशी?
मागच्या वीस वर्षांत अफगाणिस्तानची सर्वात मोठी नदी हेलमंदमधून पुष्कळ पाणी आणि रक्त वाहिले. लोकांचे नशीब मात्र बदलले नाही.  युद्ध होते तेव्हा त्याची पहिली शिकार होतात महिला आणि मुली! मलालाची गोष्ट जुनी नाही. मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरल्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. तालिबानी कब्जातील अफगाणिस्तानात मुलींचे जीवन पुन्हा संकटात सापडले आहे. विमानतळावर महिला त्यांच्या मुलांना जीवदान मिळावे म्हणून सैन्याकडे फेकत असल्याच्या भयावह दृश्यांनी जगाचा थरकाप उडवला आहे. घनी  सरकारच्या काळात जागतिक बँक, आशियाई बँकेने युवकांना रोजगार, मुलांना शिक्षण, खेळ यासाठी मदत केली. ते सगळे प्रयत्न वाया गेले. शेतीबिती तर तिथे काही नाही. तरुणांनी मग करावे काय? भारतापुरते बोलायचे तर ३ अब्ज डॉलर्स आपण तिथल्या विकासावर खर्च केले आहेत. भारताने बांधून दिलेल्या संसद भवनात आता तालिबान्यांची वर्दळ असेल. तालिबान्यांशी ताळमेळ बसवणे आपल्यासाठी सोपे नाही. भारताने काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. तालिबान्यांच्या राजवटीला मान्यता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हे कट्टर लोक अखेरीस पाकिस्तानचीच भाषा बोलतील. अफगाणिस्तानविषयीच बोलायचे तर तेथे ५० वर्षांपूर्वी होते, तसे दिवस पुन्हा येतील का? त्यावेळी हा देश फॅशनचे केंद्र होता. फॅशनविषयक अनेक प्रकाशने तेथून निघत. फॅशन शो होत. युरोपियन देशांतील महिलांसारखा पोशाख तिथल्या महिला करत. मोहम्मद कायुमी नामक व्यक्तीने त्यावेळची छायाचित्रे काढून ठेवली आहेत. महिला पेन्सिल सँडल, स्कर्ट आणि फॅशनेबल शर्ट घालत असत. विद्यापीठांच्या आवारात चैतन्य असायचे. थिएटर्स गजबजलेली असत. मुली जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे होत्या. १९९६ ते २००१ या काळात तालिबान्यांनी हा देश मध्ययुगात ढकलला... आणि आता ते पुन्हा आले आहेत. 

अफगाणिस्तान, तू आम्हाला माफ कर. चंद्रावर झेंडा फडकवणारी, अंतराळात सैर करणारी, मंगळावर पाणी शोधणारी ही दुनिया तुझ्यासाठी काही करू शकत नाही. उलट बलाढ्य राष्ट्रांनीच तुझी ही अवस्था करून ठेवली आहे.. आता या काळ्या रात्रीतून तुलाच बाहेर यावे लागेल. धैर्य ठेव, हिंमत हरू देऊ नकोस, अंतरातील ऊर्जा इतकी जागव की, तो उजेड काळरात्रीला नेस्तनाबूत करून टाकील.

Web Title: The dark journey from fashion to the bullet of Afghanistan because of Taliban in last 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.