जोपासलेल्या १०० वृक्षांचा साजरा केला वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:12 IST2020-03-15T12:11:12+5:302020-03-15T12:12:00+5:30
संडे अँकर । वृक्षसंवर्धन समितीचा स्तुत्य उपक्रम; तरुणांसाठी प्रेरणादायी; नवीन १०० रोपांची लागवड करुन संवर्धन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील तरुण एकत्र येऊन शहरातील विरदेल रोडच्या दुतर्फा गेल्यावर्षी सुमारे १०० झाडे जगवली. त्यांचा प्रथम वाढदिवस एकमेकांना पेढे भरून साजरा केला.
तर यावरच ते थांबले नाहीत या वर्षी सुमारे ५०० झाडे घेऊन त्यात नागरिकांना ४०० वाटप केले व या तरुणांनी यावर्षी परत १०० झाडे स्वत: लक्ष्मीनारायण कॉलनी, साईलीला नगर, साई नंदन गार्डन, अमरधाम या ठिकाणी लावून त्यांची काळजीही ते घेत आहेत. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणदायी असून इतर तरुणांनीही त्यांचे अनुकरण केल्यास शिंदखेडा शहर व परिसर हिरव्या वनराईने फुलण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी इतर तरुणांनीही पुढे येण्याची गरज आहे.
वृक्षसंवर्धन समितीने एक वर्षाच्या झालेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून पेढे भरवून मागील वर्षी लावलेली झाडे पाण्या अभावी जळत असलेल्या झाडांकडे पाहून वृक्षसंवर्धन समितीने वृक्षांना जगवण्याच्या निश्चय केला आणि भर उन्हात घरून पाण्याच्या भरलेल्या ड्रमने पाणी देण्यास सुरुवात केली. जवळपास शंभरच्यावर रोपांना नियमित पाणी देण्याचे काम सुरु केले. आज त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होत असून वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, रोहित कौठळकर, महेंद्र यादगिरीवार, बबलू मराठे, भूषण मराठे यांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा करून पेढे भरून आनंद साजरा केला.
तसेच या वर्षी त्यांनी सुमारे ५०० झाडे आणली. त्यात शहरातील नागरिकांना आवाहन केले की ज्यांना झाडे लावून जगवण्याची व झाड कुठे लावले त्याचा फोटो व दर महिन्याचा फोटो व्हाट्सपवर टाकणे बंधनकारक केले. त्यानुसार नागरिकांनी सुमारे ४०० झाडे नेऊन जगवली व नियमित दर महिन्याचा झाडासोबतचा सेल्फी फोटो नागरिक नियमित पाठवत असल्याचे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी यांनी सांगितले. तसेच उर्वरित १०० झाडे कॉलनी परिसरातील ओपन स्पेस व अमरधाममध्ये लावली असून त्यांची देखभाल व नियमित पाणी देणे सुरु असल्याचे सांगितले. त्यातील सर्व झाडांना नागरिकांकडून ट्रीगार्डसाठी पैसे न मागता ऐपतीप्रमाणे नागरिकांनी २, ५, १० या प्रमाणे ट्रीगार्ड आणून दिली. त्यामुळे झाडाचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. त्यात ते ८० टक्के झाडे जगवण्यात यशस्वी झालो असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.