सातपुड्याच्या पर्वत रांगेतील शिखर असलेल्या डोंगररांगा गेल्या दोन आठवड्यांत ३ वेळा वणवा पेटताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी १० किलोमीटरच्या अंतरावरून आगीचे लोट स्पष्टपणे दिसतात. बोराडी गावाच्या कोणत्याही भागातून हा वणवा आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे त्या वणव्याची भीषणता कळते. या आगीत ससा, मुंगूस यांसारखे वन्यजीव, प्राणी आणि पक्षी, त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
१५ दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे वणव्याचा रौद्र प्रकार सर्वांच्या समोर आला होता. त्यावेळी त्यानंतर काही काळ या वणवा थांबल्याचे दिसून आले. मात्र, आता पुन्हा वणव्याचे प्रकार सुरू झाल्याने हे वणवे मानवनिर्मित की नैसर्गिक, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. कोळशासाठी, तसेच वन्यजीवांची शिकार करण्यासाठी अशा प्रकारे आग लावली जाते, असे बोलले जाते. मात्र, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचे यातून सिद्ध होते, तरी लवकरात लवकर या गोष्टींकडे वन विभागाने लक्ष घालावे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.