महाविद्यालयात अडकले ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST2021-03-24T04:33:52+5:302021-03-24T04:33:52+5:30
मार्च एंडिंग सात दिवसांवर, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार धुळे : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२० - २१ या वर्षात ६ ...

महाविद्यालयात अडकले ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज
मार्च एंडिंग सात दिवसांवर, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार
धुळे : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२० - २१ या वर्षात ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच अडकून पडले आहेत. अद्याप ते समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सादर करण्यात आलेले नाहीत. मार्च एंडिंगला अवघे सात दिवस बाकी आहेत. मात्र, तरीही सादर न झालेल्या अर्जांची संख्या लक्षणीय आहे.
जिल्ह्यातील २५८ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत १९ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरले गेले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १२ हजार ६०० अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सादर झाले आहेत, तर ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील ९० टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित अर्ज तत्काळ पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती - जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांची संख्या जास्त असल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयांकडे अर्ज सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीचे अर्ज उशिरा सादर झाले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयांनी लवकर अर्ज सादर करण्याची गरज आहे.
तत्काळ अर्ज सादर करा -
मार्च एंडिंग सात दिवसांवर आला आहे. शिष्यवृत्ती योजनेची वेबसाईट सध्या सुरु आहे. साईट कधी बंद होईल, याबाबत सूचना आलेली नाही. मात्र, महाविद्यालयांनी अर्ज लवकर सादर केले, तर २०२० -२१ या आर्थिक वर्षात देयके तयार होऊन विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळेल. यासाठी महाविद्यालयांनी अर्ज तत्काळ पाठवावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्य्क आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी केले आहे.