‘काँग्रेसमुक्त भारत’ - भाजपवर उलटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:47 AM2022-09-01T06:47:49+5:302022-09-01T07:28:53+5:30

BJP Politics: दुर्बल होत चाललेल्या काँग्रेसला पर्याय म्हणून अचानकपणे केजरीवाल यांचा ‘आप’ उभा राहू लागल्याने भाजपचे नेतृत्व आता वेगळ्याच चिंतेत पडले आहे.

'Congress-free India' - Will it turn on BJP? | ‘काँग्रेसमुक्त भारत’ - भाजपवर उलटणार?

‘काँग्रेसमुक्त भारत’ - भाजपवर उलटणार?

googlenewsNext

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत,
नवी दिल्ली)

भारतीय जनता पक्ष २०१४ सालापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ मोहिमेची फळे चाखत आहे. काँग्रेसचे एक एक करून बालेकिल्ले ढासळत गेले. आता फक्त राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यात पक्षाची सत्ता उरली आहे. इतर राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे घडवून आणली गेली. परंतु अचानकपणे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहू लागल्याने भाजपचे  नेतृत्व आता चिंतेत पडले आहे. डावपेचाचा भाग म्हणून ‘आप’ विविध राज्यातील जिल्हास्तरीय काँग्रेस नेत्यांकडे शक्य असेल तेथे लक्ष देत आहे. कोणत्याही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी ‘आप’मध्ये यावे असा प्रयत्न हा पक्ष करत नाही. या डावपेचांचा चांगलाच लाभ ‘आप’ला पंजाबमध्ये झाला.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये आता यामुळेच भाजप चिंतेत सापडला आहे. या दोन राज्यात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेतृत्व ‘आप’ आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांचे बाहू उभारून स्वागत करत आहे. रोजच्या रोज या राज्यातून पक्षांतराच्या बातम्या येत असतात. ज्यांना भाजपला खाली खेचायचे आहे ते ‘आप’कडे वळत आहेत. मात्र यातले बहुतेक निम्न स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. 

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि सरकारी तपास यंत्रणा ज्या वेगाने केजरीवाल सरकार आणि त्यातील मंत्र्यांना लक्ष करत आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. एकामागून एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दररोज केजरीवाल सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकार परिषदा घेत आहेत. गेल्या महिन्यात केजरीवाल सरकारचे दारू धोरण आणि शिक्षण क्षेत्र लक्ष्य केले गेले. आता सप्टेंबर महिन्यात हे हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप पंजाबमधील भगवंत सिंग मान यांच्या सरकारला त्रास देण्यात बिलकुल कसूर करताना दिसत नाही.

पंतप्रधानांचा ‘रेवडी कल्चर’वरचा हल्ला केजरीवाल यांना उद्देशून होता. सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपच्या पथ्यावर पडतील, असे काही शेरे अजून मिळालेले नाहीत. दुसरे म्हणजे एकीकडे केजरीवाल हिंदूंना गोंजारण्याचा, त्यांच्या अधिक जवळ सरकण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचवेळी ते अल्पसंख्यकांनाही खुश ठेवण्याची कसरत करत आहेत. केजरीवाल यांना देशविरोधी किंवा हिंदूविरोधी ठरवण्यात भाजपाला अपयश आले आहे. काँग्रेस पक्ष आणखी कमजोर झाला तर त्याचा फायदा ‘आप’ला होईल. सध्या भाजपसाठी हेच मोठ्या चिंतेचे कारण बनलेले आहे.

मोदी यांचे मिशन काश्मीर
संथ गतीने का होईना पंतप्रधान मोदी काश्मीरमधले आपले उद्दिष्ट साध्य करताना दिसतात. पुढच्या वर्षीच्या प्रारंभी केव्हा तरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका होतील. मतदारसंघाची पुनर्रचना आणि याद्या अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यात आता ९० जागांसाठी निवडणूक होईल. पूर्वी ८३  जागांसाठी होत असे. मतदारांची संख्याही ७५ लाखांवरून जवळपास एक कोटीवर गेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री बसविण्याचा भाजपाचा इरादा आहे. त्यासाठी मित्र पक्षांची  मदत घेतली जाईल. 
गुलाम नबी आझाद यांनी आपण भाजपात जाऊ शकत नाही, असे म्हटले असले तरी त्यांनी नवा पक्ष काढल्यास त्याच्याशी भाजपाचे सूत नक्की जमेल. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसण्याची प्रतीक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आहे. ३७० वे कलम रद्द करणे आणि जम्मू- काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन हा संघाच्या धोरणाचाच भाग होता. मोदी सरकारने तो अमलात आणला. “मिशन मोदी” साध्य होणे नजरेच्या टप्प्यात येताच राज्यात निवडणुका होतील.

राहुल गांधी अविचल 
अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षातून एकामागून एक बाहेर पडले तरी राहुल गांधी यांना त्याची अजिबात फिकीर वाटत नाही. त्यांचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे; जे मोदींशी लढू शकत नाहीत आणि भाजपाविरुद्ध लढताना तुरुंगात जायची ज्यांची तयारी नाही, त्यांनी पक्ष सोडावा!
राहुल गांधी यांनी स्वतः तुरुंगात जाण्याची तयारी मनोमन केलेली दिसते. मोदींच्या सूड भावनेची भीती आपल्याला वाटत नाही, असे ते सांगतात. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर राहुल यांनी त्यांच्या वकिलांना सांगितले की, मी तुरुंगात जायला तयार आहे,
आवडीची पुस्तके किंवा व्यायामाचे साहित्य तुरुंगात मुळीच पोहोचवू नका, असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. 

 गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांना त्यांनी राज्यसभेची जागा दिली नाही. कारण त्यासाठी केवळ ज्येष्ठता हा निकष असता कामा नये, असे त्यांचे म्हणणे होते.  पक्षांतरामुळे उडालेली धूळ खाली बसेपर्यंत गांधी कुटुंबाने परदेशात जाणे पसंत केले. आता मनीष तिवारी, रवनीतसिंग बिट्टू आणि शशी थरूर यांच्यासारखे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्याप्रमाणेच काँग्रेस पक्ष सोडण्याची मनोमन तयारी आनंद शर्मा यांनी केली असल्याची चर्चा आहे... भाजप त्यांच्या स्वागताला तयार आहेच!

Web Title: 'Congress-free India' - Will it turn on BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.