- प्रा. डॉ. संदीप ताटेवार (निवृत्त प्राध्यापक, अमरावती)राज्य सामाईक परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमधून संगणक अभियांत्रिकी व तत्सम विद्याशाखेत पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते तसेच याच विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी (एमएस) करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
संगणक अभियंत्यांना सॉफ्टवेअर अभियंते म्हणून सहजासहजी नोकरी मिळून जाते आणि त्यांना मिळणारे वेतनमानही चांगले असते. यामुळेच बऱ्याच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश क्षमता व फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे; मात्र दुसरीकडे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या वाढत्या वापरामुळे संगणक अभियंत्याला भविष्यात नोकऱ्या मिळणार का? ज्या आहेत त्या टिकणार का? - अशा शंका बऱ्याच लोकांच्या मनात असतात.
‘बँकेचे कर्ज काढून मुलांना कॉम्प्युटर इंजिनिअर करायचे आणि अमेरिकेत नोकरीसाठी पाठवायचे’ या मध्यमवर्गीय स्वप्नालाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या धोरणांनी तडा द्यायला सुरुवात केली आहे. या बदलत्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न असा, की सध्याच्या परिस्थितीत भरमसाठ फी भरून आपल्या मुलांना संगणक अभियांत्रिकी किंवा तत्सम शाखेत प्रवेश द्यावा का?
‘एआय’मुळे सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमधील डेव्हलपिंग व टेस्टिंग यासारखी कामे जलद गतीने सहजतेने व बिनचूक होऊ शकतील. त्यामुळे या क्षेत्रातील डेव्हलपर व टेस्टर यासारख्या नोकऱ्यांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते जरी ‘एआय’चा शिरकाव संगणक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला तरी क्लिष्ट, कठीण, वैचारिक ज्ञानाची आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये एआय फारसे काही करू शकणार नाही.
‘प्लुरल साईट २०२४’च्या अहवालानुसार एआय सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या क्षमता वाढवेल, कोड जनरेशन, बग फिक्सिंग आणि ऑटोमेटेड टेस्टिंगसाठी साधने प्रदान करेल. यामुळे सॉफ्टवेअर अभियंत्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करील; परंतु त्यांची जागा घेणार नाही.
स्प्रिंगरच्या अहवालानुसार जसजसे एआय अधिक प्रचलित होत जाईल तसतसे त्याची नवीन भूमिका उदयास येऊ शकते. विकास प्रक्रियेवर देखरेख करणारे आणि एआय टुल्स प्रभावीपणे वापरले जातात का, याची खात्री करणारे एआय प्रशिक्षक विकसित होतील.
तज्ज्ञांच्या मते, एआय हे सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये क्रांती घडवून आणेल; परंतु मानवी विकासकांची जागा घेणार नाही. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी व तत्सम विद्याशाखेतील अभियंत्यांना नोकरी मिळणार नाही, ही भीती आजतरी अनाठायी वाटते.
संगणक अभियांत्रिकी व्यतिरिक्त सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, ऑटोमोशन, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग यासारख्या नवीन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विचार करायला पाहिजे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यासोबतच कोणती शाखा आपल्या दृष्टीने योग्य राहील, याबाबत विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून, यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, यंत्र कारखाने, विद्युत निर्मिती व संचारण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे.
परदेशातही महानगरातच नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक होण्याची गरज नसते. शिवाय शासकीय नोकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक अभियांत्रिकी परीक्षा देऊन सरळ भरतीने उच्चस्थ पदे मिळविण्याचा वाव असतो. त्यामुळे चांगले महाविद्यालय व भविष्याच्या दृष्टीने सोयीस्कर शाखा निवडणे, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. अभिमत विद्यापीठ, स्वायत्त संस्था व विद्यापीठाशी संलग्न संस्था यामधील फरक समजावून घेऊन प्रवेश घेणे, हा योग्य निर्णय ठरेल.