त्या विद्यार्थ्यांच्या सायकलची चाके वर्षभरापासून थांबली कोरोनाचा परिणाम : रेल्वे बंदमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सायकली धुळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:41+5:302021-03-22T04:32:41+5:30
धुळे-चाळीसगाव लोकल रेल्वेच्या मार्गावरील मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, चांदे यासह इतर गावातील शेकडो विद्यार्थी रेल्वेने धुळ्याला येतात. सकाळचे काॅलेज ...

त्या विद्यार्थ्यांच्या सायकलची चाके वर्षभरापासून थांबली कोरोनाचा परिणाम : रेल्वे बंदमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सायकली धुळखात पडून
धुळे-चाळीसगाव लोकल रेल्वेच्या मार्गावरील मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, चांदे यासह इतर गावातील शेकडो विद्यार्थी रेल्वेने धुळ्याला येतात. सकाळचे काॅलेज आटोपले की शहरातील विविध वाचनालये आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करीत बसतात. सायंकाळच्या रेल्वेने घरी परततात. रेल्वेस्टेशनपासून काॅलेजला जाण्याकरिता सायकल हवी म्हणून स्वत:ची सायकल कायमस्वरूपी रेल्वेस्टेशनच्या पे ॲण्ड पार्कमध्ये लावलेली असते. सकाळी रेल्वेने आल्यावर सायकलीने काॅलेजला जाणे आणि सायंकाळी सायकल त्याच ठिकाणी लावून गावी परतणे, असा हा दिनक्रम गेल्या वर्षभरापासून थांबलेला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या सायकली रेल्वेस्टेशनच्या पार्किंग लाॅटमध्ये धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे पार्किंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे उत्पन्न थांबले आहे. तरीदेखील संबंधित व्यक्ती सायकलींची राखण करीत आहे. विद्यार्थ्यांनी सायकली घेऊन जाव्यात, असे आवाहन वेळोवेळी केले आहे. पैसे दिले नाहीत तरी चालेल असे त्यांचे म्हणणे आहे. पंरतु विद्यार्थ्यांना सायकली गावी घेऊन जाणे परवडणारे नसल्याने आम्ही सायकली घेऊन जात नाहीत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
काही सायकली गेल्या चोरीला
रेल्वेस्टेशनच्या पार्किंग लाॅटमधून काही विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीस गेल्याचे बोलले जात आहे. मोरदड तांडा येथील महेश सखाराम चव्हाण, गयनाथ नेमीचंद राठोड, एमजी रतन राठोड, बळीराम गोपीचंद चव्हाणे यांच्यासंह इतर गावातीलही काही विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याच गावातील गणेश एकनाथ चव्हाण याची सायकल मात्र सुरक्षित आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या सायकली घेऊन जाव्यात, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.