‘रेमडेसिविर'च्या मागणी व पुरवठ्यात तफावत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:19+5:302021-04-06T04:35:19+5:30
धुळे : राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अजिबात निर्माण झालेला नाही. इंजेक्शनच मागणी आणि पुरवठ्यात कुठलीही तफावत नाही. राज्यासाठी ५० ...

‘रेमडेसिविर'च्या मागणी व पुरवठ्यात तफावत नाही!
धुळे : राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अजिबात निर्माण झालेला नाही. इंजेक्शनच मागणी आणि पुरवठ्यात कुठलीही तफावत नाही. राज्यासाठी ५० हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. याबाबतीत टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमांचे शासकीय रुग्णालयांमध्ये काटेकोर पालन केले जात असून खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनीदेखील सरसकट इंजेक्शनचा वापर न करता आवश्यकता असेल तरच उपयोग करावा. खासगी रुग्णालयांकडून जास्तीचे बिले आकरली जाती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच प्रत्येक खासगी रुग्णालयांत ऑडिटरची नेमणूक करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोविड १९ संदर्भातील जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार होत आहे; परंतु तसे नसून इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. दिवसाला ५० हजार इंजेक्शनची आवश्यकता असून ते उपलब्ध करून दिले जात आहेत. या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात आरोग्य मंत्रालयालयाच्या टास्क फोर्सने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांचे ए बी, सी, डी, ई असे विलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी ए ते सी प्रवर्गातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही. केवळ डी आणि ई प्रवर्गातील गंभीर व ऑक्सिजनची आवश्यकता भारणाऱ्या रुग्णांनाच इंजेक्शन दिले जावे. शासकीय रुग्णालयांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आहे. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी देखील हा नियम पाळावा, हे गरजेचे आहे, असे मंत्री टोपे म्हणाले.
व्हेंटिलेटर पुरेसे उपलब्ध
ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे. सध्या व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणाल उपलब्ध आहेत. परंतु त्याचा वापर करणारा कर्मचारीवर्ग पुरेसा नाही म्हणून कर्मचारी भरती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
लसीकरण केंद्र वाढविणार
राज्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जात आहे. येत्या काही दिवसांत अगदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण सुरू करण्यात येईल. केंद्र शासनाकडून कोविड व्हॅक्सिन उपलब्ध होत असतात. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून व्हॅक्सिन मिळत नाही तरीही लसकरणात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
कर्मचारी भरतीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अडचणी निर्माण होत आहे. डाटा एंट्री ऑपरेटर कमी असल्यामुळे वेळेवर माहिती अपलोड होत नाही. कर्मचारी भरतीसह ऑपरेट भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आवश्यकतेनुसार त्यांची भरती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी महिती मंत्री टोपे यांनी दिली.
लहान मुलांची काळजी घ्यावी
कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये वाढला आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी घराबाहेर फिरणे टाळावे. मास्क व सॅनिटायझरचा नित्याने वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले.
जिल्हा रुग्णालयाची चौकशी करणार
जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. यासंदर्भात शिवसेनेने आंदोलन केले आहे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे. त्यानुसार मंत्री टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात पडून असलेल्या व्हेंटिलेटर संदर्भात चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.