रुग्णवाढीचा दुसरा टप्पा अधिक धोकेदायक, महिनाभरातच आढळले २९ टक्के रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST2021-03-23T04:38:35+5:302021-03-23T04:38:35+5:30
पहिल्या तीन रुग्णांचा मृत्यू - जिल्ह्यात १० एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. साक्री येथील ५३ वर्षीय ...

रुग्णवाढीचा दुसरा टप्पा अधिक धोकेदायक, महिनाभरातच आढळले २९ टक्के रुग्ण
पहिल्या तीन रुग्णांचा मृत्यू - जिल्ह्यात १० एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. साक्री येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर धुळे शहरात आढळलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या रुग्णांचाही मृत्यू झाला होता. मृतांमध्ये लोकप्रतिनिधीच्या भावाचाही समावेश होता. जिल्ह्यातील चौथी पॉझिटिव्ह ठरलेली ७२ वर्षीय वृद्ध महिला मात्र ठणठणीत बरी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात झाले सर्वाधिक मृत्यू -
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्वाधिक बाधितांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल १५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू होता. दररोज किमान पाच ते सहा रुग्णांचे मृत्यू होत होते. तसेच रुग्ण आढळण्याचे प्रमाणही जास्त होते. जुलै महिन्यात ५१, तर सप्टेंबर महिन्यात १०१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याच्या मृत्युदरात मोठी वाढ झाली होती. मात्र, नंतर रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची संख्या कमी झाली व जिल्ह्याचा मृत्युदर दोन टक्क्यांच्या खाली आला आहे.
धुळे शहर ठरले सर्वात मोठा हॉटस्पॉट -
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर धुळे शहर कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला होता. तो अजूनही कायम आहे. शहरात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तसेच धुळे शहरातील सर्वाधिक १८० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यातील ७५, शिंदखेडा ४६, शिरपूर ६८ तर साक्री तालुक्यातील ३३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्तीमध्ये घेतली होती आघाडी -
ऑक्टोबरनंतर बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली होती. धुळे जिल्ह्याने कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मात्र, पुन्हा रुग्णवाढ झाल्याने कोरोनामुक्तीचा दर ८३.७८ टक्क्यांवर आला आहे.