परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दिरंगाईची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:19+5:302021-04-08T04:36:19+5:30
धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार ...

परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दिरंगाईची शक्यता
धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार धरु नये, असा गंभीर इशारा हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचारिकांनी दिला आहे. दरम्यान, १५० अधिपरिचारिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी हिरे महाविद्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे पुरेसे बेड आणि पुरेसे मनुष्यबळ असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे सिध्द झाले आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे कोरोना नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात १५० अधिपरिचारिकांची कोविड कक्षासाठी त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना उत्तम रुग्णसेवा देणे सोयीचे होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.
तत्पूर्वी, ३० मार्चला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिसेविका यांना निवेदन दिले होते. त्यानंतर अधिसेविका कार्यालयाने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देऊन हा गंभीर प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
अधिसेविकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या कोविड आणि नाॅन कोविड विभागात प्रत्येकी दोन अधिपरिचारिका व इतर कोविड आयसीयुमध्ये २ असे प्रत्येक कक्षात ११ अधिपरिचारिका वर्ग नियुक्त आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या पाहता जास्तीच्या परिचर्या वर्गाची कोविड व नाॅन कोविड या कक्षात आवश्यकता आहे. परिचर्या वर्गाच्या तीन शिप्टमध्ये ड्युटी लावल्या आहेत. बरेच कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह येतात. त्यांचे कुटुंबदेखील पाॅझिटिव्ह येत असल्याने आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता व त्यात वैद्यकीय रजा देणेदेखील अनिवार्य झाले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छा असूनही रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास अथवा रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवल्यास अधिसेविका या नात्याने जबाबदार धरु नये, असा इशारा अधिसेविका अरुणा भराडे यांनी दिला आहे. तसेच इतर संस्थांमधून उसनवारीने किंवा कंत्राटी तत्त्वावर १५० अधिपरिचारिकांची भरती करावी, अशी मागणी आहे.