हाॅटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:09+5:302021-04-07T04:37:09+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ५ एप्रिलपासून कठाेर निर्बध लागू केलेले आहेत. ...

हाॅटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ५ एप्रिलपासून कठाेर निर्बध लागू केलेले आहेत. ३० एप्रिलपर्यंत निर्बध लागू केलेले आहेत. तर आवश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्य व्यवसायांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक
गतवर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाली. त्याच्या काहीच दिवसांत सर्वत्र लाॅकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे हाॅटेल्सही बंद राहिल्या.
या काळात हाॅटेल्समध्ये काम करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील महिलांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली होती.
हाॅटेल्समध्ये काम करून तुटपुंजा प्रमाणात पगार मिळतो. त्यावर समाधान मानून अनेक महिलांनी नोकरी पत्करली; मात्र अचानक रोजगार हिरावल्याने वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक, असे संबंधित महिलांनी सांगितले.
महिलांना करता येण्याजागे कुठलेही उद्योगधंदे नाहीत. रोजगार मिळणे अशक्य आहे. त्यामुळे हाॅटेल्समध्ये पोळी-भाजी करण्याचे काम स्वीकारले होते.
कोट
हाॅटेल्स बंद झाल्यास रोजगार
गतवर्षी कोरोनामुळे नव्हे; तर लाॅकडाऊनमुळे हाॅटेल्स बंद होऊन रोजगार हिरावल्याने मोठे संकट कोसळले होते. तशी परिस्थिती आता पुन्हा उद्भवू नये. रोजगार हिरावून संकट कोसळणार आहे. शासनाने आमचाही विचार करण्याची गरज आहे.
विजया पाटील
जिल्ह्यात महिलांसाठी रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने हाॅटेल किंवा घरकामाला जाण्याशिवाय मार्ग नाही. दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने कामावरदेखील कोणी लावण्यास तयार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा हाॅटेल व्यवसायावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पुन्हा आर्थिक अडचणीला सामाेरे जावे लागले.
वंदना शिंपी,
हाॅटेल्सच्या किचनमध्ये पोळी-भाजी करण्याचे काम मी करते. या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला असून कुटुंबाला हातभार लावणे शक्य झाले; मात्र आता हाॅटेल्स बंद राहिल्यास आर्थिक अडचण उद्भवणार आहे. मायबाप शासनाने हाॅटेल्स बंद करण्याऐवजी कोरोनाचे नियम अधिक कठोर करावे.
- कस्तूरबा महाजन