शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पोटातल्या आगीतून घडणारे गुन्हे..

By किरण अग्रवाल | Updated: February 10, 2022 07:00 IST

Editors view :पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलीकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते.

- किरण अग्रवाल

भावनांशी संवेदना निगडित असतात, त्यांना हळवेपणाचा किंवा अलवारतेचा पदर लाभलेला असतो, त्यामुळे त्यात तडजोडीचा विचार करता येऊ नये, हे खरेच; परंतु जेव्हा परिस्थिती बिकट बनून जाते, तेव्हा संवेदनांचा बाजार मांडला जातोच, शिवाय भावना काखोटीस मारून व्यवहाराचे सौदे केले जातात. असे प्रकार कारुण्य, कणव जागवणारे असतात, तसेच शोचनीय व दुर्दैवी म्हणवणारेही असतात; परंतु ते रोखणे अवघड असते, कारण त्यास कायद्याच्या चौकटीत मोडणाऱ्या गुन्हेगारीकरणाखेरीज दारिद्र्यातून आकारास आलेल्या मजबुरीसारखे इतर अनेक पदर लाभलेले असतात. रुपया-पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री करण्याचे जे प्रकार अलीकडच्या काळात वाढलेले दिसत आहेत, त्याकडेही याच दृष्टिकोनातून पाहता येणारे आहे. या प्रकारांचे समर्थन कुणीही करणार नाही; परंतु समाजाच्या आर्थिक व मानसिक अवनतीच्या संदर्भाने त्याचा विचार होणे गरजेचे ठरावे.

 

एकीकडे अपत्यप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्यांची वैद्यकीय प्रगत तंत्र असणाऱ्यांच्या दारी गर्दी वाढत असताना दुसरीकडे आहेत ती अपत्ये चक्क पैशांच्या मोबदल्यात विकून टाकण्याचे प्रकारही वाढीस लागलेले दिसत आहेत. अलीकडेच पुण्यातील कोथरूडच्या एका मुलाला एक लाख रुपयात पनवेलच्या दाम्पत्यास विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईच्या नेरुळमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. तेथे तर एकाच दाम्पत्याने आपली तीन अपत्ये विक्री केल्याचे समोर आले होते. सातारा, नांदेड, डोंबिवली, बुलडाणा जिल्ह्यांतील देऊळगाव राजा आदी ठिकाणीही असे प्रकार घडले असून, गुन्हे दाखल आहेत. मानवी तस्करीचे हे प्रकार भावना गोठवणारेच असून, पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या मात्या-पित्यास त्याचे काही एक वाटत नसावे काय? असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित करणारेही ठरावेत. भावभावना किंवा संवेदनांचा संबंध या प्रकरणांतून पणास लागून जातो तो म्हणूनच.

 

अपत्याला पैशाच्या मोबदल्यात विकल्याबद्दल ‘माता न तू वैरीणी...’ म्हणून संबंधित मातांकडे पाहिले जाते; मात्र दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली कुटुंबे यात जेव्हा आढळून येतात, तेव्हा गुन्हेगारीच्या चौकटी पलीकडील सामाजिक, आर्थिक विपन्नावस्थेच्या विदारकतेची वास्तविकता समोर येऊन जाते, जी संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही. अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या वर्गाची अगतिकता यात असते, तशी किमान दुसऱ्या घरात गेल्यावर पोटच्या पिलाला दोनवेळचे जेवण मिळून त्याचे आयुष्य सुधारण्याची संबंधितांची आसही असते. या दोन्ही घटकांची परस्परपूरक गरज हेरून मध्यस्थ लाभ उठवतात. वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा असण्याची एक मानसिकता आपल्याकडे अजूनही आहे, त्यातूनही काही प्रकार घडून येतात. नातेसंबंधातील अगर अनाथ मुले दत्तक घेण्याचा अधिकृत मार्ग आहे; परंतु शॉर्टकटच्या नादात बुद्धी गहाण पडते.

 

महत्त्वाचे म्हणजे, पोटच्या मुलांची विक्री करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या दाम्पत्यांची मानसिकता किंवा त्यामागील गरज अभ्यासणे गरजेचे आहे. यातील अनेकांची अवस्था उपासमारीशी निगडित आढळते. आपल्याकडे म्हणजे भारतात ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे तर त्यात भरच पडली आहे. यासंदर्भात जागतिक भूकनिर्देशांक बघता भारताचा नंबर ११६ देशांच्या यादीत १०१ व्या क्रमांकावर घसरला आहे. २०२० या वर्षात तो ९४व्या स्थानी होता. ‘भुखे पेट भजन ना होय’ असे नेहमी म्हटले जाते. पोटातली आग स्वस्थ बसू देत नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पोषण मिशन- २ ची घोषणा केली; पण त्यासाठी तरतूद कमी आहे. तेव्हा दोनवेळच्या अन्नासाठी वंचित राहणारा जो घटक आहे त्याची आर्थिक व मानसिक मजबुरी टाळण्यासाठी काही करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलीकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते.