शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेच्या सक्त-वसुलीसाठीची दांडगाई आवरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:45 IST

अयोध्येचे राम मंदिर हे समस्त देशवासीयांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. पण, पैसा आणि राजकारणाने प्रभू श्रीरामाभोवतीचे वलय विटाळता कामा नये.

- पवन वर्मा

अयोध्येचे राम मंदिर लोकांकडून निधी गोळा करून उभारले जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. १९५१ साली याच धर्तीवर सोमनाथ मंदिराची उभारणी करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेलांनी मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला होता आणि त्याला गांधीजींची संमती होती. मात्र सरकारी तिजोरीवर भार टाकण्याऐवजी सार्वजनिक देणग्यांतून मंदिर उभारले जावे, अशी सूचना गांधीजींनी केली. ती अर्थातच मान्य करण्यात आली आणि पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री कन्हैयालाल मुन्शी यानी निधीसंकलन करून मंदिर निर्माणात महत्त्वाची भूमिका निभावली.

राममंदिर निर्माणात हेच प्रारूप आचरले जात असल्याचे कळते. रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे कार्यकर्ते जनतेशी संपर्क साधून निधी जमवत आहेत. सर्वसामान्य हिंदू नागरिक उत्स्फूर्तपणे पैसे देताना दिसतात. अनेक  बिगर हिंदूंचीही निधी देण्याची इच्छा असू शकते. हे निधीसंकलन जोपर्यंत ऐच्छिक असेल तोपर्यंत त्याला व्यापक जनाधार मिळेल आणि काही समस्याही उद्भवणार नाही.मात्र काही ठिकाणी सक्ती केली जात असल्याच्या, अस्वस्थ करणाऱ्या वार्ता आहेत.

‘भक्त’ म्हणवणाऱ्यांचे जथ्थे  निवासी वसाहती आणि गृहनिर्माण वसाहती विंचरून काढत असून रहिवाशांकडून मिळणारा प्रतिसाद व त्यांनी दिलेल्या निधीच्या रकमेवरून त्यांचे मूल्यमापन करीत असल्याचे वृत्त आहे.  ज्यांनी निधी दिला आहे, त्यांच्या दारावर स्टिकर लावले जात असून ज्यांनी तो दिलेला नाही अशांना एक प्रकारे अलग पाडले जात आहे. अशी कृती दाट गर्दीच्या लोकवस्तीत जे ‘पूर्णत:’ हिंदू नाहीत किंवा ज्यांनी आपली रामभक्ती ‘योग्यरीत्या’ दाखवलेली नाही, अशांकडे बोट दाखविण्याचे काम करील. या लोकांना मग धर्मद्वेष्टे ठरवून समाजातून बहिष्कृत करण्यासाठी पावले उचलणे सोपे होते.

जर हे वृत्त खरे असेल तर ते चिंताजनक आहे. मंदिर उभारणीच्या नेक कार्याला जमावाकडून खंडणी उकळण्याचा रंग लागता कामा नये. बहुसंख्य हिंदूंसाठी राम हे आराध्य दैवत असून ते निधी देतीलही; पण, जर कुणाला अपरिचित व्यक्तींकडे पैसे द्यायचे नसतील तर? किंवा आपण दिलेल्या पैशांचे योग्य हस्तांतरण होईल की नाही याबाबतची पुरेशी खात्री त्यांच्या मनात नसेल तर? अगदी निधीसंकलनासाठी आलेल्यांविषयी काही शंका असतील तर देणगी न देऊ इछिणाऱ्यांवर सक्ती करता येणार नाही किंवा त्यांच्या नकारामुळे त्यांना दंडही करता येणार नाही. ज्यांनी निधी दिलेला नाही त्यांच्या दारावर स्टिकर लावणे वा काही खूण करणे ही चिथावणीखोर कृत्ये आहेत.

हिंदू धर्म हा मूलत: स्वेच्छेने स्वीकारण्याजोगा धर्म आहे.  आपण मंदिरात गेल्यावर तिथल्या फंडपेटीत- मग ती अगदी देवापुढे का ठेवलेली असेना- पैसे टाकण्याची सक्ती आपल्यावर नसते. काही हिंदू रामापुढे नतमस्तक होतात, काहींना शिवभक्ती करावीशी वाटते तर काहींना देवीमाहात्म्य प्रिय असते. अर्थात या सर्व देवादिकांचा मूलस्रोत एकच सर्वव्यापी आणि संपूर्ण असा जगन्नियंता आहे, असेही हा धर्म मानतो. तीच ती निर्गुण निराकार अशी शक्ती. मात्र हिंदूधर्मात या निर्गुण देवतत्त्वाला सगुण - साकार रूपात पूजण्याचीही प्रथा आहे. सगुण रूपात एकाच देवाची भक्ती करावी, अशीही काही सक्ती नाही. एखादी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार हव्या तितक्या देवांना भजू शकते वा कोणत्याही एका दैवताला प्राधान्य देऊ शकते.

उदाहरणार्थ बंगालात दुर्गामातेचे भक्त असंख्य आहेत. तिथल्या एखाद्या गरीब हिंदूने आपल्या अल्प उत्पन्नातली काही रक्कम राम मंदिरास देण्याऐवजी दुर्गापूजेसाठी दिली तर त्यात काही गैर आहे काय? आणि या कृतीतून संबंधित कोणता प्रघात पाडू पाहाताहेत? आज राम मंदिराच्या निर्माणासाठी पैसे मागितले जात आहेत. उद्या रामनवमीसाठी निधी गोळा करायला कुणी आले तर त्यांना अडवणार कोण? दसऱ्याला काही कार्यक्रम करतो आहोत म्हणून या लोकांचे जथ्थे दारात ठाकले तर आपल्या दारावर खूण केली जाईल, या भयाने ते मागतील तितकी रक्कम लोकांनी मुकाट्याने द्यायची की काय? परंतु सध्या असे प्रकार होताहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांना तर ठेच पोहोचते आहेच, पण या माध्यमातून  गुंडगिरीलाही खतपाणी मिळते आहे. हे प्रकार तातडीने बंद करायला हवेत.

पैशांची मागणी करण्याच्या या आक्रमक पद्धतीच्या विरोधात काही मातब्बर राजकारण्यांनीही आवाज उठवला आहे. धार्मिक आयोजनांसाठी सक्ती आणि बेकायदा दबाव आणणे अत्यंत गैर आहे. याविरोधात सरकार काय कारवाई करणार हा प्रश्न उपिस्थत केला जातो आहे. दीनदयाळ, कृपाळू आणि मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रीरामाचा उपयोग आक्रमक हिंदुत्वाच्या प्रसारासाठी होणे, ही खरी चिंतेची बाब आहे.  हिंदुत्वाच्या मूलतत्त्वांचा हा  अधिक्षेपच म्हटला पाहिजे.  इतरांनी ‘चांगले’ हिंदू होण्यासाठी काय करावे याचे दिशानिर्देशन करणाऱ्या या आक्रमकांनाच मुळांत हिंदू धर्माची मूलतत्त्वे  समजलेली नाहीत. त्यांच्या या आक्रमकतेला निरक्षरतेने वेढलेल्या सनातनी जातीयवादाचा आणि पुरुषसत्ताक रुढीपरंपराच्या हव्यासाचा दुर्गंध येतो. हिंदू धर्म आपल्या अनुयायांना निरिश्वरवादी, एतेश्वरवादी, बहुईश्वरवादी, अद्वैतवादी, अज्ञेयवादी म्हणून तसेच याहून वेगळ्या अशा एका वा अनेक विचारधारांनुसार जगण्याचे स्वातंत्र्य देतो. देव सर्वव्यापी असूनही अमुक एका ठिकाणीच त्याचे अस्तित्व नाही, असे म्हणत मंदिरात न जाणाऱ्यांचेही स्वातंत्र्य तो मान्य करतो.

पैसा आणि राजकारणाने प्रभू श्रीरामाभोवतीचे वलय विटाळता कामा नये. ज्यांना श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी द्यायचा असेल त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करावा, त्याची इलेक्ट्रॉनिक पावती दिली जाईल; असे  स्पष्ट निर्देश सरकारने द्यायला हवे होते. महागाईचा भडका उडालेल्या सद्य:स्थितीत आपल्या कष्टांच्या कमाईचा विनियोग खरोखरच राममंदिराच्या उभारणीसाठी होतो की नाही हे दात्यांना कळावे यासाठी काही पारदर्शी यंत्रणा कार्यान्वित करणेही आवश्यक होते. विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरित झालेल्यांचे आक्रमक जथ्थे आपले मंदिर उभारण्यासाठी पैसे गोळा करतील आणि त्याचा विनियोग संदिग्धतेच्या आवरणात असेल याची कल्पनाही प्रभू श्रीरामाने केली नसेल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या