पुन्हा लाॅकडाऊन नको रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:38+5:302021-03-31T04:36:38+5:30
महानगरात आतापर्यंत १५६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लाॅकडाऊन लागू शकतो, अशी चर्चा ...

पुन्हा लाॅकडाऊन नको रे बाबा !
महानगरात आतापर्यंत १५६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लाॅकडाऊन लागू शकतो, अशी चर्चा काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी लाॅकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होतो. अचानक व पहिल्यांदा लाॅकडाऊन जाहीर झाल्याने उद्योग, व्यापार व लहानमोठे व्यवसाय ठप्प झाले होते. दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र अद्यापही व्यवसाय पूर्वपदावर येऊ शकला नाही. पुन्हा लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतीलच. मात्र परराज्यातून जिल्ह्यात आलेले व लहान व्यवसायावर उपजीविका भागविणाऱ्या व्यावसायिकांवर संकट येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनावर लस किंवा औषधी नसल्याने प्रशासनाला अडचणी आल्या होत्या. मात्र सध्या सर्व काही असताना लाॅकडाऊन करणे उचित नाही. प्रशासनाने महानगरातील सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
या व्यावसायिकांना असेल निर्बंध
३० मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने सायंकाळी ८ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मॉल्स, सभागृहे आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. मात्र, या कालावधीत रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा देण्यास परवानगी असेल, तर सिनेमा, हॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा या आदेशातील अटी-शर्तींचा भंग केल्यास कारवाई केली जाणार आहे.
मंगल कार्यालयासह अन्य व्यावसायिक पुन्हा अडचणीत
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे लग्नासाठी ५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मंगल कार्यालय, हाॅल व आचारी, मंडप, डीजे तसेच अन्य लग्नकार्यावर अवलंबून असलेल्या लहानमोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पुन्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यास अनेकांवर उपासमारीचे संकट येणार आहे.
अन्य लहान व्यावसायिकांना पडली चिंता
नव्याने लाॅकडाऊन जाहीर केल्यास किराणा, सलून, भाजी विक्रते, फेरीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर बसणारे कटलरी, स्टोव्ह, गॅस, मिक्सर, चेन दुरुस्त करणारे. पंक्चर काढणारे, शिंपी, सराफी दुकानातील कारागीर, ट्रक, दुकानांच्या शटरला ग्रिसिंग करणारे गटाई कामगार, घड्याळ दुरुस्ती, चष्मा दुरुस्ती, डुप्लिकेट चावी तयार करणारे, गॅरेज, सायकल दुरुस्ती असे लहान व्यावसायिकांना पहिल्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये उपासमारीला सामोरे जावे लागले होते. पुन्हा लाॅकडाऊन जाहीर झाल्याने कोरोनामुळे कमी तर उपासमारीमुळे मरण्याची वेळ येऊन ठेपणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.