खते महागल्याने संकटात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:03 IST2019-05-20T12:03:02+5:302019-05-20T12:03:42+5:30

दोंडाईचा : शासनाने अनुदान कमी केल्याने खतांच्या दरात ६ ते ४१ टक्क्यांनी वाढ

Due to the high cost of fertilizers, the burden of the crisis | खते महागल्याने संकटात भर

दोंडाईचा येथील रेल्वे स्थानकावर रॅकमधून उतरविण्यात आलेली खते.

दोंडाईचा : गुरांची  संख्या कमी होत असल्याने शेतकºयांना शेणखत मिळेनासे झाले आहे. त्यात केंद्रशासनाने  रासायनिक खतांच्या अनुदानात घट केल्याने रासायनिक खतांच्या किमतीत ६ ते ४१  टक्क्यांनी वाढ झाली आहे. खताच्या किंमती ६३ रुपयांपासून २७७ रुपयांनी वाढल्या आहेत. यात समाधानाची बाब एवढीच की युरिया खताच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
गतवर्षात पावसाची अनियमितता, कमी पर्जन्यमान यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट आली होती. समाधानकारक भाव मिळाला तरी उत्पन्नात घट आल्याने काही शेतकºयांचा उत्पन्न खर्चही निघाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा पावसाचे मृग नक्षत्र जवळ आल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी खरीपपूर्व मशागतीकडे वळला आहे. खते व बियाण्यांचे नियोजन करीत असतानाच केंद्रशासनाने खतांवरील अनुदान कमी केल्याने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झालेली आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
दिल्लीला  विभागीय खत परिषद संपन्न झाली असून त्या बैठकीत जिल्हावार खताचा पुरवठा निश्चित करण्यात आला. गेल्या २-३ वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 
बºयाच शेतकºयाचं कर्जही माफ झाले आहे. शासनाने विविध अनुदानेही दिली. परंतू काही बँकांनी नवीन कर्ज देण्यास आखडता हात घेतल्याची तक्रार आहे. काही बँक दलालाशिवाय पीक कर्ज, ठिबक कर्ज देत नसल्याची तक्रार आहे. दोंडाईचा शहरातील एक बँक तर कमिशन दिल्यानंतर ठिबकचे कोणतेही साहित्य न घेता कर्ज मंजूर करत असल्याचा काहींना अनुभव आला आहे. अशा बँकांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत खरीप हंगामाची तयारी करीत असतानाच केंद्रशासनाने खताच्या अनुदानात घट केली आहे. काही बियाण्यांचा किंमतीत वाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खत महाग झाल्याने उत्पन्न खर्चात वाढ होणार आहे. हवामान खात्याने ६ जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता वर्तवली आहे. २५ मे पर्यंत बीटी बियाणे विक्रीला बंदी आहे. तरीही काही शेतकरी अन्य राज्यातून बीटी बियाणे आणून लागवड करीत आहेत.
नवीन दरानुसार डीएपी खत आता ११८० ऐवजी १४५० रुपयाला मिळणार आहे. या खतात २२.८८ टक्के म्हणजे २७० रुपये प्रति बॅग दर वाढले आहेत. १०:२६:२६ खतात  १५.५१ टक्के वाढ झााली असून आता या खताचे दर १८० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे ११६० रुपयांचे खत आता १३४० रुपयांना मिळणार आहे. १२:३२:१६ हे खत ११७५ रुपये ऐवजी १३४० रुपयांना मिळणार आहे. या खतात १४.०४ टक्के म्हणजे १६५ रुपयांनी वाढ झाली आहे. २०:२०:० या खतात  २४.८५ टक्के म्हणजे २१२ रुपयांनी वाढ झाली आहे. ८५३ रुपये किंमतीचे हे खत आता १०६५ रुपयांना मिळणार आहे. एनओपी खतात सर्वाधिक म्हणजे ४१.१५ टक्के म्हणजे २७७ रुपयांनी वाढ झाली आहे. आता ९५० रुपयांचे खत ६७३ रुपयांना मिळणार आहे. १५:१५:१५ खत ६.४८ टक्के म्हणजे ६३ रुपयांनी महागले आहे. ९७१ रुपयाला मिळणारे १५:१५:१५ खत १०३४ रुपयांना मिळणार आहे. परंतू युरियाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. युरिया पूर्वीप्रमाणे २६६ रुपये प्रति बॅग मिळणार आहे. हीच समाधानाची बाब आहे.

 

Web Title: Due to the high cost of fertilizers, the burden of the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे