खान्देश लोकगणतीची सुरुवात १८२१ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:19 IST2020-03-22T12:18:57+5:302020-03-22T12:19:25+5:30
पहिल्या खानेसुमारीत खान्देशची लोकसंख्या केवळ ४ लाख १८ हजार २१

dhule
हर्षद गांधी ।
निजामपूर : ब्रिटिशांनी १८१८ मध्ये खान्देश प्रदेश काबीज केला. त्यांना प्रशासनाच्या दृष्टीने लोकसंख्या मोजणेची जरुरी भासली. वेगवेगळे नियोजन, नियंत्रण आणि सुविधा देण्यासाठी त्यांना लोकसंख्या मोजदाद करण्याची आवश्यकता भासली होती.
खान्देशाची पहिली जनगणना सन १८२१ मध्ये ब्रिटिश काळात झाल्याचे दिसून येते. (तेंव्हाचे एकत्र धुळे व जळगाव जिल्हे) पहिली जनगणना आज पासून २०० वर्षांपूर्वी झाल्याचा इतिहास आहे. पूर्वी प्रत्येक १५ वर्षांनी जनगणना होत होती. पहिल्या खानेसुमारीत खान्देशात लोकवस्ती केवळ ४ लाख १८ हजार २१ इतकी कमी आढळली. त्यानंतर दुसरी शिरगणती १५ वर्षांनी म्हणजे १८३६ साली घेण्यात आली. तेंव्हा पण या भागात लोकसंख्येत वाढ झालेली नव्हती. जेमतेम ७ हजाराने जनसंख्या वाढून फक्त ४ लाख ७८ हजार ४५७ इतकीच झाली होती. लोकवस्ती विरळ व कमी होती. त्यामुळे उपजाऊ कसदार शेत जमीन पडीक राहत होती. ही समस्या ब्रिटिशांपुढे प्रकषार्ने आली होती. त्यासाठी लोकसंख्या वाढली पाहिजे असे प्रयत्न होते. तिसरी जनगणना पुन्हा १५ वर्षांनी म्हणजे १८५२ मध्ये झाली. जनसंख्या मोजणीत सन १८३६ पेक्षा केवळ ४० टक्क्यांनी वाढ दिसून आली. ६ लाख ८६ हजार 3 इतकी लोकसंख्या होती. एकंदरीत येथील मोठ्या प्रमाणात जमीन खेडली जात नव्हती. विरळ वस्ती असल्याने हे असे होत होते. इंग्रजांनी वस्ती वाढविण्याचे प्रयत्न चालविले. त्यावेळी राज्यात दाटवस्तीचा रत्नागिरी जिल्हा होता. तेथून लोकांनी येथे यावे यासाठी "रेंट फ्री" जमिनी देण्याचे, बैलगाडी शेती अवजारे यासाठी पैसे दिले जातील असे फलक तेथे लावले होते. हे आमिष सुद्धा तेथील लोकांना आकृष्ट करू शकले नव्हते आणि लोकसंख्या काही वाढत नव्हती.
नंतरची जनगणना सन १८७२ मध्ये करण्यात आली. यावेळी जन संख्येत वाढ दिसली. सन १८५२ च्या जनगणनेच्या तुलनेत २०वर्षांनी ५० टक्?क्?यांची वाढ दिसली. १० लाख २८ हजार ४२ इतकी लोकसंख्या झालेली होती. हे सारे केले "एका रेल्वेने". पश्चिम खान्देशात (धुळे जिल्ह्यात) मात्र लोकवस्ती विरळच होती. खान्देश हा मुंबई राज्यातील सर्वात कमी वस्तीचा भाग होता. सन १९०१ मध्ये धुळे जिल्ह्याची (पश्चिम खान्देश) लोकसंख्या जनगणनेत ४ लाख ४८ हजार ४३२ इतकीच होती.आणि सन १९६१मध्ये हे आकडे जनगणनेत २७.४४ टक्क्यांनी वाढून १३ लाख ५१ हजार २३६ झाले होते. स्वातंत्र्या नंतर जन गणना १९५१ ला झाली.तदनंतर प्रत्येक १० वर्षांनी होते आहे. जनगणनेच्या दुसरा टप्पा दिनांक १ एप्रिल २०२१ पासून सुरू होत आहे.सन१८७२ नंतरच्या अखंड शृंखलेतील १६ वी व स्वातंत्र्या नंतरची आठवी जनगणना असणार आहे. (संदर्भ- गॅझेटर)