धरणांमधून विसर्ग सुरूच, सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:33 IST2019-08-07T13:33:06+5:302019-08-07T13:33:37+5:30
धुळे जिल्ह्यातील स्थिती : दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

धरणांमधून विसर्ग सुरूच, सतर्कतेचा इशारा
धुळे : जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ८ व ९ आॅगस्ट असे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पूरस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून बुधवारी सकाळी प्रतिसेकंद ८ हजार ५१५ क्युसेस विसर्ग करण्यात येत असून तो सुरूच ठेवून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. बुराई धरणातूनही प्रतिसेकंद १ हजार ९०० क्युसेस विसर्ग करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग करून तसेच त्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. साक्री तालुक्यातील पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या प्रकल्पांमधून ओसंडणारे पाणी अक्कलपाडा धरणात येत असून पाऊसही होत असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. त्याच पद्धतीने बुराई धरणाच्या साठ्यातही वाढ होत असल्याने विसर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान जिल्ह्यात ८ व ९ आॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.