...मी निवळलो, स्वत:ला आतून बघायला शिकलो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:44 AM2021-05-29T05:44:43+5:302021-05-29T05:45:47+5:30

sachin kundalkar: आपत्तीच्या काळात माणसं मऊ झालीत, त्यांचे काटे-कंगोरे गेलेत. माणसांमधला विखार कमी झालाय. ही या काळाची देणगी असावी!!

coronavirus:... I learned to look inside myself! | ...मी निवळलो, स्वत:ला आतून बघायला शिकलो!

...मी निवळलो, स्वत:ला आतून बघायला शिकलो!

Next

- सचिन कुंडलकर
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

‘एकल वृत्ती’चा माणूस आहेस, कोविडमुळे झालेल्या बदलाचा फटका कमी बसला का?
मी एकांतप्रिय आहे, माणूसघाणा नाही. नाहीतर सिनेमा दिग्दर्शक असूच शकलो नसतो... जवळपास दोनशे लोकांचा संच घेऊन फोर्ट कोची या केरळमधल्या शहरात ‘कोबाल्ट ब्ल्यू’चं शूटिंग सुरू होऊन फक्त सहा दिवस झाले होते; आणि सगळं बंद होणार, ही बातमी आली. २०२० सालच्या मार्च महिन्यात  शूटिंग थांबवून आम्हाला सगळ्यांना ताबडतोब आपआपल्या शहरात परतावं लागलं. स्वत:च्या कादंबरीवर, आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाबद्दल तुम्ही भारलेले असणं अतिशय स्वाभाविक असतं. त्या वेळी तुम्ही नुसती एक व्यक्ती नसता तर सिनेमातली सगळी पात्रं बनून तुम्ही अनेक भूमिका जगत असता. दिग्दर्शकाला ती पात्रं जिवंत करायची असतात. प्रचंड तयारी, कष्ट, जाणीव-नेणिवेला आलेला वेग... एका क्षणात एकदम हे थांबलं. त्या धक्क्यातून बाहेर यायला पुढचे दोन आठवडे लागले. निगुतीनं जमवून आणलेलं सगळं कोसळलं आणि खात्री वाटेना की पुन्हा सगळं सुरू होईल. त्या अंधारात कुणाकडेच कसलीच उत्तरं नव्हती. त्यात आसपासच्या जवळच्या ज्येष्ठ माणसांचे मृत्यू होऊ लागले. काल माणसं होती आणि आज नव्हती असं झालं. उन्हाने भडकलेल्या रिकाम्या शहरामध्ये पिंजऱ्यांमध्ये अडकल्यासारखं वाटत होतं. माझ्या घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आईवडिलांची चौकशी करायला मी पहाटे चार वाजता जायचो आणि पाचला परत यायचो. कुठल्याही अतीव धक्क्यातून बाहेर येताना आपल्याला नवी कातडी येते असा माझा एकूणच आयुष्याचा अनुभव आहे. या सगळ्या ताणाच्या काळामध्ये मला नवीन लिखाण सुचायला लागलं. सावकाशपणे माझ्या आतला रिदम सापडत गेला.

 कसा शोधलास हा रिदम?
पहिले दोन महिने तडफड झाली स्मशानशांततेत एकटं कोंडून राहण्याची, पण गेल्या वर्षभरात मी स्वत:ला दिवसातले दीड ते दोन तास एका जागी शांत बसून भारतीय व पाश्‍चिमात्य शास्त्रीय संगीत ऐकण्याची सवय जडवून घेतली. एरवी मी ऐकायचो, पण कारमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही कामात असताना. ज्या शिस्तीनं मी वाचतो, व्यायाम करतो, स्वयंपाक करतो त्याच तऱ्हेनं मी संगीत बसून ऐकण्याचा हा तास जोडून घेतला. त्यामुळे  एकांत सहन करण्याची, त्याच्याशी जुळवण्याची माझी शक्ती वाढली. नवीन कथानकं निर्माण करता आली. माझा हात सातत्यानं लिहिता झाला एवढंच नव्हेतर, माझी बैठकही वाढली.  ही कमावलेली बैठक लिखाण करायला मला फार उपयोगी ठरली.  मला वाटतं, आपल्याला पुढे नेणाऱ्या गोष्टींच्या नावे एक स्वतंत्र तास वेगळा काढायला हवा. त्यानं तुमचा ‘सेन्स ऑफ अ‍ॅब्स्ट्रॅक्ट’ वाढून, तुमचं सैरभैर झालेलं मन गोळा होतं. तसं झालं की तुम्ही तुमच्या मनाला म्हणू शकता, बस माझ्यासमोर! अशानं कुठलाच एकांत नि बांधलेपणा जाचक होत नाही. पूर्वी अस्पष्ट, अतार्किक भीती वाटायची की आपलं कसं होणार? ही सर्व पातळ्यांवरची भीती  या काळानं माझ्या मनातून काढून टाकली.  त्याच रिदममध्ये नवीन कथा सुचल्या. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सर्व माणसांची आणि साधनांची जमवाजमव करून आम्ही ‘कोबाल्ट ब्ल्यु’चं चित्रीकरण केरळमध्ये जाऊन पूर्ण करू शकलो.

मूल्यव्यवस्था कालसापेक्ष असतात हे तुझं म्हणणं...
आपत्तीच्या काळात माणसांच्या मूल्यांनी, भावनांनी आणि निर्णयांनी वेगळा आकार  घेतला. माणसं मऊ झालीत, त्यांचे काटे-कंगोरे गेलेत. माणसं एकमेकांच्या प्रति जास्त उत्सुक झाली नसली तरी त्यांच्यातला विखार कमी झालाय. ही या काळाची देणगी असावी. व्यक्तिगत अनुभव सांगायचा तर अत्यंत जुनी, अनेक वर्षे न भेटलेली माणसं भरतीच्या वेळी लांब गेलेल्या गोष्टी किनाऱ्यावर परत येतात तशी भेटली. मीही निवळलो, नवा झालो. स्वत:ला आतून बघायला शिकलो. माझ्यासाठी हा सगळा काळ स्वत:ला आतून निरखण्याचा होता.

सगळंच नाही मऊ झालेलं, राजकीय-सामाजिक गटातटांचे आक्रस्ताळे विखार आहेत...
कधीकधी प्रत्यक्षात तितके विखार नसतात, आजकाल जिथून ते फुलतात त्या मूळ स्रोताबाबत मी एक चांगली गोष्ट विचारपूर्वक केलीय. इंटरनेटवर अवलंबून असलेल्या सर्व समाजमाध्यमांपासून मी सुट्टी घेतलीय. तिथं गरजेपेक्षा जास्त राहण्यातून समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये विचित्र अशांतता तयार झालीय. मी ती नाकारल्यामुळं मला फार रसरशीत व जिवंत वाटतं आहे. ज्ञान किंवा माहिती हवी, नातेसंबंध टिकायला हवेत, नवे मित्र व्हायला हवेत या कारणांनी समाजमाध्यमात असायला हवं असं असेल तर माझा यापैकी कुठलाच तोटा झालेला नाही. 

तू खूप तीव्र संवेदनशील आहेस, त्यामुळं माणसांशी जुळताना किंवा न जुळून नवे संघर्ष तयार होतात?
दिग्दर्शक म्हणून तुमच्या मनातली पॅशन आणि सोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञ व कलाकारांची पॅशन एकमेकांशी जुळणं हे नेहमीच शक्य होत नाही. ज्याप्रमाणे साऊंड इक्वलाईज करतात तसं तुम्हाला पॅशनचं इक्वलायझेशन करत सिनेमा घडवावा लागतो.  नुसता लेखक असतो तर मी जास्त आग्रही, टोकदार आणि मनस्वी असतो; पण सिनेमाचं काम समूहाला घेऊन करायचं असल्यामुळं दिग्दर्शकाला मनाचं संतुलन ठेवावं लागतं. 

 ‘१९९९’ हे तुझं पुस्तक गाजलं. या वेगवान बदलाच्या काळाचा  प्रतिनिधी म्हणून काय वाटतं आजबद्दल?
त्या-त्या काळाविषयी मी लिहितो तेव्हा त्या काळाचं प्रत्यक्ष जगतानाचं विश्‍लेषण करत असतो, ऋण व्यक्त करत असतो. त्यामुळं ‘मागं वळून पाहाण्याचा’ मला ताण येत नाही. विशिष्ट स्थळकाळात कसा घडलो असेन याचा विचार मी करतो तेव्हा तो काळ अतिशय साक्षेपानं माझ्या मनात उभा राहातो. मात्र जगताना एखाद्या विशिष्ट टप्प्यावर अडकून बसण्याचा माझा स्वभाव नाही. मी वर्तमानकाळात आनंदी राहाणारी व्यक्ती आहे. लिखाण व दिग्दर्शन या माझ्या कामात अनुभवाच्या दृष्टीने मी अजून लहान आहे. संपृक्त व्हायला अजूनही वेळ लागणार आहे. आम्ही मित्रमैत्रिणी प्रत्येकाच्या वाढदिवशी वयाचे आकडे उलटे करण्याचा खेळ खेळतो. काही वाढदिवसांना २८ व ३६ हे वय उलटं केलं तर भिववतं. माझं आत्ता वय ४४ आहे. यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली? हीच माझी वेळ आहे. शोषून घ्यायची.
kundalkar@gmail.com
मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: coronavirus:... I learned to look inside myself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.