प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवा अन्यथा होईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:14+5:302021-08-23T04:38:14+5:30
शहरातील स्वच्छतेबाबत शनिवारी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी यांनी शहर आरोग्य विभागाचा ...

प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवा अन्यथा होईल कारवाई
शहरातील स्वच्छतेबाबत शनिवारी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी यांनी शहर आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील विविध भागात जाऊन सर्व स्वच्छता निरीक्षक व मुख्य निरीक्षकांनी झाडाझडती घेतली. यावेळी देवपूर, कुमारनगर, स्टेशनरोड, चाळीसगाव रोड, हजारखोली परिसरात पाहणी करताना बहुसंख्य नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात त्यात प्रामुख्याने गॅरेजवाले, हातगाडी, दुकानदार अशा वर्गातील नागरिकांचा समावेश आहे. अशा नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता निरीक्षक व सर्व स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आल्या.
घंटागाडीचे केले नियोजन
शहरातील काही भागात घंटागाडी येत नाही अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे परिसरातील संबंधित नागरिक रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी होते. संबंधित भागातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी निकामी लावण्यासाठी संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला बोलावून घंटागाडीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण जास्त होते अशा ठिकाणी स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांच्या कामामध्ये सुधारणा न केल्यास स्वच्छता निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ही ताकीद आयुक्त अजिज शेख यांनी दिली. सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांच्या कामात सुधारण्यासाठी आपापल्या प्रभागातील घंटागाड्यांचे योग्य नियोजन करावे, नालेसफाई व गटार सफाई नियमितपणे करावी, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, मलेरिया फवारणी करण्याचे आदेश दिलेत.