लेख: संवैधानिक मूल्यांचा आग्रह, सौंदाळ्याने जात सोडली
By सुधीर लंके | Updated: February 22, 2026 10:17 IST2026-02-22T10:16:36+5:302026-02-22T10:17:36+5:30
अलीकडेच एका माजी मंत्र्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर 'पवित्र' केल्याची घटना घडली. जात, धर्मावरून अनेक ठिकाणी भेदाभेद होत असल्याची उदाहरणे सातत्याने आपल्या कानावर येत आसतात. ही शिवाशिव मंदिरांतच नव्हे, तर सार्वजनिक व्यवहारांतही दिसते. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा (ता. नेवासा) ग्रामसभेने केलेला 'जातमुक्ती'चा ठराव लक्षवेधी ठरतो.

लेख: संवैधानिक मूल्यांचा आग्रह, सौंदाळ्याने जात सोडली
-सुधीर लंके (निवासी संपादक, अहिल्यानगर)
सौंदाळा हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. गावकऱ्यांनी यापूर्वी गावात 'शिवी बंदी' केली आहे. शिवीत जात, लिंग याबाबत अपमानास्पद उल्लेख असतात. शिवी दिल्याचे आढळले म्हणून गावाने आजवर १३ जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला. शरद आरगडे हे येथील सरपंच आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गावात विकासकामे महत्त्वाची आहेत; पण सामाजिक भेदाभेद हद्दपार करून एकात्मता साधणे हेही महत्त्वाचे आहे.
खरेतर गावांमध्ये आता भेदभाव राहिलेला नाही. लोकांचे जीवनमान एकमेकांवर अवलंबून आहे; पण कुठेतरी घटना घडतात व त्यातून वातावरण दूषित होते. म्हणून आम्ही हा ठराव केला. हा मार्ग आपणाला महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांनीच दाखविलेला आहे. आमचे गाव केवळ हा मानवतावादी विचार सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करत आहे, एवढेच.' या गावाने ठरावातही स्पष्टपणे नमूद केले आहे की, 'या महापुरुषांच्या प्रेरणेतून आम्ही हा ठराव करत आहोत.'
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी गावाला ही कल्पना सुचविली होती. त्यांचाही गावाने ठरावात उल्लेख केला आहे. देशाचा 'जीडीपी' हा केवळ आर्थिक आकड्यांत नव्हे, तर मानवी स्वातंत्र्यात व संधीच्या समानतेतही मोजावा लागेल, अशी मांडणी जागतिक स्तरावर सुरू आहे. सौंदाळा गाव अशा व्यापक मानवी निर्देशांकाच्या दिशेने निघाले आहे.
काय म्हटले आहे ठरावात?
गावात जात, धर्म, पंथ, वंश यांच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. गावातील सर्व नागरिक समान असून, 'माझी जात मानव' ही भावना आम्ही स्वीकारत आहोत. सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक कार्यक्रम, मंदिर, शाळा, स्मशानभूमी, सर्वांसाठी खुले राहतील, असे या गावाने ठरावात म्हटले आहे. सोशल मीडियावर जातीय, सामाजिक तेढ निर्माण करणारे, विद्वेष पसरविणारे संदेश पसरविताना आढळल्यास ग्रामपंचायत व ग्रामसभा कारवाई करेल.
महापुरुषांच्या विचारांशी नाते
महात्मा फुले यांनी 'जात ही धार्मिक व राजकीय शोषणयंत्रणा आहे' हे उदाहरणांसह सांगितले. डॉ. आंबेडकरांनी सांगितले की, जातव्यवस्था नष्ट केल्याशिवाय समता शक्य नाही. अस्पृश्यता संपविण्यासाठी महात्मा गांधींनी सहभोजन व आंतरजातीय विवाह हे पर्याय सुचविले होते. सौंदाळा गावाचा ठराव या सर्व विचारांशी नाते सांगतो. आम्ही आंतरजातीय विवाहांचेही स्वागत करू, अशी या गावाची भूमिका आहे. गावातील एक विधवा महिलेचा गावाने पुनर्विवाह देखील केला.
देशभरातून निर्णयाचे स्वागत
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामपंचायतीला जनहिताचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे या ठरावाला कायदेशीर अधिष्ठान आहे. समता, बंधुता, सर्वधर्मनिरपेक्षता जपणे हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे. आमचा ठराव संविधान पाळण्याचा आग्रह करण्यासाठी आहे. याची माहिती मिळाल्यानंतर देशभरातून फोन येत आहेत. एकही प्रतिक्रिया नकारात्मक नाही. सर्वजण निर्णयाचे स्वागत करत आहेत. -शरद आरगडे, सरपंच, सौंदाळा