उस्मानाबाद : घरावरून गेलेल्या महावितरणच्या विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उस्मानाबाद शहरातील बालाजी नगर भागात ३१ जानेवारी रोजी घडली. जखमी युवकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, महावितरण विभागाने रुग्णालयाचा खर्च व युवकास महावितरण विभागात नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी जखमी युवकाच्या कुटुंबीयाने महावितरण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील बालाजी नगर भागात शहाजी भालेराव यांचे घर आहे. त्यांच्या घरावरून हाय पाॅवर तार गेलेली आहे. या तारांचा झोळ वाऱ्यामुळे खाली येत आहे. ३१ जानेवारी रोजी शहाजी भालेराव यांचा मुलगा आशीष भालेराव यांचा तारेस स्पर्श झाल्याने विद्युत शॉक लागून गंभीर जखमी झाला. आशीष भालेराव यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी अडीच लाखांचा खर्च झाला असून, अद्यापही उपचार सुरूच आहेत. महावितरण विभागाने उपचाराठी येणारा सर्व खर्च द्यावा तसेच आशीष भालेराव यांना महावितरण कार्यालयात कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, घराजवळ विद्युत खांब उभा करून तार उंच करून दुरुस्त करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन बेबीनंदा शहाजी भालेराव यांनी उस्मानाबाद महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.