शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

By यदू जोशी | Updated: June 7, 2024 09:19 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने लीड मिळविली आहे. म्हणजे राज्याची सत्ता आत्ताच मविआने हिसकावली आहे! 

 - यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

‘महाराष्ट्रात सगळ्या प्रमुख पक्षांच्या ताटात थोडेथोडे पडेल, एक ताट पंचपक्वानाचे, तर दुसरे अगदीच रिकामे असे होणार नाही’ असे निकालापूर्वी लिहिले होते. त्याचा प्रत्यय आला आहे. तरीही भाजपची इतकी वाताहत होईल असे वाटले नव्हते.  पक्षाचे दिग्गज महाराष्ट्रात हरले. 'इस जमीं से आसमां तक मैं ही मैं हुँ, दुसरा कोई नही’ असे दिल्लीपासून खालपर्यंत अनेकांना वाटत होते, पण मतदाराच्या हिशेबाची वही वेगळीच असते. पाच वर्षांतून एकदाच तो  ती काढतो आणि सगळे हिशेब बरोबर करतो. ‘डान्स ऑफ डेमॉक्रसी’मध्ये आपण पब्लिकला नाचवतो असे नेत्यांना वाटते, पण मतदार पाच वर्षांतून एकदाच नेत्यांना नाचवितो. गावातल्या मारुतीच्या मूर्तीला लोक महिनोगणती शेंदूर लावतात मग त्याचे थर खूप साचले की ती खळ कधीतरी काढली जाते. महाराष्ट्रात भाजपचा शेंदूर तसाच उतरला आहे. नव्याने शेंदूर लावायला आता खूप कसरत करावी लागेल. आता हा शेंदूर इतकी गेली काही वर्षे खळ उतरलेल्या काँग्रेसला लागला आहे. 

अर्थशास्त्राचा एक नियम आहे : ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स’. एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर त्यापुढे जाता येत नाही, खाली येणे अटळ असते. विविध कारणांनी भाजप व महायुती अशीच खाली आली. भाजपमधील काही नेत्यांना ‘फ्लाय बाय नाइट ऑपरेटर्स’ म्हणजे रात्रीच्या अंधारात कामे आटोपणाऱ्यांनी घेरले आहे. हे  लोक  दिवसाही अंधारातलीच कामे करतात; त्यांना दूर ठेवावे लागेल. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या ही तर महायुतीसाठी धोक्याची घंटा आहेच; पण दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआने लीड मिळविली. राज्यात सत्तेत बसायला १४४ आमदार लागतात, लोकसभेचा इफेक्ट विधानसभेतही कायम राहील असे मानले तर मविआ आत्ताच सत्तेत आली आहे. लोकसभेतील अपयश दिल्लीच्या कोर्टात ढकलता येते, पण राज्यात अपयश आले तर ते शिंदे-फडणवीस-अजित पवारांचेच असेल. दिल्ली महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना निर्णयस्वातंत्र्य देत नाही, उलट आपल्या तालावर नाचायला सांगते. एकेकाळी इंदिराजी काँग्रेसमध्ये तसेच करायच्या. दिल्लीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मोकळीक दिली नाही तर लोकसभेपेक्षाही वाईट स्थिती होईल. लोकसभेच्या वेळी तर शिंकायचे असले तरी दिल्लीहून परवानगी घ्यावी लागत होती. 

जी काँग्रेस सेकंड क्लासमध्येही येणार नाही असे भाजपला वाटत होते, त्या काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून डिस्टिंक्शन मिळविले आहे. काँग्रेसचे असे ताकदवान होणे भाजपला परवडणारे नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर अशा काँग्रेस नेत्यांची दमदार फळी उभी झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले आहे. सोबत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेतच. एकमेकांशी भांडत बसणारी काँग्रेस आज दिसत नाही, पक्षासाठी हे चांगले लक्षण आहे आणि अशा ताकदीला शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे महाबळ मिळाल्याने भाजपची डोकेदुखी विधानसभेतही वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बरेच नेते काँग्रेस वा इतर पक्ष सोडून भाजप, शिंदेसेनेत गेले. विधानसभेपूर्वी तसे फारसे होणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींकडे विधानसभेसाठी लढू इच्छिणाऱ्यांची मोठी गर्दी असेल.  संधी मिळणार नाही तेच फक्त इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारतील. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जो मोठा फटका महायुतीला बसला आहे ते पाहता या पट्ट्यात इतर पक्षांतून आपल्याकडे आलेेल्यांना सांभाळून ठेवण्याची कसरत भाजप, शिंदेसेनेला करावी लागू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षसंघटनेत काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे, नेतृत्वाने त्यास मान्यता दिली तर राज्यात त्याचा फायदाच होईल. ते होईल- न होईल, पण निवडणुकीआधी प्रदेश भाजपमध्ये मोठे बदल होतील असे वाटते. हे बदल कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घेऊन त्या आधारे केले गेले तरच फायदा होईल. नाहीतर आताचे कपड्यांची घडीही मोडू न देणारे आणि रोज कलप लावणारेच पुन्हा येतील. 

फडणवीस यांनी एकट्यानेच राजीनामा का द्यावा? - राज्यातील पराभवाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि मुंबईतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून आशिष शेलार यांनीही  तो दिला पाहिजे असे भाजपचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.  विरोधात गेलेली जातीय समीकरणे आपल्या बाजूने करणे, शेतकऱ्यांची नाराजी दूर करणे, भाजपमधली मरगळ दूर करणे, पक्षात विशिष्ट लोकांनाच मिळते आणि बाकीच्यांना कोणीही विचारत नाही ही भावना दूर करणे, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या आक्रोशाकडे लक्ष देणे, राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावणे अशा अनेक गोष्टी महायुतीला कराव्या लागणार आहेत. बाहेरच्यांचा मुकाबला करताना अंतर्गत घडी बसविण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले विरुद्ध झालेला लोकसभेचा सामना एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार पूर्णपणे हरले आहेत; आता विधानसभेचा पिक्चर बाकी आहे.                

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस