यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच सरकार देत असलेल्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य नाही. उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. या योजनेत शेतजमिनी संपादित झाल्या आहेत. बाजारभावाच्या चारपट मोबदल्याची मागणी आहे.
साहेबचंद जैन यांनी सांगितले की, सोनगीर, सोंडले परिसरातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेतजमिनी संपादित केल्याची नोंद केली आहे. जमिनी विक्रीला प्रतिबंध करण्यात आला; परंतु अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. शासनाने केलेला निवाडा समाधानकारक नाही. त्या निवाड्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सन २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चारपट मोबदला द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या परवानगीने जमिनी संपादित कराव्या, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी चर्चा न करता जमिनी संपादित केल्याने आता विक्री करता येत नाही, कर्जही मिळत नाही, शासनाच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उताऱ्यावरील नोंदी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.