सास्तूर गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:08+5:302021-06-16T04:44:08+5:30
लोहारा : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे मागील दोन दिवसात व्यापारी व कर्मचारी अशा २६३ जणांची रॅपिड अँटिजन स्टेट करण्यात ...

सास्तूर गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
लोहारा : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे मागील दोन दिवसात व्यापारी व कर्मचारी अशा २६३ जणांची रॅपिड अँटिजन स्टेट करण्यात आली. यात सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून, गावात सध्या केवळ तीन रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे या गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील सास्तूर येथे कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५८ रुग्ण सापडले होते. या. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, तालुका आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. यानंतर मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. सास्तूरमध्ये ९२ रुग्ण आढळून आले. शिवाय, ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आणखी कडक करून गावात जनजागृती रॅलीही काढण्यात आली. शिवाय, कोरोना टेस्टही वाढून बाधितांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आला. या लाटेतील ८१ जण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
दरम्यान, रुग्ण कमी झाले असले तरी प्रशासनाकडून उपाययोजना अजूनही सुरूच आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने ९१ व्यापारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजन स्टेट घेण्यात आली. या सर्वच ९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. याप्रसंगी तहसीलदार संतोष रुईकर यांनी या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. यानंतर सोमवारी पुन्हा १७२ जणांची चाचणी केली असता, तेही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. यासाठी सरपंच यशवंत कासार, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश कुलकर्णी, मारुती दंडगुले, पवन गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी बाबू सुतार, राजू खंडके आदींनी परिश्रम घेतले.
विलगीकरण कक्षाचा झाला चांगला फायदा
सास्तूरसह परिसरातील सालेगाव, तावशीगड, मुर्शदपूर, उदतपूर, कोंडजीगड, राजेगाव, रेबे चिंचोली, होळी, एकोंडी (लो). आदी गावांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सास्तूर येथे शिवसेनेच्यावतीने व स्पर्श रुग्णालयाच्या सहकार्यातून २० बेडचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. याचाही रुग्णांना चांगला फायदा झाला.
कोट.....
सास्तूर गावामध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या कमी असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवावा. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. ही लस अगदी सुरक्षित असून, नागरिकांनी मनात कसलीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे.
- रमाकांत जोशी, प्रकल्प अधिकारी, स्पर्श रुग्णालय, सास्तूर
गावामध्ये कोरोनाविषयी तालुका आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजगृती करून जास्तीत जास्त अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले. यापुढेही नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करावे. याबाबत ग्रामपंचायतीकडून देखील जनजागृती सुरूच ठेवली जाणार आहे.
- यशवंत कासार, सरपंच, सास्तूर