पर्यावरण संवर्धनासाठी जगविले ३२८ वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST2021-06-30T04:23:29+5:302021-06-30T04:23:29+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील हरियाला ग्रुपचे रवी भगत अध्यक्ष आहेत. या ग्रुपमध्ये ३५ सदस्य असून सर्वजण नियमित वृक्षारोपण करतात. ...

पर्यावरण संवर्धनासाठी जगविले ३२८ वृक्ष
शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील हरियाला ग्रुपचे रवी भगत अध्यक्ष आहेत. या ग्रुपमध्ये ३५ सदस्य असून सर्वजण नियमित वृक्षारोपण करतात. वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करण्यापासून वृक्षांच्या संवर्धनासाठी ग्रुपचे सदस्य पुढाकार घेतात. ज्या नागरिकांच्या घरासमोर वृक्ष लावले जातात त्या नागरिकांनाही वृक्षांची काळजी घेण्याची सूचना केली जाते. या ग्रुपच्या माध्यमातून कुमारनगर भागात चारशे रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी ३२८ रोपे जगली आहेत. ही रोप आता दहा फुटांपर्यंत वाढली आहेत. या ग्रुपला नगरसेवक हर्षकुमार रेलन यांचेही सहकार्य लाभते. ग्रुपने साक्री रोडवर महाले वॉटर समोरील पाडवी सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर निंबाचे १५ वृक्ष लावले आहेत. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी हर्षकुमार रेलन यांनी स्वीकारली आहे. ग्रुपतर्फे प्रभागातील वृक्षांना नियमित पाणी व खत दिले जाते. तसेच वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जातो. प्रभागात खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या हस्ते वृक्षाराेपण झाले आहे. साक्री रोड परिसर हिरवागार करण्याचा संकल्प झाला आहे.