Dhule Crime: दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण, घरच्यांनी दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. दोघांनाही अपत्य झाली. पण, एकमेकांवरील त्यांच्या जीव कायमच होता. लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर ते दोघे भेटले. शेतात गेले. तिथेच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एकाच गावातील विवाहित तरुण-तरुणीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मयत दोघा प्रेमी युगलला अपत्ये असूनही त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील एका २८ वर्षीय तरुण आणि २५ वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते.
विशेष म्हणजे ते दोघेही एकाच समाजाचे होते. चार वर्षांपूर्वी दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले. दोघांचे सासर देखील एकाच गावाचे होते.
शेतातील एकाच झाडाला दोघांनी घेतला गळफास
या दोघांनी गावातील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन सोबतच आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.
दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. दोघांवर शोकाकुल वातावरणात दि.१९ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांनी एकाच वेळी एकत्रीतपणे आत्महत्या का केली याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.