नियोजनाच्या अभावापायी पाणीटंचाईचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:22+5:302021-05-06T04:38:22+5:30
मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. ...
मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. काही ठिकाणी पाणीटंचाई तर काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. हा योग्य नियोजनाचा अभाव असून यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजन करून होणारी पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी. जेथे गरज असेल तेथे पाण्याची तहान भागवावी, अशी मागणी आहे.
मालपूर गावातील इंदिरानगर भागात तसेच वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये दररोज किंवा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर वाॅर्ड क्रमांक चार-पाच तसेच राऊळनगर भागात चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे एकाच गावात पाणीपुरवठ्याबाबत वेगवेगळे धोरण दिसून येत आहे. येथील इंदिरानगर भागातील जलकुंभ ओव्हर फ्लो होण्याचे नवीन नसून येथे हा प्रकार सातत्याने दिसून येतो. म्हणून पाणीबचतीसाठी ग्रामपंचायत किती बेफिकीर आहे हे यावरून सिध्द होते. हे वाया जाणारे पाणी किमान जेथे चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो अशा भागात सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र वाॅटरमन यांना संपर्क केला असता पाण्याच्या टाकीत पाणी नाही असे सांगितले जाते. ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत पाण्याचे योग्य नियोजन करावे व वाया जाणाऱ्या पाण्याला पायबंद घालावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.