रानभाज्या खा अन् निरोगी राहा....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:43+5:302021-08-12T04:40:43+5:30
धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या ...
धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या उगवत असतात; मात्र त्या ओळखता येणे गरजेचे आहे. रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही त्या अनेकांकडून घेतल्या जात नाहीत. या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यात खते वापरलेली नसतात. या भाज्यांमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने आणि सर्वात महतत्त्वाचे म्हणजे अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी या रानभाज्या फार महत्त्वाच्या आहेत. या रानभाज्या रोगप्रतिकारशक्तीही वाढवित असतात. त्यामुळे त्या आवर्जुन खाल्ल्या पाहिजे; मात्र हे करीत असताना ज्यांना रानभाज्यांची माहिती आहे, अशांकडूनच त्या खरेदी केल्या पाहिजे. त्याचे महत्त्व समजून घेणेही महत्त्वाचे आहे.
या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?
करटोली
करटोलीचे फळ कडवट, उष्ण संसर्गरक्षक आहे, तसेच पोट साफ होण्यासाठीही उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रणासाठी ही भाजी गुणकारी आहे.
सुरण
सुरण या रानभाजीत अ,ब,क ही जीवनसत्वे आहेत. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी ठरते, तसेच दमा, मूळव्याध, पोटदुखी, रक्त विकारावर उपयोगी.
गुळवेल
गुळवेल महत्त्वाची औषध वनस्पती आहे. ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. या वनस्पतीत प्रथिनांचे प्रमाण ११.२ एवढे असते.
टाकळा
टाकळ्याच्या पानात विरेचन द्रव्य व लालरंग असतो. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगात गुणकारी आहे. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
आंबुशी
आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून, भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन कमी होऊन रक्तस्त्राव बंद होतो. आंबुशीमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात आहे.
रानभाज्या, वनभाज्या या कुठेना कुठे उगवतच असतात. त्यामुळे त्या नष्ट झाल्या, असे म्हणता येणार नाही. उलट कृषी विभागाने नवीन भाज्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यावर संशोधन केले पाहिजे, अशी अपेक्षा रानभाजी महोत्सवाचे निर्माते चैत्राम पवार यांनी व्यक्त केलेली आहे.
वनभाज्या या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या असतात. त्यात खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर नसतो. या वनभाज्या औषध गुणधर्मीय असतात. त्यांचा आहार घेतला पाहिजे.
- डॉ. संजय शिरसाठ