महानगरात प्रभावी अंंमलबजावणी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST2021-03-23T04:38:24+5:302021-03-23T04:38:24+5:30
धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, सहाजिकच येथील बाजारपेठ मोठी आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी, शासकीय कामांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण ...

महानगरात प्रभावी अंंमलबजावणी झाली
धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, सहाजिकच येथील बाजारपेठ मोठी आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी, शासकीय कामांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र लॅाकडाऊन जाहीर होताच, महापालिका व पोलीस प्रशासनाने शहराचा ताबा घेतला. ज्या रस्त्यांवर, बाजारपेठेत वर्दळ होती, तेथे फक्त पोलीसच नजरेस पडत होते.
शहरात पाचकंदील, जुना आग्रारोडवर शुकशुकाट होता. पारोळा चौफुली, संतोषी माता चौक, बसस्थानक, जुना आग्रा रोड या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना, मास्क न लावणाऱ्यांचा ‘प्रसाद’ देण्यात येऊ लागला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. लॅाकडाऊनमुळे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली.
पुलांवरील वाहतूक केली बंद
शहरातील पांझरा नदीवरील गणपती मंदिर ते मोराणकर बंगलाकडे जाणारा पूल, कालिका माता मंदिर ते जयहिंद स्वीमिंगकडे जाणारा पूल, महात्मा गांधी पुतळा ते पंचवटीकडे जाणारा मोठा पूल असे तीन पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले़ तर आपत्कालिन व अत्यावश्यक सेवेसाठी पांझरा नदीवरील दातासरकार ते सावरकर पुतळा दरम्यान असलेला लहान पूल सुरू ठेवण्यात आला होता. आवश्यकता असलेल्यांनाच या पुलावरुन वावरता येत होते. मात्र या ठिकाणीही पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता.
अनेकांवर केली दंडात्मक कारवाई
गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून लॅाकडाऊन सुरू झालेले असले तरी मनपातर्फे विनामास्क, रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यात सोशल डिस्टन्सिंग न ठेवणाऱ्यांकडून २ लाख ७८ हजार ५०० रूपये, रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून ३० हजार ९००, मास्क न लावणाऱ्यांकडून १० लाख ७४ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे.
पोलिसांनीही केली कारवाई
मास्क न लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनीही कारवाईचे शस्त्र उगारले होते. विनाकारण फिरणाऱ्या ६९९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तर विनामास्क वापरणाऱ्या २० हजार १७२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २६ लाख १६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.