तलाठीऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:31+5:302021-08-22T04:38:31+5:30

थाळनेर - सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला सजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यातही कधी ...

Farmers will now register crops instead of talathi | तलाठीऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

तलाठीऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

थाळनेर - सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला सजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यातही कधी कापूसऐवजी सोयाबीन, कधी धानाऐवजी गहू अशा चुकीच्या पिकांची नोंदणी करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून व्हायची. मात्र आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वतःच्या पिकांची नोंदणी स्वतःच करता येणार आहे. विशेष म्हणजे पिकांचा फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे ॲप शेतकऱ्यांना खुले करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे महसूल विभाग तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना नव्या ई-पीक पाहणी ॲपबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना ॲपची माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी सुनील जे. मराठे, शेतकरी गजेंद्र चौधरी, उज्ज्वल निकम, राजेंद्र चौधरी, महेश सोनवणे, महेश राजपूत, खुशाल वाडिले, सुनील पाटील, कोतवाल बाबाजी शिरसाठ आदी उपस्थित होते.

शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनींची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कार्यभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साजाला, तर कधी त्या साजाला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांची नोंद करताना चुकासुद्धा व्हायच्या. परंतु आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाइल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पिकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.

दरम्यान, महसूल विभागातर्फे गावागावात मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांना हे ॲप कसे हाताळावे याबाबत माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडूनही ॲपची माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिसाद मिळत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

नुकसान भरपाई मिळणे सोयीचे

या ॲपद्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतःच करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई आणि पीकविमा मिळणे सोपे होणार आहे. ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे. त्यावर आपली माहिती भरून नोंदणी केल्यावर एक सांकेतांक प्राप्त होईल. त्यानंतर आपल्या शेतावर जाऊन पिकांच्या फोटोसह क्षेत्र, पिकाचे नाव, सिंचन पद्धती आदी माहिती भरून साठवायचे आहे. एका नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून २० खातेदारांची पीक पाहणी नोंदवता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसल्यास चिंतेचे कारण नाही. कुठलीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील स्थानिक तलाठी, कृषी सहायक, कोतवाल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप हंगामाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असली तरी ३१ ऑगस्टपावेतोच आपली पीक पाहणी नोंदवावी. या माहितीचा उपयोग पीकविमा, नुकसान झाल्यास अनुदान वाटप अशा विविध शासकीय योजनांसाठी होणार आहे.

- सुनील जे. मराठे, तलाठी थाळनेर

Web Title: Farmers will now register crops instead of talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.