- अतुल कुलकर्णी(लोकमत न्यूज नेटवर्क)
मुंबई - राष्ट्रवादीमधून बाहेर पडत अजित पवार यांनी वेगळी राष्ट्रवादी निर्माण केली. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे भवितव्य काय, असा प्रश्न त्या वेळी उपस्थित झाला. तेव्हा अनेकजण अजित पवार यांच्यासोबत गेले. आता अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सांभाळण्याचे, वाढवण्याचे काम कोणी करायचे? आमदार, खासदार, कार्यकर्त्यांना ताकद कोणी द्यायची? असे प्रश्न सामान्य कार्यकर्त्यापासून पक्षाच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना पडलेले आहेत.
शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यापासून मधला काही काळ वगळला तर कायम हा पक्ष सत्तेत राहिला. तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आर. आर. पाटील आणि नंतर अजित पवार तिघांनीही सत्तेत राहून पक्ष वाढवण्याचे काम नेटाने केले. भुजबळ यांनी ओबीसींची मोट बांधली. आर. आर. यांनी मराठा समाजातील तरुणांना ताकद देण्याचे काम केले, तर अजित पवार यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावागावांत पक्ष नेण्याचे काम केले. यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले. पक्ष उभा राहिला. शरद पवार यांचे धोरणी राजकारण आणि अजित पवारांची थेट भिडण्याची भूमिका यातून पक्षाला ताकद मिळत गेली.
देवेन्द्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यानंतर विरोधात राहून पक्ष वाढवणे कठीण आहे, हे लक्षात येताच अजित पवार यांनी पक्षातल्या नेत्यांची मोट बांधून भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यास मागेपुढे पाहिले नाही. विद्यमान पक्षात वित्तमंत्रिपद त्यांच्याकडेच असल्यामुळे प्रत्येक मंत्र्याचे काम त्यांच्याकडे पडायचे. त्यातून कार्यकर्त्यांना, स्थानिक आमदारांना बळ देता येते हे त्यांनी दाखवून दिले होते. आता तेच राहिले नाहीत तेव्हा आमचे काम कोण करणार? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षाची सूत्रे सांभाळली तरी राज्य सरकारमध्ये राहून जेवढी ताकद कार्यकर्त्यांना, आमदारांना देता येते तेवढी त्या लोकसभेत बसून कशी देणार? इथे गावागावात आमदारांचे छोटे-मोठे प्रश्न मंत्रालयातल्या सहा मजल्यांमध्ये आहेत. कार्यकर्त्यांची स्थानिक पातळीवर कामे छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांकडे असतात. अशा वेळी उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याने फोन करून मंत्रालयातून किंवा स्थानिक पातळीवरून कामे करून घेतली की कार्यकर्त्यांना, नेत्यांना ताकद मिळते. दिल्लीत राहून ही कामे कशी होणार?
दादांचे पार्थिव अनंतात विलीन झाल्यानंतर अनेक नेते हाच मुद्दा मांडत होते. एक नेते म्हणाले, आम्हाला तर राजकारण सोडून द्यावे वाटत आहे. कोणाकडे बघून राजकारणात राहायचे? आम्हाला आमच्या मतदारसंघात टिकून राहायचे असेल तर आमची कामे व्हावी लागतील. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. त्यासाठी जवळ सत्ता असावी लागेल. असलेल्या सत्तेसाठीचे नेतृत्व सर्वसमावेशक हवे. हे सगळे गुण असणारा नेता या गर्दीत मी शोधत आहे. एक तरी नेता खांद्यावर हात टाकून "चल मी आहे, काळजी करू नकोस", असे म्हणेल असे वाटत होते. मात्र कोणीही असे म्हणताना दिसले नाही... ज्या नेत्यांकडे आम्ही आश्रने पाहत होतो तेच नेते ढसाढसा रडताना पाहिले. तेच इतके हतबल आहेत तर आम्ही आमदारांनी आणि आमच्या जीवावर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी करायचे काय..? हे सांगताना त्या आमदाराच्या डोळ्यांतही पाणी होते. बोलण्यासाठी त्याला शब्द सुचत नव्हते.
दोन्ही राष्ट्रवादीमध्ये थोडाफार फरकाने हीच स्थिती आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवून पुढची तीन-चार वर्षे प्रत्येकाला टिकून राहायचे आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. जायचे ठरवले तरी भाजप घेईल की नाही माहिती नाही. भाजपसोबत सत्तेत भागीदार म्हणून सन्मानाने उभे राहील असे प्रबळ नेतृत्व आम्ही सगळे शोधत आहोत. तुम्हाला असा कोण नेता दिसतो, असा उलट सवालही त्याच नेत्याने केला.
प्रादेशिक पक्षांबाबत, विशेषतः एकाच मोठे नेतृत्व असणाऱ्या पक्षांबाबत हे घडणे अपरिहार्य आहे. अशा स्थितीत स्वतःच्या भूमिका कायम ठेवून समविचारी राष्ट्रीय पक्षांसोबत राहत सत्ता मिळवायची की सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत जायचे? यापैकी कोणता पर्याय निवडतात हा खरा प्रश्न आहे.
सुप्रिया सुळे यांनी सूत्रे हातात घेतली तर त्या राज्यात येतील का? येणार असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी करून घेतले जाईल का? मुळात राज्यात येण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे का?- पवार आडनाव असणारी व्यक्ती पक्षाला पुढे नेण्यासाठी हवी असेल तर त्याचा फायदा होईल, पण असे नाव कोणाचे काढायचे हा प्रत्येकापुढे प्रश्न आहे. पार्थ आणि जय अजून वयाने लहान आहेत.- अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई सावरून पक्षासाठी राज्यभर फिरू शकतील का? छगन भुजबळ नुकत्याच मोठ्या आजारातून बाहेर आले. जयंत पाटील दोन्हीकडे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून स्वीकारले जाईल का?- या सगळ्यांच्या पलीकडे जात शरद पवार कोणती भूमिका घेतात, या प्रश्नांनी आमदार, मंत्री आणि राज्यभरातील महत्त्वाचे पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ आहेत.
Web Summary : Ajit Pawar's absence leaves NCP leaders questioning the party's future. Concerns arise about who will provide support and leadership, especially with Supriya Sule in Delhi. Leaders seek a strong figure to ensure constituency stability and access to power amidst uncertainty.
Web Summary : अजित पवार की अनुपस्थिति से एनसीपी नेताओं में पार्टी के भविष्य को लेकर सवाल उठ रहे हैं। चिंता है कि समर्थन और नेतृत्व कौन प्रदान करेगा, खासकर सुप्रिया सुले के दिल्ली में होने से। नेता अनिश्चितता के बीच निर्वाचन क्षेत्र की स्थिरता और सत्ता तक पहुंच सुनिश्चित करने के लिए एक मजबूत शख्सियत की तलाश में हैं।